सातारा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वामुळे जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा उंचावली आहे. त्यांच्या नेतृत्वाशिवाय सध्या भारताला पर्याय नाही. महाराष्ट्रातून 48 खासदार त्यांच्या विचारांचे असावेत, यासाठी महायुतीचे सर्व खासदार राज्यातून निवडून द्या, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
सातार्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानाच्या व्यासपीठावरून भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि महायुतीच्या घटक पक्षांनी मकर संक्रातीच्या पूर्वसंध्येला रविवारी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार शड्डू ठोकला. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार घटक पक्षांच्या पदाधिकार्यांचा मेळावा जोरदारपणे झाला. या मेळाव्याने विरोधकांना आव्हान देत, राजकीय वातावरण ढवळून काढले.
उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराजे देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे, कराड दक्षिणचे नेते डॉ. अतुल भोसले, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवरायांनी दिलेली सर्वधर्मसमभावाची शिकवण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आचरणात आणली आहे. जागतिक पातळीवर देशाचा दबदबा मोदी यांच्या नेतृत्वगुणांमुळे आहे. आम्ही महायुतीचे घटक पक्ष नरेंद्र मोदींना तिसर्यांदा पंतप्रधानपदी निवडून देण्यासाठी एकत्र आलो आहोत. सातारा व माढ्यातील उमेदवारासह इतर 46 लोकसभा मतदारसंघातील खासदार मोदींच्या विचारांचे असावेत, याकरिता आपापसातील मतभेद बाजूला ठेवून, महायुतीच्या घटक पक्षांनी एकजुटीने काम करावे.
महाराष्ट्रात तिन्ही प्रमुख पक्षांच्या वरिष्ठ कार्यकारिणींचे नेतृत्व जनतेच्या विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आले आहे. सातारा जिल्ह्यातही महायुतीचे घटक पक्ष आणि आम्ही जनतेला विकासाच्या माध्यमातून चांगले जीवनस्तर मिळावे, याकरिता प्रयत्न करत आहोत. त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांनी लोकसभेचे यापुढील काम एकजुटीने करावे, असेही उदयनराजे म्हणाले
दरम्यान, गांधी मैदानावर जमलेल्या पदाधिकार्यांच्या साक्षीने आगामी लोकसभा निवडणुकीत सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याची ग्वाही घटक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी दिली. हा मेळावा दोन तास उशिरा सुरू झाला. सुरुवातीला गांधी मैदानावर फारशी गर्दी नव्हती. मात्र, सायंकाळी, विशेषतः उदयनराजे भोसले यांची व्यासपीठावर एन्ट्री झाल्यानंतर गर्दी व्हायला सुरुवात झाली.
या मेळाव्याच्या निमित्ताने महायुतीतल्या घटक पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. उदयनराजे भोसले यांनी भाजपच्यावतीने लोकसभेसाठी जोरदार दावेदारी केली. सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उदयनराजे भोसले यांचेच जणू ब्रँडिंग झाले. या मेळाव्यातून महायुतीतील घटक पक्षांमध्ये तिळगुळाचा गोडवा असल्याचा संदेश देण्यात आला.
महायुतीचा धर्म
आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम सातार्यात रविवारी वाजले. ‘अब की बार 45 पार’ हे महायुतीचे ध्येय आह. या दृष्टीने हा मेळावा रंगला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भीमसेना, रिपाइं आठवले आणि खरात गट, रयत क्रांती सेना, बहुजन विकास आघाडी, शिवसंग्राम पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष यांचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला मेळावा होत असल्याने सर्व मान्यवरांना तिळगूळ भरवून त्यांचे स्वागत करण्यात आले. उदयनराजे भोसले यांना संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी तिळगूळ भरवला.
आम्हाला सन्मान द्या
रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड म्हणाले, आमच्या कार्यकर्त्यांना गृहीत धरू नका. यापूर्वी अनेक पक्षांनी आम्हाला गृहीत धरले होते. जिथे आम्ही, तिथे विजय नक्की असतो. आम्हाला कमी समजू नका. आमचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांचा फोटो राष्ट्रीय नेत्यांच्या बरोबर लावण्यात यावा. आम्हाला सन्मानाची वागणूक द्यावी. रिपाइं कवाडे गटाच्या राहुल कांबळे यांनीसुद्धा हीच खंत व्यक्त केली. आमच्या नेत्यांना विजयाची हवा कळते. जिथे ते असतात, तिथे सत्ता असते, असे सांगत दोघांनी व्यासपीठावरील नेत्यांना कान टोचले.