एक निमसरकारी कार्यालय, जिथं मी शाखा अभियंता म्हणून काम करत होतो. माझे वरिष्ठ होते कार्यकारी अभियंता. त्यांचं माझ्याकडे काही कार्यालयीन काम असलं की शिपायामार्फत बोलावणे येई. जेव्हा बिगर कार्यालयीन काम असायचं तेव्हा ते केबिनबाहेर यायचे आणि मला हाक मारायचे. त्यांच्या या प्रघातामुळे बोलावणं आलं की मला मानसिक तयारी करणं सोपं व्हायचं.
त्या दिवशी त्यांच्या केबिनचा दरवाजा अर्धवट उघडून त्यांनी मला हाक मारली. मी नेहमीपेक्षा जास्त तत्परतेने आत गेलो. मला ते किंचित काळजीत वाटले. काहीतरी कौटुंबिक समस्या असावी. त्यांचा ताण कमी व्हावा म्हणून मी स्मित करत त्यांच्या समोर बसलो.
“तुम्ही येत्या रविवारी फ्री आहात का?’
“होय सर’
“गुड. एक अवघड काम आहे. मला सकाळी सकाळी अध्यक्षांचा फोन आला होता. त्यांनी एका ठिकाणी जमिनींची चौकशी करायला सांगितले आहे.’ “सर, पण तो भाग आपल्या संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये येत नाही. तिथल्या जमिनींची चौकशी?’
थोड्याशा हळू आवाजात ते म्हणाले, “अध्यक्षांना वैयक्तिक कारणांसाठी त्या भागात जमिनीमध्ये गुंतवणूक करायची आहे. कळत नकळत त्यांच्या खासगी गुंतवणुकीचा मी सल्लागार झालोय खरा. तेव्हा आपल्याला तिकडं जायचयं. तुमची बाइक आहे ना?’
“आहे ना सर, पण आपण कार्यालयाची गाडी का घेऊन जात नाही?’
“त्याचं कायये, एकतर काम सरकारी नाही आणि त्याचा गाजावाजा व्हायला नकोय. म्हणून म्हटलं…’
रविवारी सकाळी माझ्या बाइकवर बसून मुख्य रस्त्याला लागलो. त्यांच्या मनावरचा ताण थोडा कमी झालाय असं मला जाणवलं. ते म्हणाले, “मागे एकदा कधीतरी तुम्ही खडकवाडीच्या शाळेबाबतीत माझ्याशी ओझरतं बोलला होता. त्या शाळेचे संस्थापक तुमच्या परिचयाचे आहेत असं दिसतयं. आपण जर त्यांना भेटलो तर त्या भागातील जमिनींची खरी आणि इत्यंभूत माहिती मिळेल असा माझा होरा आहे. म्हणून आपण पहिल्यांदा त्यांची गाठ घेऊ. कदाचित काम सोपं होऊन जाईल.’
मी मनापासून “यस सर’ म्हटलं. खडकवाडीच्या शाळेचा विषय निघाला आणि आम्ही तिकडेच चाललो होतो म्हणून मी म्हणालो, “सर, त्या शाळेचा इतिहास आणि भूगोल, दोन्ही जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल. सांगू का?’
“परवानगी कसली विचारताय, बोला.’
“आपण ज्यांच्याकडे चाललोयं ते गृहस्थ ऐंशीच्या आसपास आहेत. माझ्या वडिलांचे मित्र आहेत. वडील गेल्यानंतरही त्यांनी आमच्याशी पूर्वीसारखेच संबंध ठेवलेत. जेव्हा ते पन्नाशीत होते तेव्हा एका बी.एड्. कॉलेजचे प्राचार्य होते. त्या संस्थेत जरी ते मोठ्या पदावर होते तरी त्यात त्यांचं मन रमत नव्हतं. शिक्षणक्षेत्रात काही मूलभूत काम व्हावं अशी त्यांची आस होती. खडकवाडी भागाचं भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे तो भाग खडकवासला धरणाला लागून डोंगरांनी वेढलेला आहे. छोट्या मोठ्या वाड्यांमध्ये काही गुंठे शेती असलेली अनेक कुटुंबं तिथं रहात होती. आसपास शिक्षणाची काही सोय नसल्यानं आजोबापासून नातवापर्यंत सगळे अक्षरशत्रू. या गृहस्थांनी ठरवलं की इथं शाळा काढायची. एक झोपडीवजा जागा मिळाली.
वाडीवाडीतनं फिरत त्यांनी पंधरावीस मुलं गोळा केली आणि त्या जागेत शिक्षणाच्या मूलभूत कामाला सुरुवात केली. मुलांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. वर्षा दोन वर्षात वीस पंचवीस मुलं यायला लागली. मुलं वाढली म्हणून दोन शिक्षक आणले. त्यांचे पगार कुणी करायचे. कॉलेजचा त्यांचा पगार झाला की दुसऱ्या दिवशी शिक्षकांचा पगार व्हायचा.
सुरुवातीच्या काळात आजूबाजूच्या लोकांनी या ध्येयवेड्याची चेष्टा केली. तरीही ते पाय रोवून उभे राहिले. मग लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. तरीही ते पाय रोवून उभे राहिले. मग विरोध करणारे लोकच त्यांना मदत करायला लागले. देणगीदाखल थोडी मोठी जागा मिळाली. विद्यार्थी साठ सत्तर, शिक्षक चार. शाळा आकार घेत राहिली. देणग्या मिळत गेल्या. शिक्षकांचे पगार ही समस्या न राहता तो श्रद्धा आणि सबुरीचा विषय झाला.
आता शाळेची स्वतंत्र इमारत झाली. वर्ग वाढत वाढत दहावी पर्यंत गेले. निकाल सत्तर ते ऐंशी टक्के लागायला लागला. यांनी महाविद्यालयातून स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि अधिक जोमानं कामाला वाहून घेतलं. आज त्या शाळेत दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. ग्रंथालय, प्रयोगशाळा, छोटसं व्यासपीठ उभं आहे. लोकांचं प्रेम आणि निकालाचं शेकडा प्रमाण वाढत चाललयं. टिंगल करणारे आता त्यांना “बाबा’ म्हणतात आणि शाळेला “बाबाची शाळा’ असं नाव मिळालयं.
पाठीमागे बसलेल्या आमच्या साहेबांच्या चेहऱ्यावर हालत जाणारी प्रत्येक रेषा मला न बघता समजत होती. आम्ही शाळेत एक टेकाड चढून गेलो. रविवार असल्यानं सामसुम होती. एका दोन खोल्यांच्या घरात राहणारे सर सुदैवाने घरात होते. आमचं स्वागत झालं. दोन वेळा चहा झाला. कार्यकारी अभियंत्यांना मी सांगितलेली त्रोटक माहिती आणखी प्रश्न विचारायला उद्युक्त करून गेली. सरांच्या ओघवत्या भाषेनं आणि कळकळीनं अवघा इतिहास, शाळेची प्रगती आणि भविष्यकाळातील योजना यांची भरजरी शाल साहेबांच्या पुढे उलघडत गेली.
आमची जायची वेळ झाली. साहेब उठून उभे राहिले. खिशातून त्यांनी पाच हजार रुपये काढले आणि सरांच्या हातावर ठेवले. सर टेबलाचे खण शोधत राहिले. साहेब म्हणाले, “सर, काय शोधतायं?’
सर म्हणाले, “काही नाही, देणगीचं पावतीपुस्तक शोधतोयं. आज रविवार असल्यानं शाळा बंद आहे ना. बहुधा पावतीपुस्तक शाळेच्या कार्यालयातच राहिलं असावं.’
सदगदीत स्वरांत साहेब म्हणाले, “सर, राहू द्यात पावती वगैरे.’ “असं कसं? प्रत्येक देणगीची पावती द्यायलाचं हवी ना.’
“हे बघा सर, तुमच्या शाळेसाठी केलेल्या प्रत्येक खर्चाची पावती तुम्हाला मिळते का? मी एक सरकारी अधिकारी आहे. असे खर्च अनेकदा करावे लागतात त्यांची पावती नसते. हे खर्च पदरमोड करून भागावावे लागतात. या पैशातून असे खर्च करा. यापलीकडे मला काही सांगायचे नाही.’
साहेबांनी वाकून सरांना नमस्कार केला. साहेब उभे राहताच सर वाकू इच्छित असताना त्यांना साहेबांनी थांबवलं आणि घट्ट मिठी मारली.
मी दोन नमस्कार पाहिले. एक पूर्ण झालेला आणि एक अर्धवट. नमस्कारातील सात्विकता आणि सौंदर्य मी माझ्यात मुरवून घेत होतो.
आम्ही बाहेर पडलो. साहेब म्हणाले, “आता सरळ माझ्या घरी जाऊ या.’
“साहेब, आपल्याला जमिनीचं बघायचं होतं, विचारायचं होतं, ते तसचं राहिलं की.’
साहेब माझ्याकडे बघून प्रसन्न हसले. अगदी त्या नमस्कारा इतकेच.
(काल्पनिक कथा)
दीपक पारखी