प्रशांत मोरे-देहूकर
फाल्गुन वद्य द्वितीया अर्थात तुकाराम बीज हा संत तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठगमन दिवस. या पवित्र दिवसाचे औचित्य म्हणून देहूमध्ये आणि महाराष्ट्रात हा दिवस मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा होत आहे. या अनुषंगाने संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेच्या माध्यमातून दिलेला उपदेश आणि व्यवस्थापन संबंधी मार्गदर्शन या लेखातून मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.
संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दरवळ आजही आसमंतात भरून राहिला आहे. सरलता आणि परखडता हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे. स्वानुभव आणि त्यांच्या संवेदनशील मनाने केलेले सूक्ष्म निरीक्षण हा अभंगातील आत्मा आहे.
अनुभव आले अंगा। ते या जगा देतसे।।
तुकोबांनी अभंगातून आत्मबोध, आत्मशोध, आत्मज्ञान, वेदांत आणि सामाजिक व्यवस्थापन याचा साकल्याने सखोल विचार मांडला. साध्य, साधन आणि वैश्विक सिद्धांत त्यांच्या काव्यातून सहज प्रकट होतात. गाथा एक शास्त्र आणि ज्ञानाची वेदशाखा आहे, म्हणूनच तुकाराम गाथेला पंचमवेद किंवा तुकोपनिषद म्हणतात. तुकोबांचा प्रापंचिक आणि सामाजिक जीवनोपदेश सर्वसामान्यांच्या हिताचाच आहे. सतराव्या शतकातील आनंदी जीवनाचे हे अक्षर वाङ्मय आजही काळाच्या मर्यादा ओलांडून आपलेसे वाटते.
बोलणे ते आम्ही बोलो उपयोगी। पीडले प्रसंगी काळा ऐसे।।
हा पंचमवेद शब्दांच्या रत्नांमुळे मराठी मनाशी संवाद साधत आहे. प्रापंचिक किंवा सामाजिक जीवन जगताना मनःस्थिती शांत ठेवून प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्याचे व्यवस्थापन कौशल्य तुकोबांनी या जगाला दिले आहे.
मनाचे व्यवस्थापन हे तुकोबांनी मनाला स्पर्श करणाऱ्या सुंदर शब्दांत मनापासून मनापर्यंत पोहोचवले आहे. चित्त समाधानी न ठेवता निरर्थक चिंता केल्यावर दुःख भोगावेच लागते. त्यामुळे आलेल्या संकटाशी आनंदाने सामोरे जावे आणि जीवनात तरून जावे.
मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण मनमोकळे राहिल्याने मन प्रसन्न होते. मन प्रसन्न असेल तरच जीवनात चैतन्य संचारते. मन प्रसन्न असेल तरच जीवनात सिद्धी, मोक्ष, सुख आणि समाधान प्राप्त होते. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशाचे गमक मन हेच आहे. मन हे एक दैवत आहे. त्यामुळे त्याची आपण मनोभावे पूजा करायला हवी. मन हेच गुरू-शिष्य आणि माऊली सकळांची अशी मनाला साद घालून कोणाताही वाद न घालता मनाशी संवाद करण्यासाठी प्रवृत्त करतात.
ज्याचे जया ध्यान। तेचि होय त्याचे मन।
आपण आज विचार करतो तसेच आपले मन तयार होते. तुमचे आजचे अस्तित्व हे तुमच्याच मनाच्या विचारांची परिस्थिती आहे. त्यामुळे दुसऱ्याला दोष देऊ नये. अर्थात, आपले गुणदोषयुक्त मनच आपला मित्र वा शत्रू आहे.
केला पाहिजे विचार। मन मित्र दावेदार।।
तणाव व्यवस्थापन संबंधित आपले वैचारिक भूमिका स्पष्ट करताना तुकोबांनी काही अभंगातून मोलाचा संदेश दिला आहे.
न लगे द्यावा जीव सहजचि जाणार। आहे तो विचार जाणा काही।।
प्रत्येक व्यक्तीला विहीत कर्म करीत असताना अनेक ताणतणाव सहन करून जीवन व्यतीत करावे लागते; परंतु काही मानसिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती आत्महत्येसाठी प्रवृत्त होतात. तुकोबा म्हणतात, क्रोधामुळे किंवा तणावग्रस्त परिस्थितीमुळे आत्महत्या करू नये कारण आपला जीव कधी ना कधी तरी जाणारच आहे. या भूतलावर कोणीही अमर नाही, मरण हे अटळ आहे. त्यामुळे सकारात्मक उद्देश ठेवून सत्कार्य करण्याचा विचार करून मरून जाण्यापेक्षा जीवनात तरून जावे. या अमूल्य देहाचे सोने करणं आपल्याच स्वहिताचे आहे असे महाराज निक्षून सांगतात. मरणाचा विचार करण्यापेक्षा आला तो दिवस आनंदाने जगण्याचा अट्टहास हवा कारण कोणता दिवस शेवटचा आहे हे कधी कुणाला कळत नाही.
याजसाठी केला होता अट्टहास।
शेवटचा दिस गोड व्हावा।।
तुकोबांनी कर्जामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रसंगी शेतकऱ्यांची सर्व गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत विसर्जित केली आणि त्यांना सावकारी पाशातून मुक्त करून आत्महत्येपासून प्रवृत्त केले. निर्णय व्यवस्थापन यावर देखील तुकोबांनी अभंगातून प्रकाश टाकला आहे.
सत्य असत्याशी मन केले ग्वाही। मानियेले नाही बहुमता।।
सांप्रत काळातील समाज माध्यम आणि तणावग्रस्त जगात कोणता योग्य निर्णय घ्यावा. याची शहानिशा करता येत नाही. मनाची द्विधा अवस्था होते. निर्णय क्षमता कशी वाढवावी यासाठी निर्णय व्यवस्थापन या अंतर्गत प्रशिक्षण दिले जाते. बहुमत काय आहे हे महत्त्वाचे नाही तर सत्य काय आहे हे महत्त्वाचे आहे. असत्य हे क्षणभंगूर असते आणि त्यातून क्षणिक आनंद आणि समाधान मिळते. तर सत्य हे शाश्वत आणि चिरकाल टिकणारे आहे. पण, सत्य काय आहे हे कोण सांगणार? तर तुमचे मन. तुमच्या अंतर्मनाचा आवाज प्रामाणिकपणे ऐका. ते नेहमीच सत्याच्या बाजूने असते.
पर्यावरण व्यवस्थापन आणि शेती व्यवस्थापन यासंबंधी तुकोबांनी निरीक्षणात्मक चिकित्सा केली आहे.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे।
पक्षी ही सुस्वरे आळविती।।
निसर्गाविषयी पूज्यभाव आणि प्रेमभाव हा खरा वसुंधरा धर्म कथन करताना वनामध्ये पुष्प-फळांनी बहरलेले वृक्ष आणि वेली हेच सोयरे आहेत असे तुकोबा आदराने बोलतात. इतस्ततः स्वैर संचार करणारे वन्य पशू आणि सुस्वर शब्दाने आळवणारे पक्षी आमचे जिवलग मित्र आहेत. तसेच या वृक्ष-वेलीसाठी लागणारे बीज शुद्ध हवे. कारण तरच त्याची फळे रसाळ आणि कसदार असतील.