नगर – शिक्षणाच्या सर्वस्तरांवर आणि विशेषत: उच्च शिक्षणातील डिग्रीस्तरावर भारतीय सांस्कृतिक मुल्यांची माहिती करुन देऊन पुढील पिढ्यांना संस्कारित करण्यासाठी शासनाने अभ्यासक्रमात संत वाङमयाचा अभ्यासक्रमेत्तर अभ्यास उपक्रमात समावेश करण्याचे ठरविले आहे. आध्यात्मज्ञान पूर्वक जगण्याने आणि व्यवहार ज्ञान यांच्या समन्वयाने सुजाण नागरिक बनण्याची प्रक्रिया घडेल. हजारो शाळा, महाविद्यालये आणि वाचनालये यात अशा ग्रंथांची उपलब्धी करुन देण्यासाठी शासन पुढाकार घेईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
प्राचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे लिखित ‘समन्ययी संत शेख महंमंद यांची अमृत अभंगवाणी’ आणि संत एकनाथ महाराजांचा सार्थ हरिपाठ या डॉ. मुकुंद दातार लिखिल व गंधर्ववेद प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांचे प्रकाशन मंत्री पाटील यांच्या हस्ते पुणे येथील गीताधर्म मंडळात झाले. याप्रसंगी राष्ट्रीय किर्तनकार चारुदत्त आफळे, संत विचारांचे अभ्यासक प्रा. अभय टिळक, साहित्य परिषदेचे अध्यक्ष विनायक पवळे, प्रा.ऋता ठाकूर, उषा सहस्त्रबुद्धे, प्रा. स्फुर्ती देशपांडे, प्रदीप नाईक, सुदर्शन देशपांडे, सुहास शाळीग्राम आदि उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांना जोडणारा दुवा संत एकनाथ आणि संत शेख महंमद यांनी जगायचे कसे या विषयी मार्गदर्शन केले.दोन्ही पुस्तकांचे लेखक संत साहित्याचे उवम अभ्यासक आहेत. सम्यक दृष्टीने आणि संशोधनपूर्वक लिहिलेले हे ग्रंथ, संतांनी भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म यातील उदार, समन्वयी, विश्वात्मक जीवन व्यवहाराविषयी प्रबोध केला आहे.
याप्रसंगी अध्यात्मिक परिभाषा, हिंदू-मुस्लिम जीवन व्यवहार यांचे संदर्भ स्पष्ट करीत समन्वयी संत शेख महंमद यांची अमृत अभंगवाणी’ किर्तनकार, प्रवचनकार आणि अभ्यासक यांना सुलभ व वाचनीय भाषेत डॉ.सहस्त्रबुद्धे यांनी उपलब्ध करुन दिली आहे. साहित्य संस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांनी दोन्ही पुस्तकांतील समन्वय दृष्टीने उल्लेखांकडे लक्ष वेधले तर डॉ.सहस्त्रबुद्धे आणि डॉ. दातार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.