नाशिक – “छत्रपतींनी जी मंदिरे वाचवली त्या छत्रपतींना शिकविण्याचे धाडस करु नका,’ अशा शब्दांत संयोगिताराजे छत्रपती यांनी काळाराम मंदीरातील पुराणोक्तपद्धतीने मंत्र म्हणणाऱ्या महंतांविरुद्ध आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान, श्रीराम नवमीच्या निमित्ताने कोल्हापूर गादीचे संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी असणाऱ्या संयोगिताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली. महंतांनी पूजा पुराणोक्तपद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले. त्यास महंतांनी विरोध केल्याने संयोगिताराजे चांगल्याच संतापल्याचे पहायला मिळाले. हा सगळा प्रकार संयोगिताराजे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नेमके काय घडले?
नाशिकच्या काळाराम मंदिरातील महंतांनी दर्शनासाठी आलेल्या संयोगिताराजे यांच्यासमोर पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. पण कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशा मुळे मी ठामपणे विरोध केला अशी पोस्ट संयोगीता राजे छत्रपती यांनी केली आहे. पूजेदरम्यान काळाराम मंदिरातील महंतांनी संयोगीताराजे यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला होता. त्यावेळी संयोगिताराजे छत्रपती यांनी महंतांना खडे बोल सुनावत रामरक्षा म्हटली.
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
हे श्रीरामा,
स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणार्या,परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणार्यांना सद्बुद्धि दे…
हीच आमची प्रार्थना,अन हेच आमुचे मागणे,
माणसाने माणसाशी माणसासम वागणे..
View this post on Instagram
आपण सर्वजण देवाची लेकरे….आणि लेकरांनी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी?या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक असे निर्णय घेतले होते. त्यांचा वैचारीक वारसा चालवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जे आत्मबल प्राप्त झाले त्यामुळेच परवा नाशिकमध्ये काळा राम मंदिरात महा मृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले.
नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशा मुळे मी ठामपणे विरोध केला.अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला.शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणुन त्यांनी प्रश्न केलाच… तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली.
या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही?
अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे…
अजूनही खूप प्रवास बाकी आहे…अजून खूप चालावे लागणार आहे… हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे!, असे इस्टाग्राम पोस्टमध्ये संयोगिताराजेंनी म्हटले आहे.