नाशिक – संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांनी राम नवमीनिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली होती. मात्र मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास संयोगीताराजेंना विरोध करण्यात आला होता. याबाबत संयोगीताराजेंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर सर्वत्र या प्रकरणाची चर्चा झाली. यावर आता संभाजीराजेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
“संयोगीताराजे यांना काळाराम मंदिरात जो अनुभव आला तो त्यांनी मांडला, त्याचा मला अभिमान आहे. त्यांनी सत्याची बाजू मांडली. महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा आहे. हा संतांचा महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्रात असे कृत्य करणारे लोक का तयार होतात? असे होऊ नये अशी अपेक्षा. जो त्रास शाहू महाराजांना झाला 100 वर्षाने ते पुन्हा घडले. अशा घटना घडू नयेत, यासाठी पुरोहित महंतांनी काम करावे, ” असे म्हणत संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त केली.
संयोगीताराजेंनी पोस्टमध्ये काय लिहिले ?
‘नाशिकच्या काळाराम मंदिरातील महंतांनी दर्शनासाठी आलेल्या संयोगिताराजे यांच्यासमोर पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. पण कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणून त्यांनी प्रश्न केलाच.’
‘तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हंटले. या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे. अजूनही खूप प्रवास बाकी आहे. अजून खूप चालावे लागणार आहे. हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे!’ अशी पोस्ट छत्रपती संयोगीताराजे छत्रपती यांनी केली आहे.