पुणे -करोना काळातही वेगळे तंत्र शोधत विद्यापीठाने अतुलनीय कामगिरी बजावली आहे. आज करोना हरतोय आणि आपण जिंकत आहोत. नवी पहाट होतेय. महाविद्यालये व विद्यापीठात पुन्हा विद्यार्थी आले आहेत. शिक्षणाची ही गंगा अशीच वाहत राहील. कदाचित पुन्हा संकटे येतील. पुन्हा आपणच जिंकू आणि नवे मापदंड प्रस्थापित करू. विद्यापीठाची ऊर्जितावस्था अशीच तेजोमय आणि संस्मरणीय ठरण्याचा विश्वास कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिला. पाच वर्षांच्या कारकिर्दीतील अंतिमच्या अधिसभेत डॉ. करमळकर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
डॉ. करमळकर यांनी आपल्या मागील पाच वर्षांच्या कार्याचा अहवाल अधिसभेसमोर सादर केला. ते म्हणाले, विद्यापीठ समाजाभिमुख संशोधन, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम, नवनवीन अभ्यासक्रम राबविण्याबाबत नेहमीच प्रयत्नशील असते. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यापीठाने 20 आंतरराष्ट्रीय व 93 राष्ट्रीय स्तरावरील संस्था व विद्यापीठे यांच्यासमवेत करार केले. मागील काही वर्षांत 58 पदवी अभ्यासक्रम, 43 पदव्युत्तर अभ्यासक्रम, 65 प्रमाणपत्र अभ्यासक्रम व 60 पदविका अभ्यासक्रम सुरू केले आहेत. विद्यापीठाने कतार या देशात दोहा या ठिकाणी कॅम्पस सुरू केला आहे. या ठिकाणी चार पदवी अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाच वर्षांच्या काळात कोविडची आपत्ती ही विद्यापीठासाठी आव्हानांसोबत संधीही घेऊन आली. शिक्षण, कला, साहित्य, क्रीडा, उपयोजित विज्ञान-नैसर्गिक शास्त्रे, तंत्रज्ञान, कौशल्यविकास, विद्यार्थी विकास आणि सामाजिक सेवा या सर्व आघाड्यांवर विद्यापीठाने अतुलनीय कामगिरी बजावल्याचे कुलगुरू डॉ. करमळकर यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर “सिर्फ हंगामा खडा करना हमारा मकसद नाही, हमारी कोशिश है की ये सुरत बदलनी चाहिए’ अशी आपली तळमळ असल्याचे ते म्हणाले.