वाठार स्टेशन – सध्या कडाक्याची थंडी असल्याने मुंबईच्या अक्षय- शक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने गोरगरिबांना थंडीपासून संरक्षण होण्यासाठी ब्लॅंकेटचे तसेच धान्य, किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले.
अक्षय- शक्ती ट्रस्टच्यावतीने नेहमीच गोरगरिबांना व विद्यार्थी विद्यार्थिनींना मदतीचा हात देण्यात येतो. बिचुकले (ता. कोरेगाव) येथील मुलींना देऊरच्या शाळेत शिक्षणासाठी चालत जावे लागत असे. मुलींची फरफट बंद व्हावी यासाठी ट्रस्टने काही दिवसांपूर्वी ४० सायकलींचे वाटप केले होते. या ट्रस्टमार्फत समाजोपयोगी कामे केली जातात.
अशाच प्रकारे दि. २१ जानेवारीला बिचुकले परिसरातील तसेच देऊर व इतर गावांतील गोरगरीब, ऊसतोड कामगारांना ट्रस्टच्यावतीने थंडीसाठी संरक्षण व्हावे याकरिता घरोघरी जाऊन तसेच ऊसतोड करणाऱ्या कामगारांच्या फडावर जाऊन ब्लॅंकेटचे तसेच धान्य, किराणा वाटप करण्यात आले. ट्रस्टच्या माध्यमातून जानाई देवीस सढळ हाताने मदत केली जाते.
यावेळी बिचुकलचे सरपंच प्रशांत पवार, पंचायत समितीचे माजी सदस्य विलास पवार, शिवसेना तालुका उपप्रमुख चंद्रकांत पवार, संजय पवार, विजय पोरे, हेमलता पोरे, हंबीरराव कदम, सुरेश जाधव, अजित कदम, ग्रामपंचायत सदस्य संतोष जाधव तसेच देऊर, बिचुकले दोन्ही गावाचे आजी- माजी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.