केंदुर (पुणे) – करंदी (ता. शिरूर) ग्रामपंचातीची एकूण तेरा जागांवर सदस्यपदाची निवडणूक होत आहे. यामध्ये तीन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत तर प्रभाग क्रमांक तीनमध्ये दोन सख्खे चुलतभाऊ आमनेसामने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
करंदी गावातून चासकमानचा कालवा वाहतोय, त्यामुळे गावातील सर्वाधिक क्षेत्र बाराही महिने ओलिताखाली आहे. करंदी ऊस आणि कांदा उत्पादनात तालुक्यात अग्रस्थानी आहे. त्याचबरोबर गावाच्या हद्दीत छोटे औद्योगिक कारखानेदेखील आहेत. अशा सदन गावची ग्रामपंचायत निवडणूक गावपुढाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर 13 जागांसाठी 62 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, मात्र प्रभाग क्रमांक एकमध्ये गेल्यावेळी ज्याप्रमाणे बिनविरोध सदस्य निवडले गेले होते. त्याचप्रमाणे यावेळीदेखील शिवाजी सोपान दरेकर, रेखा रामदास खेडकर, उज्वला राघू नप्ते हे तीन सदस्य बिनविरोध निवडले आहेत. उर्वरित दहा जागांसाठी आता वीस उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. प्रभाग दोनमध्ये रमेश बाळासाहेब नप्ते विरूद्ध संदीप उत्तम ढोकले, प्रतिभा चंद्रकांत भोसले विरूद्ध सोनाली किरण ढोकले, प्रभाग तीनमध्ये दोन सख्खे चुलतभाऊ नितीन सोपान ढोकले विरूद्ध समीर रामभाऊ ढोकले, शारदा राजेंद्र ढोकले विरुद्ध प्रमिला ज्ञानेश्वर दरेकर प्रभाग चारमधील निलिमा अशोक ढोकले विरुद्ध पांडुरंग आनंदराव ढोकले, दादा श्रीपती ढोकले विरुद्ध बबन सोमनाथ ढोकले, वैशाली अण्णा दरेकर विरुद्ध सुनीता कैलास ढोकले अशी लढत होणार आहे.
प्रभाग पाचमध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेईपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. सर्वसाधारण महिलेच्या जागेसाठी एका गटाकडून सुजाता शिवाजी दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली. तर दुसऱ्या गटाकडून इरफाना सलीम इनामदार यांना उमेदवारी नश्चित झाली असताना शेवटच्या दहा मिनिटांमध्ये अचानक राजकीय समीकरणे बदलली गेली. आणि शोभा राजेंद्र दरेकर यांना इरफाना इनामदार यांच्याऐवजी उमेदवारी दिली. करंदीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे सुजाता शिवाजी दरेकर विरुद्ध शोभा राजेंद्र दरेकर या लढतीकडे संपूर्ण गावचे लक्ष लागून आहे. त्याचबरोबर सुभद्रा कांतीलाल ढोकले विरूद्ध सुवर्णा मुरलीधर नवगिरे, अंकुश वामनराव पंचमुख विरुद्ध बाळू दारकु पंचमुख अशा प्रकारे प्रभाग पाचमध्ये लढत होणार आहे.
यापूर्वी पाच वर्षे ग्रामपंचायतवर ज्या गटाची सत्ता होती त्याच गटाचे तीन सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत तर विरोधी गटाने प्रभाग क्रमांक चार आणि पाचमध्ये संपूर्ण ताकद पणाला लावली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या काळात ग्रामपंचायतीवर पुन्हा सत्ता जैसे थे होणार की विरोधक पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर ग्रामपंचायतीवर पुन्हा झेंडा फडकवणार याकडे संपूर्ण पंचक्रोशीच्या नजरा लागल्या आहेत.