मुंबई – आपण महामार्ग निर्माण करतो. आपण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग करत आहोत, ज्याने राज्यात समृद्धी येणार आहे. शेतकऱ्यांसाठी हमरस्ते महत्वाचेच पण त्याला जोडणारे पाणंद रस्ते तयार करण्याची योजनाही आपण रोहोयोमार्फत धडाक्याने राबवित आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कृषिरत्न, कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण पुरस्कारांसह इतर कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, विकेल ते पिकेल अंतर्गत शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळेल, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
जसं एखाद्या उद्योग धंद्यासाठी मार्केट रिसर्च केले जाते, तसेच शेतकऱ्यांच्या पिकांसाठीही बाजारपेठ संशोधन अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कोणत्या पिकाला कुठे चांगला भाव आहे, कोणत्या पिकाला मागणी आहे हे शेतकऱ्याला सांगणं महत्त्वाचं आहे. विकेल ते पिकेलमध्ये हेच काम आपण हाती घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना हमी नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे, हेच या “विकेल तेच पिकेल’चं धोरण आहे. आज विविध पुरस्कारांनी शेतीत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार दिले जात आहेत. खरं तर तुमचा सन्मान करण्याचा मान आम्हाला मिळतो याचा आनंद आहे, असेही त्यांनी सांगितले.