“हॅलो! कसे आहात सगळे? मजेत ना?’ हा प्रश्न किती सहजपणे विचारतो ना आपण? पण, तितक्या सहजपणे उत्तर देता येतं का आपल्याला? कोणी कसा आहेस/कशी आहेस विचारल्यावर अनेकदा उत्तर द्यायला आपण दोनेक सेकंद घेतो… आपल्याला ठरवावं लागतं की मी छान आहे का बरी आहे किंवा ठीक नाही… कारण, नेहमी मी छान मजेत असेन याची आपल्या मनाला खात्री नसते किंवा आपल्याच मनाची अवस्था आपल्याला माहीतही नसते. अर्थात, म्हणून काही जण सरसकट “हो छान आहे’ असं उत्तर देतात.
अर्थात त्यामुळे एक क्षण प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला तरी नक्कीच छान वाटतं. कधी हे उत्तर खरं नसेलही, तेव्हा? तेव्हाही छान या शब्दाची स्पंदनं आकर्षित व्हावीत म्हणून तेच म्हणावं असं मला तरी वाटतं. छान हा शब्द उच्चारताना काही मिनी सेकंदांसाठी का होईना एक किंचित स्मितरेषा नक्कीच चेहऱ्यावर उमटेल. ती किती सुंदर असेल.. त्या किंचित स्मितरेषेतही आनंदाची तार छेडण्याची ताकद असते बरं. पण, कधीकधी काही लोकांनी ठरवलेलंच असतं, हसायचं नाही, आनंदी दिसायचं नाही, राहायचं नाही… त्यांचं काय? त्यांना एखाद्या सोप्या युक्तीने आनंदी करायचं. आनंदी राहणं सोपं आहे.
मी एक गोष्ट कुठेतरी वाचली होती. ती इतकी मनात रुतून बसली आणि मला माझा आनंद सापडला. ती गोष्ट आहे एका झेन गुरूंची. एकदा एका गावात झेन गुरू ध्यानधारणा करत असतात. एक माणूस अत्यंत दुःखी असतो. त्याला आपल्या दुःखापासून मुक्तता हवी असते म्हणून तो झेन गुरूंकडे येतो आणि त्यांना विनंती करतो, “मला या दुःखातून मुक्त करा. मी आनंदी कधी होईन?’ ते झेन गुरू खाली चटईवर बसून ध्यान करत असतात. ते त्याच्याकडे पाहून मंद स्मित करतात आणि त्याला विचारतात, “तुला या खोलीत लाल रंगाच्या किती वस्तू दिसत आहेत? मोजून सांगशील का?’
तो माणूस चकित होतो. मनात म्हणतो, मी इथे माझ्या समस्येवर उपाय मिळवण्यासाठी आलो असताना हे मला वायफळ गोष्टी का करायला सांगत आहेत? तरी तो आजूबाजूला नजर फिरवतो आणि खोलीत लाल रंगाच्या बऱ्याच वस्तू आहेत असं त्याच्या लक्षात येतं. तो आता बारकाईने सगळीकडे पाहात मनातल्या मनात लाल रंगाच्या वस्तूंची यादी करू लागतो. झेन गुरू शांतपणे डोळे मिटून पुन्हा ध्यानात मग्न झालेले असतात. मनात सर्व वस्तूंची यादी केल्यानंतर तो माणूस म्हणतो, “गुरुजी, या खोलीत लाल रंगाच्या बऱ्याच वस्तू आहेत. जसं की, तुमची खुंटीवरची कफनी, कोपऱ्यातला कमंडलू, खिडकीतल्या फुलदाणीतली फुलं, तुम्ही बसला आहात ती चटई.’
गुरुजी मंदस्मित करून डोळे उघडून बघतात आणि म्हणतात, “छान, आता तू इकडे तिकडे न बघता सांग की या खोलीत निळ्या रंगाच्या किती वस्तू आहेत?’
माणूस आता मनातल्या मनात चरफडतो. कुठून यांच्याकडे आलो? मला माझ्या समस्येवर उत्तर सांगण्याऐवजी काहीतरी फुटकळ कामं सांगत आहेत. गुरुजी त्याच्याकडे पाहात असतात. त्याला निळ्या रंगाच्या वस्तू पाहिलेलं आठवतच नाही. तो खजील होतो. म्हणतो, “गुरुजी, माफ करा पण या खोलीत निळ्या रंगाच्या वस्तू आहेत का? माझं त्यांकडे लक्ष गेलंच नाही. मी फक्त लाल रंगाच्या वस्तू मोजत होतो.’
गुरुजींच्या चेहऱ्यावर अजूनही तेच मंद स्मित असतं. ते म्हणतात, “तुला वाटलं असेल, की मी तुझ्या समस्येवर उपाय न सांगता तुला काय कामं सांगतो आहे. पण, हेच तुझ्या समस्येवरील उत्तर आहे.’
आता त्या माणसाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटतं. गुरुजी म्हणतात, “तू तुझ्या दुःखामध्ये इतका गुरफटला आहेस, की जो आनंद आणि सुख तुझ्या आयुष्यात आहे त्याकडे पहातही नाही आहेस. जसं तू लाल वस्तू मोजताना निळ्या वस्तूंकडे दुर्लक्ष केलंस. लाल वस्तू तुझ्या दुःखासारख्या आहेत आणि निळ्या वस्तू सुखासारख्या, आनंदासारख्या.’
त्या माणसाच्या चेहऱ्यावर आता हसू उमटलं. किती वेडेपणा करत होतो आपण? त्याने मनातल्या मनात विचार केला. गुरुजीना नमस्कार करून तो घरी गेला. आपणही कधी कधी त्या माणसासारखं करतो. आपल्याकडे काय चांगलं आहे याचा विचारही न करता, जे नाही, जे दुःखद आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करून स्वतःला अजूनच दुःखी करतो. जीवन हे समुद्रासारखं आहे, कधी भरती, कधी ओहोटी. कधी चढ, कधी उतार. कधी ऊन तर कधी पाऊस… तसच कधी दुःख, तर कधी सुख. ही अशी वीण आहे म्हणूनच आपल्याला दोन्ही गोष्टींचं महत्त्व कळतं.
मागे एकदा कधीतरी स्वतःवरच खूप वैतागून गेले असताना मॅनेजमेंटला शिकवताना वाचलेली एक तुलना करण्याची युक्ती आठवली. मनाशी म्हटलं, आपण आपल्याकडे अमुक नाही तमुक नाही म्हणून वैतागतो आहोत तर यादीच करून पाहू. म्हणून सरळ वही पेन घेतलं आणि वहीचं पान मध्ये दुमडून दोन भाग केले. एका बाजूला मला इच्छित असलेल्या पण नसलेल्या गोष्टी लिहून काढल्या आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या गोष्टींची यादी केली. अर्थातच, माझ्या त्या वेळच्या मनोवस्थेमुळे नसलेल्या गोष्टींची यादी थोडी मोठी झाली होती. तरीही, जेव्हा दोन्ही बाजू तपासल्या तेव्हा अचानक लक्षात आलं, की अरेच्च्या, या यादीतल्या नसलेल्या बाजूच्या काही गोष्टी तात्पुरत्या आहेत आणि काही कायमस्वरूपी. पण, त्याचप्रमाणे, असलेल्या गोष्टींपैकीही काही गोष्टी कायमस्वरूपी आहेतच… एक क्षण मन आनंदून गेलं, आपल्याकडे अमुक तमुक गोष्ट आहे की!
जसं की, आपल्याला गाता येतं, संगीत आवडतं, घरचे लोक आपल्यावर प्रेम करतात, आपल्याला खूप नसले तरी काही मित्रमैत्रिणी आहेत आणि आपल्याकडे भक्कम डिग्य्रा आहेत ज्यांच्या बळावर आज नाहीतर उद्या आपण डाव्या बाजूला लिहिलेल्यापैकी आज नसलेल्या काही गोष्टी भविष्यात नक्कीच मिळवू शकतो! डाव्या बाजूच्या यादीकडे बघता बघता उजव्या हाताला लिहिलेली यादी दुर्लक्षित झाली होती, ती दिसली आणि त्या क्षणी जो दिलासा स्वतःचा स्वतःला वाटला ना… तो शब्दांत सांगू शकत नाही. नकळत आपोआपच चेहऱ्यावरच्या आठ्या आणि ताण कमी झाला आणि किंचित का होईना हसू आलं. हेच ते… आपल्याकडे आधीपासूनच असलेला आनंद शोधणं!
आहे तो आनंद आपल्या आतमध्येच. आपल्याला अनेकदा जाणीव नसल्याने तो सापडत नाही. किंवा कधीकधी त्रास, दुःख या गोष्टींवर आपण इतकं लक्ष केंद्रित करतो, की आनंदाकडे साफ दुर्लक्ष होऊन जातं. तेच न करायला शिकायचं आहे. याचा अर्थ असा अजिबात नाही, की माणसाने अल्पसंतुष्ट व्हावं, आहे त्यातच आनंदी आणि समाधानी रहावं, महत्त्वाकांक्षा ठेवूच नयेत… अंहं, तसं अजिबात नाही. पण, कोणत्याही छोट्या दुःखाचा, त्रासाचा बाऊ करण्याआधी ज्या सुखकारक आणि आनंददायक गोष्टी आहेत त्यांकडेही एक नजर पहावं! शेवटी काय… त्रास आपलाच कमी होणार आहे ना?
मग चला, छान वही पेन घेऊन आज यादीच करूया आपल्याला आनंद देणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आपल्याकडे आहेत याची. ती यादी आपल्या चेहऱ्यावर नक्कीच एक स्मितहास्य आणेल. आनंदी राहा, ते सोपं आहे आणि त्याला फारसे पैसे पडत नाहीत!
– मृणाल काशीकर-खडक्कर