फलटण -जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला असून फलटण तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेत पक्षवाढीसाठी रात्रंदिवस परिश्रम घेतले आहेत.
त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून संजीवराजे यांना विधानपरिषदेवर घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करावा, अशी मागणी नगराध्यक्षा सौ. नीता मिलींद नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व नगर सेवकांच्यावतीने संयुक्त पत्रकाद्वारे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने संजीवराजे यांना विधानसभा मतदारसंघामधून निवडून जाता आले नाही. गेली 35 वर्षे समाजकारण व राजकारणात सातत्याने सक्रिय राहून अहोरात्र लोकांच्यासाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणून संजीवराजे पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांचा कामाचा उरक आणि तत्पर निर्णयक्षमता जिल्ह्याने अनुभवली आहे अशा सतत लोकांच्या प्रश्नांसाठी कार्यरत या नेत्याला विधानपरिषदेवर काम करण्याची संधी मिळावी, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सर्वसामान्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या प्रश्नांची मांडणी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या माध्यमातून शासन, प्रशासनासमोर करत प्रश्न सोडवून त्यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम प्राधान्याने केले. दररोज अनेक लोक त्यांना भेटून अडचणी त्यांच्यासमोर मांडतात. तेथून कधीही कोणीही नाराज होऊन गेल्याचे ऐकिवात नाही. जिल्हा परिषद, श्रीराम सहकारी साखर कारखाना, पंचायत समिती, नगरपालिका, फलटण एज्युकेशन सोसायटी, ग्रामीण भागातील अन्य सहकारी संस्था, ग्रामपंचायती, विकास सोसायट्या अशा संस्थांच्या माध्यमातून हजारो कार्यकर्त्यांची फळी त्यांनी उभारली आहे.
फलटण तालुक्यासह जिल्ह्यामध्ये संजीवराजे नाईक- निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला असल्याची दखल शरद पवार यांनी घ्यावी व संजीवराजे यांना विधानपरिषदेवर काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी पत्रकामध्ये करण्यात आली आहे. प्रत्येकवेळी वेगळ्या मतदारसंघातून सलग 25 वर्षे पंचायत समिती व जिल्हा परिषदेत मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या संजीवराजे यांना विधानसभा किंवा लोकसभेवर मतदारांनी मताधिक्याने निवडून दिले असते.
मात्र, इतकी लोकप्रियता लाभलेल्या संजीवराजे यांनी ती संधी पक्षाकडे कधी मागितली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या आदेशानुसार काम करणे, ते सोपवतील ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हीच त्यांची भूमिका आहे. संजीवराजे सत्तेच्या पदावर असावेत.
त्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना असल्याने संजीवराजे यांना विधान परिषदेत काम करण्याची संधी मिळावी, अशी एकमुखी मागणी करीत असल्याचे पत्रकात म्हटले आहे. पक्ष बळकटीसाठी संजीवराजे यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेतृत्वाला विधानपरिषदेवर संधी दिली तर जिल्ह्यात पक्षाची अजून चांगली बांधणी होईल.
त्यांचे प्रत्येक तालुक्यामध्ये विविध घटकांशी चांगले संबंध असून या संबंधांचा फायदा जिल्ह्यामध्ये पक्षामजबुतीसाठी निश्चितच होईल, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे एक प्रभावी शस्त्र त्यांच्या हाती लागल्यावरच त्यांच्या कामाची राज्यस्तरावर नोंद होईल, त्यासाठी संजीवराजे यांना पक्षाने संधी देणे गरजेचे असल्याचेही या पत्रकात नमूद केले आहे.