सातारा – सातारा जिल्ह्यात दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सातारा पालिकेच्या आरोग्य विभागात पन्नास पीपीई किटस् ठेवण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेने पालिकेला 25 पीपीई किटस् दिले असून उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी पुण्यातून आणखी 25 किटस् विकत आणली आहेत.
सातारा पालिकेचा आरोग्य विभागाची सज्जता या किटस्ने वाढली आहे. साताऱ्यात 63 वर्षीय करोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किटस् तातडीने उपलब्ध करून देताना जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडाली होती. त्या करोनाबाधिताचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कसा न्यायचा, त्यावर शास्त्रीय पद्धतीने अंत्यसंस्कार कसे करायचे, याचे मात्र, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ही परिस्थिती संयमाने व शिस्तीने हाताळली. सातारा जिल्ह्यातील एकमेव “अ’ वर्ग पालिका असलेल्या सातारच्या पालिका प्रशासनावर साधने व सुविधा उपलब्ध करताना ताण पडत आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने पीपीई किटस्ची खरेदी करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाकडून आल्यानंतर उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी मंगळवारी तातडीने पुण्याला जाऊन 25 पीपीई किटस्ची खरेदी केली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी 1 ते 10 एप्रिल या कालावधीत काही संवेदनशील भागात पुन्हा सर्वेक्षण केले होते. त्यावेळी मास्क, ग्लोव्हज्, कॅप, स्टॉकिंग्ज यांचा तुटवडा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर तातडीने पीपीई किटस्ची खरेदी करण्यात आली आहे. करोनाचा पादुर्भाव आणि त्यामुळे मृतांची संख्या वाढली, तर अशा आपत्कालीन स्थितीत या पीपीई किटस्ची गरज भासू शकते. त्यामुळे पुढील आदेश आल्यावर परिस्थितीनुसार या किटस्चे वितरण आरोग्य कर्मचाऱ्यांना केले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.
आरोग्य विभागाचे काम नेटाने
आरोग्य विभागातील कर्मचारी सततच्या धावपळीने व आकडेवारी गोळा करताना पुरती त्रासले आहेत. अशाही स्थितीत त्यांचे काम नेटाने सुरू आहे. मुख्याधिकारी शंकर गोरे, उपमुख्याधिारी संचित धुमाळ, मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील, लेखापाल हिम्मत पाटील हे पालिकेचे बिनीचे शिलेदार तीन आठवडे घरांपासून लांब आहेत. मुख्यालयात राहून स्वत:चे सरंक्षण करतानाच शहराची काळजी घेत त्यांचे काम 15 ते 18 तास सुरू आहे.