मुंबई – शिवसेनेची बहुप्रतीक्षीत पत्रकार परिषद आज मुंबईतील शिवसेना भवन येथे पडली. या पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह भाजपवर अनेक आरोप केले. मात्र या पत्रकार परिषदेत एक प्रमुख प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.
संजय राऊत यांनी सोमवारी भाजपला गर्भित इशारा देत त्यांचे साडेतीन लोक कारागृहात जातील, असा दावा केला होता. त्यामुळे भाजपचे साडेतीन लोक कोण असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. सोशल मीडियावर देखील भाजपचे साडेतीन लोक कोण असतील, या संदर्भातील अंदाज बांधले जात होते.
संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे किरीट सोमय्या, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्याचा उल्लेख केला आहे. मात्र भाजपचे साडेतीन लोक कोण हे त्यांनी स्पष्ट केलं नाही.
दरम्यान संजय राऊत यांना साडेतीन लोक कोण असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, साडेतीन लोक कोण हे उद्यापासून कळेल. कारागृहात गेल्यावर मोजत बसा असंही राऊत यांनी म्हटलं आहे.