पुणे -तंत्रज्ञानाच्या युगात मुले “मोबाइल’मध्ये गुंतली आणि कार्टुन, रिल्स, सेफी, टाइमपास व्हिडिओच्या आहारी गेल्यामुळे मुले बाहेरचे आनंदीमय जीवन विसरून गेले. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी संस्कार वर्ग, शिबिरे उन्हाळी सुटीत महत्वाची भूमिका बजावत आहे. या वर्गातूनच मुलांना संस्काराच्या शिदोरीबरोबरच मित्र-मैत्रिणी, मैदानी खेळ, वाचन याची गोडी लागत आहे.
मोबाइल आणि टीव्हीमुळे मुले मैदानी खेळ खेळण्यास कंटाळा करतात, वाचन संस्कृती विसरले, संवाद संपला. एकत्र कुटुंब पद्धती संपत चालल्याने भावना, जाणीव, आपलेपणा, मदतीसह एकीचे बळ हे मुलांना माहितीच नाही. मुलांची हीच व्यथा ओळखून शहरासह आता गावांमध्येही संस्कार वर्ग, उन्हाळी शिबिरे भरवली जात आहे. यातील काही शिबिरे ही “व्यावसायिक’ असतीलही. मात्र, काही शिबिरे हे संस्काराची शिदोरी देणारे ठरत आहेत.
सांस्कृतिक ज्ञानदान
सकाळी लवकर उठणे, रात्री लवकर झोपणे, अभ्यास कधी आणि कसा करावा, अभ्यासाबरोबर खेळही खेळावा, घरातील मोठ्या व्यक्तींशी कसे बोलावे, कसे वागावे, जेवण कसे असावे, कोणते पदार्थ खावे, आरोग्य सांभाळण्यासाठी काय करावे यासह विविध गोष्टी येथे शिकवल्या जातात. तसेच मैदानी खेळांच्या शिबिरांमधून मुलांनी आरोग्यदायी बनविले जाते. यांसोबतच काही ठिकाणी देवाची प्रार्थना, भक्तीगीतं, श्लोक आदिंच्या माध्यमातून सांस्कृतिक ज्ञानही दिले जात आहे.