सातारा : सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या कस्तुरबा रुग्णालयासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेला अद्याप एमबीबीएस डॉक्टर मिळेनासा झाला आहे. जाहिरात देऊन आता तीन आठवडे उलटत आले तरीसुद्धा या जाहिरातीला प्रतिसाद न मिळाल्याने एमबीबीएस डॉक्टर शोधण्याची मोहीम थंडावत चालली आहे. परिणामी येथील रुग्णालयांमध्ये ऑन कॉल डॉक्टरांवरच सध्या आरोग्य यंत्रणेला रुग्णसेवेचा गाडा हाकण्याची वेळ आली आहे.
सातारा शहराच्या भवानी पेठेतील कस्तुरबा रुग्णालयाची सातारकरांच्या तीन पिढ्यांशी जुनी नाळ आहे. 2010 पर्यंत हे रुग्णालय सातारा नगरपालिकेच्या ताब्यात होते येथील वैद्यकीय अधिकारी निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत हे रुग्णालय जिल्हा परिषदेकडे वर्ग झाले. दोन वर्षांपूर्वी कोविड काळातही येथे ऑक्सिजन बेडची सोय करण्यात आली होती. आरोग्य यंत्रणेने लक्ष दिले तर कस्तुरबा रुग्णालयाचा प्रभावित्या वापर होऊ शकतो .
मात्र येथे एमबीबीएस डॉक्टर नसल्यामुळे परळी तसेच लगतच्या चाळीसहून अधिक गावातून येणार्या रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. येथे रुग्णसेवेची सकाळी दहा ते एक आणि संध्याकाळी चार ते सात अशी वेळ आहे. मात्र तात्पुरत्या स्वरूपातील डॉक्टर वेळेवर येत नसल्याची येथे तक्रार आहे. पूर्णवेळ एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्यामुळे रुग्णांना रुग्णसेवा मिळत नाही. येथील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून खोकल्याच्या औषधांसाठी घरून बाटल्या घेऊन या अशी उद्धट उत्तरे दिली जातात याबाबत शिवसेना उबाठा गटाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.
सातारा शहर संघटक प्रणव सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीपे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर आरोग्य यंत्रणेने एमबीबीएस डॉक्टर हवे आहेत, अशी जाहिरात सुद्धा काढली. तीन आठवडे उलटले तरी अद्यापही या जाहिरातीला कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. एमबीबीएस न मिळाल्यास बी ए एम एस डॉक्टरचा पर्याय पुढे येऊ शकतो. मात्र, त्यासाठी मुलाखतीचे सोपस्कार पार पाडावे लागतील, असे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
डॉक्टर उपलब्ध करून द्या अन्यथाआंदोलन
रुग्णांना चांगली सेवा मिळावी इतकीच सातारकरांची माफक अपेक्षा आहे मात्र आरोग्य अधिकारी एमबीबीएस डॉक्टर असेल तर तुम्हीच एखादा डॉक्टर सुचवा असे प्रत्यक्षपणे सांगून आपली हतबलता दर्शवत आहेत आरोग्य यंत्रणेची नकारघंटा ही येथील रुग्णसेवेच्या मुळावर येणारी आहे या संदर्भात आरोग्य यंत्रणेने तातडीने डॉक्टर उपलब्ध करून द्यावा अन्यथा पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा प्रणव सावंत यांनी दिला आहे