पवन मावळ – पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुक्याचे पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत असलेले पवना धरण 100 टक्के भरले आहे. या धरणाच्या सांडव्यावरून पाणी सोडले जात असून, हे विहंगम दृश्य टिपण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना कोणाताही अटकाव केला जात नसल्याचे चित्र आहे. सुरक्षा रक्षकच तैनात नसल्याने पर्यटकांकडून धरणाच्या भींतीलगत जाऊन धोकादायक पद्धतीने छायाचित्रण होत आहे.त्यामुळे या धरणाला कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न पडला आहे.
मावळ तालुका हा निसर्ग सौंदर्याने नटलेला तालुका आहे. तर गेल्या काही वर्षापासून पवनामावळ पर्यटकाचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यात शनिवार व रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक असतात. धरणात बुडून अनेक जणांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे जर येथे कोणताही अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण? असा सवाल सुज्ञ नागरिकांनी केला आहेत.
पवना धरणातून मावळ तालुका, पिंपरी-चिंचवड एमआयडीसी व पिंपरी-चिंचवड महापालिकेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या पवना धरणाच्या भिंत वर जाऊन अनेक पर्यटक फोटो काढताना व फिरताना दिसतात. पवना धरण हे 100 टक्के भरले असल्यामुळे धरणाच्या सांडव्या वरून विसर्ग सुरू आहे. ते दृश्य पाहण्यासाठी पर्यटक सांडव्याच्या जेवढे जवळ जाता येईल, तेवढे जवळ जात आहेत. त्याठिकाणी धरणाचे कर्मचारी अथवा कोणतीच सुरक्षा यंत्रणा अस्तित्वात नसल्याचे दिसून आले. त्या मुळे धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले.
1992 साली देशात बॉम्ब स्फोट झाले. त्या वेळेपासून हे धरण आतिरेक्यांच्या हिट लिस्टवर आसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून समजल्यानंतर राज्य सरकारने पवना धरणासाठी स्वतंत्र पोलिस सुरक्षा यंत्रणा तैनात केली होती. मात्र आता येथे ना होमगार्ड ना सुरक्षारक्षक असे चित्र आहे. त्यामुळे पवना धरणाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. धरणाच्या सुरक्षिततेबाबत अधिकारी किती किती जागृत आहे हे यातून दिसून येते.
ते सुरक्षा रक्षक कुठे गेले?
महिनाभरापुर्वी पवना धरणासाठी 20 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र, धरणावर पर्यटकांचा मुक्त वावर असून, हे सर्वच पर्यटक पवना धरणाचे फोटो काढून बिनदिक्कतपणे छायाचित्रणदेखील करत आहेत. त्यांना रोखणारी यंत्रणाच नसल्याने नागरिकांचा धरण परिसरात मुक्त वावर आहे. त्यामुळे नवनियुक्त सुरक्षा रक्षक नेमके गेले कुठे ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.