पंढरपूर (प्रतिनिधी): आषाढी एकादशीची वारी व करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षाव्यवस्था पाहणी करता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पंढरपूरला भेट दिली. महाव्दार चौकातून दर्शन घेताना त्यांनी “विठू माउली तू माऊली जगाची, आर्त साद तुज ही करोना मुक्तीची’ अशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाला साकडं घातलं.
आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेण्यासाठी अनिल देशमुख व आरोग्य मंत्री राजेश टोपे आले होते. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके उपस्थित होते.
संपूर्ण जगासह भारत व महाराष्ट्रातून या करोनाला घालवा व शतकांपासून चालत आलेली वारीची परंपरा पूर्ववत लवकरच चालू होण्यासाठी आशीर्वाद असू द्या, अशीही प्रार्थना देशमुख यांनी केली. तसेच पालखी सोहळ्याबाबत शासन स्तरावर घेण्यात येणारा निर्णय नागरिक आणि भाविकांच्या हिताचा असेल. त्या निर्णयाबाबत भाविकांनी व जनतेने सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी गृहमंत्र्यांना वीणा, वारकरी पारंपरिक पोशाख, तुळशी हार देण्यात आला.
करोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.
यावेळी आषाढी वारीच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गृहमंत्र्यांना दिली.