सातारा – साताऱ्यात ठेकेदारी, कंत्राटीकरण पद्धतीमुळे कामगार अखेरची घटका मोजत आहे. असाच प्रकार सातारा नगरपालिकेत पाहण्यास मिळत असून ठेकेदारी पद्धतीमुळे कामगारांना किमान वेतन व बोनस न दिल्याने अखेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) रोजगार आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष गणेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे कंत्राटी कामगारांनी धाव घेतली आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनात म्हटले आहे की, कामगार किमान वेतन कायद्यानुसार वेतन वाढीची मागणी केलेली आहे. परंतु, अनेकदा आंदोलन करूनही ठेकेदार हा कामगारांच्या विविध मागण्यांबाबत चाल ढकलपणा करत आहेत. त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असून दोन महिने वेतनच न मिळाल्याने सर्वच कामगार दिवाळीच्या सणाला नाराज झालेले आहेत.
सातारा नगरपालिकेच्या सर्व विभागाचे ठेकेदार यांच्यासोबत कंत्राटी कामगार कायदा, किमान वेतन कायदा, द पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट 1965 च्या संदर्भ घेऊन लोकशाही मार्गाने रीतसर चर्चा करण्यात आलेली आहे. संबंधित सहाय्यक कामगार आयुक्त व इतरांना त्याची सखोल माहिती देण्यात आलेली आहे.
या गोष्टीला दोन महिने होऊनही संबंधित ठेकेदार, अधिकारी व इतर विभागातील अधिकारी फारसा प्रतिसाद देत नसल्याने अशिक्षित व कष्टकरी कामगारांना न्यायासाठी उपाशी राहून शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे. या ठेकेदार पद्धतीने काम करणारे कामगार हे अशिक्षित व संख्येने कमी असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय व त्यांना हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. या कामगारांच्या न्याय हक्कासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) रोजगार आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष गणेश वाघमारे, शहराध्यक्ष अजय घाडगे कार्याध्यक्ष संदीप झोंबडे हे लढत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
यावेळी कंत्राटी कामगार महिला नीता आवळे, सीमा जावळे, कमल बडेकर, रिना बोभाटे, सुनीता कांबळे, कविता साठे, रंजना ढेंबे, सुमन खवळे, सावित्री वाघमारे, रेखा भोसले, अलका चव्हाण, मंगल पवार, हिराबाई पवार, मीना साठे, शोभा बाबर, अनिता कुचेकर, ममता पवार, नीता अवघडे, संगीता रणदिवे, सुनिता खंडझोडे, प्रथमेश माने, सुरेखा बडेकर, आशा चव्हाण, रूपा अडागळे उपस्थित होते.