मुंबई – गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय तणाव वाढत आहे. यादरम्यान आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेला शिवसेनेचे महाराष्ट्रातील बडे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. दादर येथील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. या दरम्यान शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या पत्रकार परिषदतेतील महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे..
*आगामी निवडणूकीत 2024 मध्ये देशात परिवर्तन होईल.
*किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना PMC घोटाळ्यातील आरोपांखाली तातडीने अटक करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
*PMC बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानशी किरीट सोमय्यांचे आर्थिक संबध असून दोघेही पार्टनर असल्याचा मोठा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे. तसंच वाधवान यांनी भाजपला कोट्यवधी रुपये दिल्याचंही राऊतांनी सांगितलं आहे.
*संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात मेहंदी, नेल पॉलिश करणाऱ्यांची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली असून तिहार जेलमध्ये टाकण्याची धमकी देखील त्यांना देण्यात आली, असं संजय राऊत यांनी सांगितिलं आहे.
*केंद्रीय तपास यंत्रणांवर हल्लाबोल करताना, ‘माझी बँक खाती असलेल्या कार्यालयात ईडीचे लोक गेले’ असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
*पाटणकरांनी जमीन कशी घेतली, हे सोमय्यांनी दाखवावं, 10 लोकांनी विकल्यानंतर पाटणकरांनी ‘ती’ जमीन विकत घेतली, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी सोमय्यांच्या आरोपावर दिलं आहे.
*’किरीट सोमय्या हा माणूस मराठी द्वेष्टा आहे. त्यानेच मुंबईतील शाळांमध्ये मराठी सक्ती केल्यानंतर कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. आधी त्याचं थोबाड बंद करा. मराठीचा द्वेष करणाऱ्या या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार’, असं विधान संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.
*मागील काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून मविआ नेत्यांवर सुरु असलेल्या आरोपानंतर आज संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका करत, त्यांचा उल्लेख ‘मुलुंडचा दलाल’ असा केला आहे.
*’माझ्याशी वैर असेल तर मला टॉर्चर करा, कुटुंबियांना का त्रास देता?, हीच का तुमची लोकशाही’ असा सवाल पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांना राऊतांनी केला आहे.