नवी दिल्ली – आर्थिक आघाडीवर चुका झाल्यास वेळोवेळी आपल्याच सरकारला धारेवर धरणारे भाजपनेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. तसेच करोना लसीच्या घोषणेवरून स्वामी यांनी मोदी सरकारला सल्ला दिला आहे.
सध्या जगभरात करोना लसीची चर्चा सुरू आहे. अनेक देशांनी आपल्या नागरिकांना लस देण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. मात्र लसीच्या गोंधळात देशासमोरील आव्हाने सरकारने विसरू नये, असं स्वामी यांना वाटते. करोना लसीच्या उत्साहात चीनच्या अतिक्रमणाला आणि अर्थव्यवस्थेचा उडालेला बोजवारा विसरु नका, असा खोचक टोला स्वामींनी लगावला.
चीनने भारतीय हद्दीत 4 हजार स्वेअर किमीचा कब्जा केलाय, हे सरकारने करोना लसीच्या उत्साहात विसरता कामा नये. तर, देशाची अर्थव्यवस्था देखील ढासळत चालली आहे. त्याकडेही लक्ष देण्याची आठवण स्वामी यांनी करून दिली. चीनच्या पीपल्स आर्मीने एलएसीजवळ 30 आधुनिक टँक उभारले असून भारतीय हद्दीत हल्ला करण्यासाठी चीन तयार असल्याचं स्वामींनी म्हटलं आहे.
दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये सीमा रेषेवर मोठा तणाव निर्माण झाला आहे. चीनने भारताच्या हद्दीतील लडाखच्या गलवान घाटीत रोड निर्माण करण्यास हरकत घेतली होती. त्यावरुन 5 मे रोजी भारत आणि चीनी सैन्यात हाणामारी झाली होती. त्यातूनच 15 जून रोजी चीन आणि भारताच्या सैन्यांत हिंसाचार घडला. त्यामध्ये भारतीय सैन्य दलाचे 20 जवान शहीद झाले होते. त्यामुळे, सुब्रमण्यम स्वामींनी पुन्हा एकदा सरकारला येथील परिस्थितीची आठवण करुन दिली आहे.
यापूर्वी अनेकदा स्वामी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. भारत बायोटेकच्या करोना लसीवरून देखील स्वामींना सरकारला धारेवर धरले होते. तर पेट्रोल आणि डिजेलच्या वाढत्या दरावर ही जनतेची पिळवणूक असल्याचे म्हटले होते.