संदीप मोरे
रहिमतपूर (तारगांव ) – ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक क्रांती म्हणजे आजचे रहिमतपूर होय. प्राचीन वसा आणि वारसा लाभलेली रहिमतपूर ऐतिहासिक नगरी आहे. शिवकालीन रणदुल्लाखानाच्या वास्तव्याने त्याच्या संकल्पनेतून साकारलेली ऐतिहासिक पार्श्वभूमीने संपन्न झालेली रहिमतपूर नगरी. शहराचा ऐतिहासिक वारसा खूप मोठा आहे. आदिलशहाचा सरदार रणदुल्लाखान याने रहिमतपूर शहर वसवले. विजापूरवरून प्रतापगडला जात असतानाच रस्त्यात याच ठिकाणी त्याचा मुक्काम पडला. याच ठिकाणी रहमत प्राप्त झाली म्हणून परिसरातील बारा वाड्या एकत्र करून रहिमतपूर शहराची स्थापना केली. घोड्यावरून बाजार करता यावा असी सारीपाटासारखी बाजारपेठेची ही रचना केली. अनेक व्यापाऱ्यांना चौकातील मोक्याची जागा दिली व विजापूरसारखे सुंदर शहर वसवले.
कमंडलू नदीकाठावर एका बाजूला मुस्लिम वस्ती तर एका बाजूला हिंदू वस्ती. पण हिंदू मुस्लिम दरी सांधण्यासाठी त्याकाळी कमंडलू नदीवर एक पूल बांधण्यात आला आणि त्याला केसरी पूल हे नाव दिले. जसा तो पूल भक्कम आहे तसेच रहिमतपूरचं हिंदू मुस्लिम ऐक्य अजूनही अबाधित आहे. रहिमतपूर शहराला पिण्याच्या पाण्याची सोय होईल, शेतीला पाण्याची सोय व्हावी यासाठी कमंडलू नदीच्या पात्रात धरण बांधण्यात आले. त्या धरणाच्या सांडव्यावर हत्तीचे मुख असलेले शिल्प बसवण्यात आले. त्यामुळे त्या धरणाला गजधरण असे म्हणतात. अनेक वर्ष रहिमतपूरकरांच्या पिण्याचे पाणी शेतीच्या पाण्याची सोय या गजधरणाने केली होती.
रहिमतपूरची आराध्य देवता म्हणून दक्षिणेस माता श्री चौंडेश्वरी देवीचे स्वयंभू स्थान आहे. येथील माने कुटुंबीयांचे चौंडेश्वरी कुलदैवत आहे. त्याचवेळी शहराचे संरक्षण करण्यासाठी गावाच्या उत्तरेकडील चौकात रोकडेश्वर मंदिर उभारण्यात आले. मंदिरामध्ये रामभक्त मारुतीची दक्षिणाभिमुख मूर्ती आहे .हा मारुती रोकडे पावतो म्हणून याला रोकडेश्वर म्हणतात. गावाच्या पश्चिमेस भैरवनाथाचे मंदिर आहे तर पूर्वेस विठ्ठल मंदिर आहे. कमंडलू नदीच्या किनारी राम मंदिर, महादेव मंदिर शेजारीच विठ्ठल मंदिर व राधाकृष्ण स्वामी मंदिर उभे आहे. रहिमतपूर नगरीच्या स्थापनेबरोबरच या मंदिरांची स्थापना करण्यात आली आहे. इतिहासाचे जिवंत साक्षीदार म्हणून रणदुल्लाखानाचा दर्गा व मशिद या इमारती अजूनही दिमाखात उभ्या आहेत. दर्गा व मशीद यांच्यामध्ये एक कारंजे होते. या कारंजाला पाणी मिळण्यासाठी हत्तीच्या सहाय्याने ओढणारी मोट बांधली होती. त्या हत्तीच्या मोटेचे अवशेष आज रहिमतपूर येथे आहेत.
छत्रपती शाहू महाराजांच्या काळात अत्यंत गजबजलेली व्यापारी पेठ म्हणून रहिमतपूरचे नाव मोठे होते. त्याच काळात चलनात वापरणारी नाणी पाडण्याची टांकसाळ येथे होती. तर तत्कालीन रणधुरंधर सरदार फत्तेसिंह माने यांच्या शौर्याने रहिमतपूरचा शौर्याचा इतिहास धगधगता राहिला होता. कृषी, क्रीडा, उद्योग, शिक्षण यात रहिमतपूर अत्यंत प्रगत आणि अग्रेसर. साहित्याच्या तेजस्वी तारा कवी गिरीश रहिमतपूरचेच. कवी गिरीश यांचे मन आणि विचार आपल्या गावाच्या अभिमानाने भारावलेले होते. म्हणूनच त्यांनी रहिमतपूरचा नैसर्गिक परिसर त्यांच्या काळातील निसर्गनिर्मित वातावरण, नद्या, नाले, ओढे, डोंगर, टेकड्या, आमराई, पाणवठे, शेतीवाडी या अस्सल ग्रामीण संस्कृतीचे दर्शन आपल्या कवितेतून व ललित वाङ्मयातून समाजापुढे आणले. आणि त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. रहिमतपूरसारखे एक छोटेसे गाव साहित्याच्या रंगमंचावर आणले. कमंडलू नदीचा निसर्गरम्य परिसर त्यांच्या काव्यपंक्तीने व विचारधारेने प्रभावित केला.
तर “रायगडाला जेव्हा जाग येते ” या महान नाटकाची निर्मिती करणारे पद्मश्री पुरस्कार मिळालेले वसंत कानेटकर याच भूमीतले. आयुष्यातले तब्बल अर्धशतक मराठी रंगभूमी गाजवणारे लोकप्रियतेचा उच्चांक मोडणारी चाळीसहून अधिक नाटके वसंत कानेटकर यांनी लिहिली. त्यामध्ये ‘लेकुरे उदंड झाली,’ ‘मत्स्यगंधा ‘ ‘देवांचे मनोराज्य’ ‘प्रेमा तुझा रंग कसा ‘ ‘ प्रेमाच्या गावा जावे, ‘ ‘ तुजा तू वाढवी राजा’ ‘अश्रूंची झाली फुले ‘ ‘ घरात फुलला पारिजात ‘ ‘हिमालयाची सावली ‘ ‘ वादळ माणसाळते ‘ ‘ विश्ववृक्षाची छाया ‘ अशी अनेक अजरामर नाटके त्यांनी रंगभूमीवर आणली.
नाट्य क्षेत्रातले आंतरराष्ट्रीय नाटककार गोपू देशपांडे, चित्रपटात नाव कमावलेल्या पद्मा चव्हाण, बेबी शकुंतला, ज्योती सुभाष, अमृता सुभाष याच मातीतल्या. तर सध्याच्या आघाडीच्या गायिका बेला शेंडे व सावनी यांचे नातंही याच नगरीशी. आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ज्ञ म्हणून ज्यांचा नावलौकिक संपूर्ण देशात आहे ते डॉ. राजेंद्र शेंडे रहिमतपूरचेच. तर सध्याच्या पिढीतील प्रसिद्ध इतिहास संशोधक व व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील घडले रहिमतपूर नगरीत. तेजस्वी वाणीने छत्रपती शंभूराजे यांचा धगधगता इतिहास समाजासमोर आणण्याचे काम प्रा. बानगुडे पाटील यांनी केले. ऑलिम्पिकमध्ये पदक कमावलेले कुस्तीगीर बाबूराव चव्हाण यांची ही नगरी. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंची ही कर्मभूमी. समाजवादी नेते अण्णा देशपांडे तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पत्री सरकारच्या माध्यमातून इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणारे स्वातंत्र्यसैनिक सोपानराव घोरपडे याच मातीतले.
एवढा मोठा प्रचंड आणि उदंड वारसा लाभलेली ही नगरी भूतकाळातील वैभवाची परंपरा अखंडित राहवी यासाठी रहिमतपूरमधील सर्व जण राजकीय, सामाजिक व वैयक्तिक द्वेष बाजूला ठेवून फक्त रहिमतपूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करत आहेत. म्हणून आजचं डोळ्यासमोर दिसणारे दिमाखदार आणि सुंदर रहिमतपूर शहर आकाराला येत आहे. ऐतिहासिक काळामध्ये रहिमतपूर व्यापाराचे मोठे केंद्र होते. पुढील काळात ब्रिटीशांच्या साम्राज्यात 1853 मध्ये ब्रिटिश सरकारने लोकसंख्येच्या आधारित रहिमतपूरला नगरपालिका केली. रहिमतपूर ही आशियातील पहिली ग्रामपंचायत होती तर महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका झाली होती. परंतु नंतरच्या कालावधीत शहराचा विस्तार न झाल्यामुळे लोकसंख्या मर्यादित राहिली व विकासाचा वेग काहीसा मंदावला गेला. परंतु, तरीही प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष सरदार बाबासाहेब माने, कै. गुलाबराव माने, संपतराव माने, वासुदेव माने व अलीकडच्या काळातील सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली रहिमतपूर शहराचा सर्वांगीण विकास होत राहिला. रहिमतपूरचे सुपुत्र व पर्यावरण तज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांनी ‘रोल मॉडेल रहिमतपूर’ ही संकल्पना मांडली. त्यासाठी आयआयटीयन्सच्या संकल्पनांतून विकासाच्या कल्पना मांडल्या. संपूर्ण रहिमतपूरकरांनी त्यास उदंड प्रतिसाद दिला. आणि त्याचे फलित म्हणून आजचे स्वच्छ व सुंदर रहिमतपूर दिसून येत आहे.
रहिमतपूर शहराचा साहित्यिक ठेवा जपणाऱ्या हिंद वाचनालयाची स्थापना १९५२ मध्ये झाली. तेव्हापासून रहिमतपूरच्या साहित्य क्षेत्रात मोलाचे स्थान ठरणाऱ्या या हिंद वाचनालयात आजअखेर हजारो ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध आहेत. डॉ. देशपांडे यांच्या घराच्या छोट्याशा जागेत सुरू असलेले वाचनालय सध्या नगरपालिकेकडे वर्ग झाले असून नगरपालिकेच्या अतिशय देखण्या इमारतीत वाचनालय व स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू झाले आहे. आज या स्पर्धा परीक्षा केंद्रात परिसरातील विद्यार्थी अभ्यास करत आहेत. त्याचबरोबर येथे उमाताई कानेटकर ग्रंथालय व अभ्यासिकेची सोय करून रहिमतपूरच्या साहित्य क्षेत्रात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे.
रहिमतपूर नगरी, आसपासचा परिसर व भूमीही मंतरलेली स्फूर्तीदायक व कोणालाही प्रेरणादायक अशी भूमी आहे. पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक, अध्यात्मिक तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशी मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या अनेकविध घटना येथे घडल्या. देवदरी येथील श्री कार्तिक स्वामी मंदिर, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे शिष्य संत बहिणाबाई, समर्थ रामदास स्वामी, श्री राधाकृष्ण स्वामी, मुस्लिम समाजातील थोर साधू मिरासय्यद हुसैनी व आधुनिक संत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने परिसरातील मातीचा कण पावन झाला आहे.
रहिमतपूर शेजारील ब्रह्मपुरी येथे पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. या परिसरात अध्यात्मिक महात्म्य असल्यामुळे भाविकांचे श्रद्धास्थान बनलेले आहे. संत गाडगेबाबा यांनी या ठिकाणी कीर्तन केल्याचा उल्लेख कागदपत्रात दिसून येतो. यावरूनच याठिकाणी संत गाडगेबाबा आश्रमशाळा समाजातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची सोय करीत आहे. रहिमतपूर येथील डॉ. वा. गो. तथा काका परांजपे यांनी रहिमतपूरच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. पंचक्रोशी शिक्षण संस्था स्थापन करून त्यांनी रहिमतपूरसह परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. हा शिक्षणाचा वारसा कै. सरदार बाबासाहेब माने यांनी पुढे सुरु ठेवला.
तर सध्या सौ. चित्रलेखा माने कदम या संस्थेच्या अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्याचबरोबर 1968 मध्ये रहिमतपूरमध्ये आदर्श शिक्षण संस्थेचा उदय झाला. रहिमतपूरमधील अनेक मान्यवरांनी ही शिक्षण संस्था उभी करून परिसरातील विद्यार्थ्यांना साक्षर करण्याचा विडाच उचलला होता. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष नंदकुमार माने यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेत पहिली ते बारावीपर्यंत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रहिमतपूरकडे विद्यार्थ्यांचा वाढता प्रभाव पाहून रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष कै. गुलाबराव माने यांनी कमंडलू शिक्षण संस्था उभी केली. सुरू असलेल्या दोन शिक्षण संस्थांमध्ये परिसरातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींची जागेअभावी सोय होत नव्हती. यासाठी त्यांनी कमंडलू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाव देण्याचा प्रयत्न केला. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची गरुडझेप सुरूच आहे. जसजशी रहिमतपूरच्या मातीत शिक्षणाची प्रगती होऊ लागली तसतसे पंचक्रोशीबरोबरच बाहेरचेही विद्यार्थी शिक्षणासाठी रहिमतपूरकडे वळू लागले. त्यांची गरज लक्षात घेता अरुण माने, सौ. आशाताई भोसले, सौ. मालती पवार, आशालता माने व केशवराव माने यांनी चौंडेश्वरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. या शिक्षण संस्थेमधून गेलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत अधिकारी म्हमून कार्यरत आहेत.
तसं पाहायला गेलं तर रहिमतपूर नगरपालिका असूनही नगरपालिकेच्या स्थापनेपासून नगरपालिकेचे कार्यालय एका भाड्याच्या इमारतीतच होते. तत्कालीन नगराध्यक्ष सुनील माने यांनी कै. आर. आर. आबा, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रहिमतपूरसाठी अतिशय भव्य दिव्य अशी नगरपालिकेची इमारत उभी केली. नगरपालिकेचा विकास झाला. परंतु, इतर शहराच काय? असा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहत होता. रहिमतपूरच्या बरोबर मधूनच एक ओढा वाहत होता आणि त्याची दुर्गंधी संपूर्ण शहरांमध्ये पसरत होती. नगरपालिकेने पहिले काम हाती घेतले असेल तर हा ओढा बंदिस्त करण्याचे. शासनाकडून निधी मिळवून शहराच्या बरोबर मध्यातून वाहणाऱ्या ओढ्यावर बांधकाम करून हा ओढा पूर्णपणे बंदिस्त करून घेतला. ओढ्याच्या काठावरील रिकाम्या जागेत व्यापारी गाळे बनवण्यात आले. तर वीरशैव लिंगायत समाज मठाच्या शेजारील रिकाम्या जागेवर भाजी मंडईसाठी सुसज्ज इमारत उभी करण्यात आली. केसरी पूल ते गांधी चौक दरम्यानचा रस्ता अतिशय अरुंद होता. एका वेळी एकच वाहन रस्त्यावरुन जात होते. या रस्त्यावर वाहतुकीची खूप मोठी समस्या नेहमीच उभी राहत होती.
याचा विचार करून नगरपालिकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव ठेवला आणि खरं तर ही मोक्याची जागा असूनही रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या व्यावसायिकांनी कोणतीही तक्रार न करता आपापली दुकाने, घरे तोडली व रस्ता रुंद केला. विशेष बाब म्हणजे याच रस्त्यावर असणाऱ्या जैन मंदिराचा पुढचा भाग काढून घेण्यास येथील जैन समाजाने टाळाटाळ केली नाही. त्यामुळे रस्ता रुंद होण्याबरोबरच त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाळ्यांची निर्मिती होऊन व्यवसाय जास्तच वाढला.
आजच्या घडीला रहिमतपूर शहराचा सर्वांगीण विकास होत असतानाच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती सुरूच आहे. रहिमतपूर शहराच्या प्रगतीसाठी अनेकांनीच योगदान दिले आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या राबविण्यात येणाऱ्या सर्वच योजनांमध्ये रहिमतपूरमधील नागरिक हिरीरीने भाग घेत आहेत. माझी वसुंधरा अभियान असो की स्वच्छ व सुंदर रहिमतपूर अभियान असो, रहिमतपूरमधील प्रत्येक नागरिक माझे स्वतःचे कर्तव्य, माझे स्वतःचे काम, माझे स्वतःचे घर म्हणून कष्ट करताना दिसत आहे. परिणामी गेल्या काही वर्षांपूर्वी दिसणारे रहिमतपूर व सध्याचे दिसणारे रहिमतपूर यात जमीन आसमानचा फरक आहे. आपलं रहिमतपूर- सुंदर रहिमतपूर हा ध्यास घेऊन रहिमतपूरचा नागरिक दररोज शहराच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे.
पालिकेचे योगदान मोठे
केंद्र शासनामार्फत दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये रहिमतपूर नगरपालिकेने पुन्हा एकदा सलग तिसऱ्यांदा GFC कचरा शहर 3 स्टार मानांकन प्राप्त केले. तसेच हागणदारीमुक्त शहर दर्जा ODF ++ प्राप्त झाला. स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत देशाच्या पश्चिम विभागात महाराष्ट्र, गोवा, गुजरात मध्यप्रदेश या चार राज्यांचा समावेश आहे. यामध्ये 15000 ते 25000 लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये देशाच्या पश्चिम विभागातील एकूण 325 शहरांचा शहराचा सहभाग आहे. या सर्व शहरांमधून रहिमतपूर शहराने 37 वा क्रमांक पटकावला आहे. यापूर्वी रहिमतपूर नगरपरिषदेने वर्ष 2021, 2022 आणि 2023 मध्ये सलग तिसऱ्यांदा 3 स्टार ⭐ ⭐⭐ मानांकन प्राप्त केले आहे. याही वर्षी 2024 ला मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रहिमतपूर नगरपरिषदेने जोरदारपणे स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2024 आणि माझी वसुंधरा अभियान 4.0 अंमलबजवणीसाठी तयारी सुरू केली आहे. रहिमतपूर शहर GFC 5 स्टार व वॉटर प्लससाठी तयारी करत आहे. तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्येही रहिमतपूर नगरपरिषदेला बेस्ट सिटी फॉर सिटीझन फीडबॅक हा पुरस्कार मिळाला .