मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयाचे सकारात्मक पडसाद राज्यात पडताना दिसत आहेत. कारण कर्नाटकातील निवडणुकांनंतर आता राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सर्वपक्ष काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या चर्चांना उधाण आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर भाष्य केले.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी,” “आमची पहिली बैठक शरद पवारांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. त्या बैठकीला उद्धव ठाकरेही होते. पण १६-१६ चा फॉर्म्युला ठरला ही बातमी मला तुम्ही देताय. आम्हाला माहिती नाही. बैठकीत जे काही ठरलंय, त्याबाबत बाहेर आलेली माहिती चुकीची आहे. असा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही”, असे म्हणत या सर्व चर्चांना सध्या तरी पूर्णविराम लावला आहे.
तर पुढे बोलताना राऊत यांनी,“लोकसभा जागावाटपासंदर्भात आता प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांकडे जेव्हा आम्ही बसलो, तेव्हा बैठका कुणी घ्यायच्या, कशा घ्यायच्या, काय सूत्र असावं यावर चर्चा झाली. आकडा ठरलेला नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे आणि राहणार. लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या वज्रमुठीनंच लढवल्या जातील. कुणी काहीही म्हणू द्या. बेकायदेशीर सरकारवाल्या लोकांनी काहीही म्हणू द्या. आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, होणारही नाहीत. आम्ही एकत्र राहूनच सध्याच्या घटनाबाह्य सरकारला सत्तेवरून घालवणार”, असे म्हटले.
दरम्यान, जागावाटपात ठाकरे गटाला किती जागा मिळतील? या प्रश्नावर संजय राऊतांनी सूचक विधान केलं. “आम्ही काय बाजारात उभे आहोत का? आमचे लोकसभेत १९ खासदार राहतील. आम्ही त्या जिंकलेल्या जागा आहेत. त्या तर राहणारच. राष्ट्रवादीनं ४ जागा जिंकल्या आहेत. त्यावर कशी चर्चा होणार? काँग्रेसनं जरी चंद्रपूरची एक जागा जिंकली असली, तरी एक जागा त्यांच्याकडे राहणारच आहे. जिंकलेल्या जागा या जिंकलेल्या जागा असतात. त्या जिंकून आल्यानंतर कोण इकडे-तिकडे गेला त्यानं फरक पडत नाही. पण जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे आमचे आज महाराष्ट्रात १८ आणि दादरा-नगर हवेलीत एक खासदार निवडून आले आहेत. असे १९ खासदार आमचे आहेत. तो आमचा आकडा कायम राहील असं म्हणतोय मी. ही आमची मागणी नाही”, असेदेखील राऊत यांनी म्हटले आहे.