आसनगाव, कुमठेसह परिसरातील गावांपुढे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
सातारा – आसनगाव-कुमठेसह परिसरातील लहान मोठ्या गावांची शेतीसह पिण्याच्या पाण्याची तहान भागविणाऱ्या मापारवाडी तलावातील पाणी पातळी गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात घटली आहे. गत आठवडाभरात जिल्ह्याचे तापमान चांगलेच वाढले असून दिवसेंदिवस वाढत असलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे पाणीपातळीतही झपाट्याने घट होत असल्याने आसनगाव-कुमठेसह परिसरातील गावांना पाणीटंचाईच्या संकटाचा सामाना करावा लागणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यासह सातारा जिल्ह्यातील तापमानातही मोठी वाढ झाली आहे. त्यातच येत्या चार-पाच दिवसांमध्ये तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सध्या जिल्ह्याचे तापमान 40 अंशांवर जात आहे. तापमान वाढीचा मोठा परिणाम जिल्ह्यातील पाणी स्त्रोतांवर झाल्याचे दिसत आहे. सातारा तालुक्यातील आसनगाव-कुमठे दरम्यान मापारवाडीचा मोठा तलाव असून या तलावातील पाण्यावर परिसरातील शेती अवलंबून आहे.
तसेच तलावातील पाण्यामुळे परिसरातील विहिरी तसेच बोअरवेललाही मुबलक पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटत आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये तापमान होत असलेल्या वाढीचा तलावातील पाणीपातळीवर परिणाम झाल्याचे पहावयास मिळत आहे.
अवघ्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये मापारवाडी तलावातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सध्या मार्च महिन्याचे अखेरीचे दिवस असले तरी एप्रिल आणि मे हे दोन्ही महिने कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने मापारवाडी तलाव तळ गाठण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांना पाणीसंकटाचा सामना करावा लागणार आहे.
तलावात असलेल्या मुबलक पाण्यामुळे परिसरातील शेतकरी बागायती शेतीकडे वळला असून सध्या अनेक शेतकऱ्यांनी ऊसासह उन्हाळी सोयाबीन, व भाजीपाल्याच्या पिकांची लागवड केली आहे. मात्र पाणी कमी पडत असल्याने ही शेतीही धोक्यात आली आहे. एकंदरीतच दिवसेंदिवस वाढत असलेल्या उन्हाळ्याच्या झळा तीव्र होऊ लागल्याने आसनगाव, कुमठे, मापारवाडीसह तलावाच्या पाणीवर अवलंबून असणाऱ्या परिसरातील अन्य गावांवरील पाणीसंकट गडद होताना दिसत आहे.