आपल्याला बलशाली राष्ट्रनिर्मिती करायची असेल तर शिक्षण हे सर्वात प्रभावी असे साधन आहे. भारतीय राज्यघटना निर्माण करताना आपण स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या तत्त्वांचा स्वीकार केला आहे. या तत्त्वांवर आधारित समाज निर्माण करण्याचे मोठे आव्हान होते. हे आव्हान जर आपल्याला पेलायचे असेल तर ती शक्ती फक्त शिक्षणात आहे. आपण शिक्षणातून नैतिक, मूल्याधिष्ठित, विवेकी समाज निर्माण करण्याची गरज आहे. असा समाजच लोकशाही व्यवस्था अधिक उत्तम दिशेने घेऊन जाऊ शकेल. शिक्षणाच्या समान संधी आणि त्याही मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्याची गरज डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यक्त करत. शिक्षण गरिबांच्या दारात पोहोचत नाही तोवर राजकीय लोकशाही परिपक्व होणार नाही.
भारत 76 वा स्वातंत्र्यदिन यंदा साजरा करत आहे. भारतीय स्वातंत्र्य अबाधित राहण्यास संविधान हा मजबूत पाया आहे. आज भारतीय स्वातंत्र्याचा विचार करताना संविधानाचे महत्त्व अधोरेखित होते. स्वातंत्र्य उपभोगताना तसेच भारतीय समाजमनाच्या जडणघडणीच्या दृष्टीने संविधान मुख्य घटक आहे. राज्यघटनेची तत्त्वे रूजविण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. भारतीय राज्यघटना ही केवळ राजकीय दस्तावेज न राहता सामाजिक पुनर्रचनेचा दस्तावेज होण्याची गरज आहे. राज्यघटनेच्या माध्यमातून देशातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विषमता नष्ट झाली पाहिजे.
स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने दर्जा मिळाला पाहिजे. श्रमिकांचा सन्मान झाला पाहिजे. शिक्षणाच्या समान संधी आणि त्याही मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्याची गरज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सातत्याने व्यक्त करत होते. शिक्षण गरिबांच्या दारात पोहोचत नाही तोवर राजकीय लोकशाही परिपक्व होणार नाही. शिक्षणाचा विचार तळाशी असलेल्या समाजापर्यंत पोहोचण्याची गरज होती. शिक्षणाचा विचार तळाशी पोहोचला तरच कायद्याचे व न्यायाचे राज्य निर्माण होण्याची शक्यता आहे.
आज शिक्षण वाडीवस्तीवर पोहोचले असले, तरी शिक्षणातून राज्यघटनेतील मूळ विचार न पोहोचल्याने आपल्याला परिपक्व लोकशाहीच्या दिशेचा प्रवास वेगाने करता आलेला नाही. त्यामुळे स्वातंत्र्याच्या 76 वर्षांत आपण शिक्षणाचा विचार अधिक गंभीरपणे करण्याची गरज होती. आपल्याकडे लोकशाहीचा प्रवास सुरू असला तरी अपेक्षित शिक्षणाचा विचार न रूजल्याने लोकशाहीचे फलित प्राप्त होताना दिसत नाही. लोकशाहीसाठी लागणारे शहाणपण मनामनात पेरण्यास शिक्षण फारसे यशस्वी होऊ शकले नसल्याचे प्रतिबिंबीत होते आहे. आपल्या राज्यघटनेतील विचार समाजमनात पेरायचे असतील आणि समस्या निराकरण करायच्या असतील तर शिक्षण क्रांतीची गरज डॉ. बाबासाहेब आंबेडकर अधोरेखित करतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणाची शक्ती ज्ञात होती. डॉ. बाबासाहेब हे कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी गेले होते. त्यांनी त्या अगोदर भारत अनुभवला होता आणि अमेरिकाही ते जाणत होते. अशा वेळी दोन देशातील सामाजिक परिवर्तनातील फरक त्यांच्या लक्षात आला होता. त्या परिवर्तनामागे शिक्षणाचा पाया होता. तेथील निरीक्षणातून भारतीय समाजातील दारिद्य्र, जातीव्यवस्था आणि विषमता संपुष्टात आणण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे पुनःपुन्हा अधोरेखित करत होते.
वंचित, दलितांच्या आयुष्यात शिक्षणांची संधी आली तर त्या संधीचे सोने करण्यासाठी त्यांनी पावले उचलायला हवी ही त्यांची अपेक्षा होते. शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त केले पाहिजे. ज्ञानासाठी हवे ते कष्ट उपसण्याची तयारी दर्शवली पाहिजे. बाबासाहेब ज्या वाटेने गेले त्याच वाटेने सर्व बांधवांनी जायला हवे यासाठी त्यांचा प्रयत्न होता. शिक्षणाने त्यांना परिवर्तनाची वाट सापडली होती. शिक्षणाने त्यांचे आयुष्य बदलले होते. ज्ञानाची ताकद ते जाणून होते. त्यासाठी त्यांनी प्रचंड साधना केली होती.
आज आपण त्यांना राज्यघटनेचे शिल्पकार संबोधत असलो, तरी तो प्रवास इतक्या सहजतेने घडलेला नाही. त्यामागे त्यांची प्रचंड साधना होती. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात विषय जेव्हा चर्चेला येईल तेव्हा आपण शांत राहणे हे योग्य ठरणार नाही. अस्पृश्य आणि भारतीयांच्या राजकीय अधिकारासाठी आपण काही केले पाहिजे ही जाणीव त्यांना फारच आरंभी झाली होती. शिक्षण माणसाला विचार करायला शिकवते. गुलामीतून मुक्त करते. त्यामुळे त्यांची वाट ही त्याच दिशेची वाटचाल होती.
सायमन कमिशन सोबत चर्चा करण्यासाठी निवडलेल्या प्रदेश समितीवर त्यांची निवड झाली होती. हे लक्षात घेऊन भारतीयांच्या हक्कासाठी भूमिका घ्यावी लागणार होती. त्यासाठी कायदा, राज्यशास्त्र, अर्थशास्त्रासारख्या अनेक विषयांचा अभ्यास असलेल्या डॉ. आंबेडकरांना देखील संविधानांच्या अभ्यासाची गरज वाटली होती. त्यांनी काही मित्रांकडून उसने पैसे घेतले आणि संविधानासंबंधीची असलेली अनेक पुस्तके विकत आणली. हाती 15/20 पुस्तके होती. त्यांनी अभ्यासासाठी घराचे दरवाजे खिडक्या बंद केल्या. कोणी भेटायला आले तर भेटणे नाकारले.
कोणालाच भेटायचे नाही याची काळजी घेतली. अगदी चहा आणि जेवणही हवे असेल तर खिडकीतून मागवले जायचे. दरवाजाला बाहेरून कुलूप लावले होते. कोणत्याही परीस्थितीत वाचन सुटणार नाही याची काळजी घेतली जात होती. पुस्तके संपल्यावर त्यांनी आणखी काही पुस्तके मागवली. प्रचंड पुस्तके वाचत होते. याचे कारण या देशातील सामान्यांना अधिकार मिळायला हवेत हीच काय ती धारणा होती. अखेर पुस्तकांची उधारी देण्यासाठी चारमिनार ही घराची वास्तू विकावी लागली असे अभ्यासक सांगतात. ज्ञानाने जीवनात परिवर्तन घडते ही अनुभूती त्यांनी घेतली होती. त्यांच्या समग्र जीवन वाटचालीतून अधोरेखित होते. त्यामुळे ते आपल्याला शिक्षणाचे मोल सातत्याने सांगत होते. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा विचारच शिक्षणाचे मोल अधोऱेखित करतो.
ज्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा स्पर्श झाला नाही त्या माणसांच्या आयुष्याला विकासाची दिशा मिळत नाही हे अनुभवाने ते सांगत होते. शिक्षणामुळे माणसांच्या आयुष्यात क्रांती होईल, त्या क्रांतीमुळे माणसाची मान उंचावेल. शिक्षण हाती आल्याने स्वाभिमानाने जगण्यास मदत होईल. जगाच्या पाठीवर वंचित आणि दलितांच्या आयुष्याचा उद्धार करण्यासाठी इतर कोणत्याही गोष्टी फारशा उपयोगाच्या नाहीत. त्यामुळे बाबासाहेब प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असण्याची गरज सातत्याने व्यक्त करत होते. ते म्हणाले होते की, शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा लाभ आहे. तो प्राप्त व्हावा या करीता आम्ही कोणत्याही संघर्षास तयार राहायला हवे. शिक्षणासाठी कोणत्याही त्यागास आम्ही तयारी दर्शविण्याची गरज आहे. मात्र शिक्षणांच्या संधी, अधिकार प्राप्त करण्यासाठी काहीही करण्यास तयारी हवी.
शिक्षणामुळे मानसिक, बौद्धिक विकास साधला जाणार असतो. त्यामुळे सामाजिक गुलामगिरी नष्ट होईल. त्याचबरोबर आर्थिक उन्नतीची दिशा मिळेल. राजकीय स्वातंत्र्य मिळण्यासाठी शिक्षण महत्त्वाची गोष्ट आहे. शिक्षणाशिवाय कोणाचाही उद्धार नाही हे ते सतत सांगत होते. व्यक्तीला जाणीव करून देते ते खरे शिक्षण ही त्यांची धारणा होती. स्वातंत्र्यदिन साजरा करताना सामान्यांना मिळालेले अधिकार प्राप्त करायचे असतील तर शिक्षणातून त्याची जाणीव होण्याची गरज आहे. शिक्षण नसेल तर अधिकार कितीही दिले तरी त्यासाठीचे शहाणपण येत नाही. त्यामुळे अधिकारांचा परिणाम साधला जाणार नाही. आपल्या व्यक्तिगत जीवनात देखील यश प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी शिक्षणाचा विचार महत्त्वाचा ठरतो. विद्येशिवाय सामान्यांच्या उद्धाराचा कोणताही दुसरा मार्ग नाही.
भारतीय राज्यघटना निर्माण करताना आपण स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या तत्त्वांचा स्वीकार केला आहे. या तत्त्वांवर आधारित समाज निर्माण करण्याचे मोठे आव्हान होते. हे आव्हान जर आपल्याला पेलायचे असेल तर ती शक्ती फक्त शिक्षणात आहे. आपण शिक्षणातून नैतिक, मूल्याधिष्ठित, विवेकी समाज निर्माण करण्याची गरज आहे. असा समाजच लोकशाही व्यवस्था अधिक उत्तम दिशेने घेऊन जाऊ शकेल. आपल्याला बलशाली राष्ट्रनिर्मिती करायची असेल तर शिक्षण हे सर्वात प्रभावी असे साधन आहे. राष्ट्र म्हणून समाजात एकात्मता असायला हवी असते. त्याकरिताची जाणीव आणि ओळख शिक्षणाशिवाय कशी होणार? हा खरा प्रश्न आहे. शिक्षणाशिवाय आपल्याला कोणताही पर्याय नाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुनःपुन्हा सांगत होते. समाजाच्या उन्नतीचा विषय निघतो तेव्हा त्याच्या मुळाशी आर्थिक समस्या आहे असे म्हटले जाते, पण ते काही खरे नाही.
मुळात त्यांच्या प्रश्नांच्या मुळाशी शिक्षण ही समस्या आहे. आपल्याला मिळालेल्या अधिकाराची भाषा कायद्याने होत असली तरी ते अधिकार देण्याची मानसिकता आणि उपभोगण्यासाठीची विवेकी मानसिकता नसेल तर लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा परिणाम साधला जात नाही. दुसऱ्याच्या अधिकारावर गदा आणणे, मते विकत घेणे आणि मते विकणे, लोकशाहीच्या दिशेने जाताना चुकीच्या परंपरा निर्माण करणे, लोकशाहीत निवडून येताना विचारशून्यता दाखवत वाममार्गाचा अवलंब करणे असे प्रकार सतत घडत असतील तर तो लोकशाहीचा पराभव आहे. आज राजकीय लोकशाहीत विचारशून्यता आली असल्याचे पुनःपुन्हा अधोरेखित होते. समाजात आज अनेक प्रश्न आहेत. त्याच्या मुळाशी शिक्षणाचा अभाव हेच कारण आहे.
वर्तमानात असलेली आर्थिक, सामाजिक विषमता नष्ट करण्याचे मोठे आव्हान आहे. विषमता नष्ट झाल्याशिवाय कोणत्याही समाजात आणि राष्ट्रात एकात्मता, अखंडता अबाधित राहणार नाही. आपल्याला राष्ट्राची एकसंधता टिकविण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. केवळ शिक्षणाच्या पदव्या धारण केल्या म्हणजे प्रश्न सुटत नाही, तर शिक्षणाच्या माध्यमातून होणारी विचाराची पेरणी अधिक महत्त्वाची आहे. शिक्षणातून “स्व’ची जाणीव महत्त्वाची असते ती झाली की लोकशाहीत अपेक्षित भूमिका महत्त्वाची ठरते हे लक्षात घ्यायला हवे. त्यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणक्रांतीची गरज व्यक्त करत होते.
– संदीप वाकचौरे