मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारने आयात केलेल्या विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटीत कपात केल्यानंतर विरोधकांनी आता सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. राज्य सरकारने विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी ५० टक्क्यांनी कमी केले आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान,सरकारच्या या निर्णयावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजीमंत्री सदाभाऊ खोत यांनी सडकून टीका केली आहे.
“महाराष्ट्र सरकारने दारू वरची एक्साईज ड्युटी १५० टक्क्यांनी कमी केली. हरबल गांजा ओढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा, असा महाविकास आघाडी सरकारचा अजब कारभार सुरु आहे. एक्साइज ड्युटी कमी करून आता सरकारने दारू पिण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याचे काम हातात घेतले आहे”, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
महाराष्ट्र सरकारने आयात केलेल्या विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी, खर्चाच्या ३०० टक्क्यांवरून १५० टक्क्यांवर आणण्यात आली आहे,” असे एका अधिकाऱ्याने एका संस्थेला सांगितले आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, “आयात केलेल्या विदेशी मद्याच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वर्षाला १०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीमुळे सरकारचा महसूल २५० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे कारण यामुळे एक लाख बाटल्यांवरून २.५ लाख बाटल्यांची विक्री वाढेल”.