रांची – झारखंड मध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री रघुबर दास यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांना भाजपचेच बंडखोर उमेदवार सरयु रॉय यांनी पराभूत केले आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांना पराभूत करणारे रॉय हे झारखंड मधील केवळ दुसरे उमेदवार ठरले आहेत. या आधी तत्कालिन मुख्यमंत्री शिबु सोरेन यांना सन 2009 च्या निवडणुकीत गोपाल कृष्ण पातर यांनी पराभूत केले होते.
पुर्व जमशेदपुर मतदार संघात रॉय यांनी मुख्यमंत्री दास यांचा तब्बल 12 हजार मतांनी पराभव केला. वास्तविक रघुबर दास यांचा या मतदार संघात मोठा प्रभाव होता व ते सन 1995 पासून या मतदार संघातून सतत निवडून येत असत.पण त्यांना त्यांच्याच मंत्रिमंडळातील एका बंडखोर मंत्र्याने पराभूत केले. सरयु रॉय हे दास यांच्याच मंत्रिमंडळात गेली पाच वर्षे अन्न व पुरवठा विभागाचे मंत्री म्हणून कार्यरत होते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन थेट मुख्यमंत्र्यांनाच त्यांच्या मतदार संघात आव्हान दिले होते.