लासुर्णे (वार्ताहर) – परिसरात रविवारी (दि. 28) रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे बोरी चौक परिसरातील दुकान, पीठ गिरणी व 30 घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. यामुळे येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या भागातील लासुर्णे, जंक्शन, बोरी, बेलवाडी परिसरात सोमवारी (दि.29) पहाटे साडेपाच वाजेपर्यंत मुसळधार सुरू होता. लासुर्णे येथील बोरी चौक परिसरात चारीमधुन येणारे घरांमध्ये पाणी शिरले. परिसरातील दुकाने, जनावरांचे गोठे, पिठाची गिरणी, घरे अडीच फुट पाणी साचले होते. रात्रीच्या वेळी अचानक आलेल्या पावसाने नागरिकांच्या घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
चारीवरील अतिक्रमण काढा
या परिसरातील पाणी वाहून जाणाऱ्या चारीवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या चारीतील पाणी घरे व जनावरांच्या गोठ्यात शिरले आहे. अजूनही ही अतिक्रमणे अशीच राहिली तर पावसाळा होईपर्यंत या समस्येला कायम तोंड द्यावे लागेल.त्यामुळे हे अतिक्रमण काढण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.