Sanjay Raut : भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. उल्हासनगर येथील हिललाइन पोलीस स्टेशनमध्येच हा प्रकार घडल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे मी गोळीबार केला असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? असा खडा सवाल केला आहे.
आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना सजन्य राजू यांनी गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारावर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना, “गणपत गायकवाड म्हणत आहेत की एकनाथ शिंदे यांच्यामुळे मी गोळीबार केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंसारखे मुख्यमंत्री असतील तर गुन्हेगारच तयार होतील हे भाजपा आमदाराचं निवेदन आहे. मी वर्षभर सांगतोय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून गुन्हेगाऱ्यांच्या टोळ्यांना कसे दूरध्वनी कसे जात आहेत ते मी सांगितलं. मुंबई, पुणे, कोल्हापूर इथल्या तुरुंगातल्या गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढलं गेलं आहे. मी सगळ्यांची नावंही देऊ शकतो असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हे सगळं फक्त राजकारणासाठी चाललं आहे. एका गुंडाचा पुण्यात खून झाला. मुंबईत तेच सुरु आहे. गुंड टोळ्यांच्या हाती कायदा दिला आहे. तुम्ही सांगाल तो कायदा आम्हाला निवडणूक जिंकून द्या असं चाललं आहे. महेश गायकवाड यांच्यावर आमदाराने केलेला गोळीबार धक्कादायक आहे.”असे म्हटले.
तसेच पुढे बोलताना संजय राऊत यांनी गुरहमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना,“गृहमंत्री आम्हाला कायदा शिकवतात, आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? शिवसेना, खरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याबाबतच कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही हा नियम आहे का? विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असता तर विनाचौकशी त्याला फासावर लटकवलं असतं. तुमच्या जिल्ह्या माफियांचं राज्य चालले आहे. नागपूर, ठाणे, मुंबई, पुणे या जिल्ह्यांमध्ये राजकीय स्वार्थासाठी आणि निवडणूक जिंकण्याठी गुन्हेगार आणि माफियांना संरक्षण दिलं जातं आहे. महाराष्ट्रातलं हे चित्र अत्यंत भयावह आहे. गृहमंत्र्यांना आजच्या प्रकारानंतर उत्तर द्यायला तोंड उरलं आहे का?” असा थेट सवाल त्यांनी यावेळी केला आहे.
तसेच “भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांचं निवेदन सामान्य जनतेने समजून घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मी गोळीबार केला असं ते म्हणत आहेत. कारण मुख्यमंत्रीच गुन्हेगारांना पाठिशी घालत आहेत आणि मदत करत आहेत. भाजपा आमदाराचं निवेदन आहे. दीर्घ काळ ते आमदार आहेत. त्यांनी शिंदे यांच्या राजवटीत गुन्हेगारांची पैदास सुरु झाली आहे हे भाजपाचा आमदार सांगतो. देवेंद्र फडणवीस यांनी आता यावर बोललं पाहिजे” अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.
राऊत पुढे म्हणाले, “महाराष्ट्र इतक्या रसातळाला कधीच गेला नव्हता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये हा गोळीबार झाला आहे. राम तुमच्या बाजूने आहे, देवेंद्र फडणवीस यांना विचारायचं आहे की तुमचं राज्य कायद्याचं आहे का? ज्या आमदाराने गोळीबार केला आहे त्याला जामीन मिळेल. पुण्यात तीन भयंकर गुन्हेगारांना जामीन मिळण्यासाठी सरकारमधल्या मंत्र्यांनी जो हस्तक्षेप केला आहे त्यांचीही नावं मी तुम्हाला देईन. गणपत गायकवाड यांच्या जामिनासाठी फोन जाईल” असा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला.