पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातील इंदापूर, दौंड, बारामती तालुक्यासह पुरंदरच्या काही भागात रविवारी (दि. 28) मध्यरात्री पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. या झालेल्या पावसामुळे इंदापूर तालुक्यातील निमसाखर, लासुर्णे, कुरवली या भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. दौंड, इंदापूर तालुक्यातील ओढे, नाले खळखळून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी शेतकरी, नागरिकांचे नुकसानही झाले आहे. याबरोबरच फळबागांनाही मोठा फटका बसला आहे.
निमसाखर (वार्ताहर) – येथे रविवारी मध्यरात्री जोरदार झालेल्या पावसामुळे येथील दोन्ही ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. यामुळे निमसाखर-कळंब राज्यमार्गासह रणगाव रस्ता बंद झाला आहे. या परिसरातील दोन नाल्यांच्या प्रवाहामुळे नुकसान झाले आहे. याबरोबरच फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. ओढ्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरले होते.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील ओढे, नाले दुधडी वाहू लागले आहेत. निमसाखर-कळंबला जोडणाऱ्या बीकेबीएन रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.खंडोबानगर परिसरातील दोन नालाबंडिंग वाहून गेल्या आहेत.
पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऊस, कडवळ, मका, कांदा यासह फळबागांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे अगोदरच अडचणीत सापडलेला शेतकरी अजूनच संकटात सापडला आहे. निमसाखर बसस्थानक परिसरात कळंब-बावडा या रस्त्यालगतच्या चाऱ्यांमध्ये अडथळे झाल्याने दुकानात व घरात पाणी गेले आहे. त्यामुळे घरातील धान्य भिजून नुकसान झाले आहे.