आज प्रमिला फार खूश होती. तिची भिरभिरणारी नजर सारखी दाराच्या चौकटीकडे जात होती. कारणही तसेच होते. तिच्या एकुलत्या एका भावाचे लग्न ठरले होते आणि आज त्या लग्नासाठीचे निमंत्रण द्यायला तिचे वडील येणार होते. प्रमिला फार खुशीत होती, शेवटी तिच्या वडिलांनी जे बोलले होते तेच केले होते. वडिलांचे मत होते की आजूबाजूच्या चार जिल्ह्यांतील मुलगी मी सून म्हणून नाही करणार जेणेकरून माझ्या मुलींना त्रास नाही व्ह्यायचा.
एकदाचे प्रमिलाचे वडील आले, चहापाणी आवरले, निमंत्रण पत्रिका देऊन झाली. पण इथे एक चूक झाली. प्रमिलेच्या वडिलांनी तिच्या सासरच्या पाहुण्यांच्या पत्रिका देखील त्यांनाच दिल्या व ह्या तुम्ही द्या असे सांगितले. हा प्रसंग साधारण 40-45 वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे त्यावेळची लोक फार खाष्ट. त्यांनी तिथे आपली नाराजी व्यक्त केली. आम्ही काय पोस्टमन आहोत का, असे म्हणून प्रमिलेच्या वडिलांची पिटाळणी केली. झाले, त्या दिवसापासूनच प्रमिला काळजीत होती की लग्नकार्य कसे होईल.
लग्नाचा दिवस उजाडला. प्रमिला किती मागे लागली सासरच्या मंडळींच्या परंतु तिला तिच्या एकुलत्या एक भावाच्या लग्नासाठी चार दिवस अगोदर जायची परवानगी मिळाली नाही. शेवटी लग्नादिवशी ती तिच्या दिरांबरोबर लग्नाला आली. लग्नकार्य पार पडले. शेवटी जायची वेळ आली. तिचे भावजी नाराजितच होते. जेवले देखील नाहीत. प्रमिलेला म्हटले, चल आत्ताच्या आत्ता, मला तुला घेऊन यायला सांगितलेय. प्रमिला गयावया करत म्हणाली, अहो एकुलता एक भाऊ. आज त्याची वरात आहे.
मी उद्या सकाळी पहिल्या गाडीने येते. आज नाही आलीस तर येऊ नको, असा निरोप ठेवून भावजी निघून गेले. रात्री वरात खूप आनंदात पार पडली. प्रमिला वरून खूश होती; पण आतून फार काळजीने व्यथित होत होती. लग्नकार्य झाले, पै पाहुणे निघून गेले. तो काळ असा होता की संदेशवहन करण्यासाठी टपाल हाच स्रोत होता.सकाळी सासरचे टपाल आले. प्रमिलेला तिथेच ठेवून घ्या, पाठवायची गरज नाही. बिचारीला रडू आवरेना आणि आनंदाच्या प्रसंगी रडता देखील येईना. शेवटी नवी नवरी जाईपर्यंत तिने तोंड दाबून सारे सहन केले आणि नवरी पाच दिवसांसाठी माहेरला गेली आणि हिने हिचं मन मोकळे केले.
नुकताच लग्न झालेला लहान भाऊ त्यावेळी फार लवकर लग्न व्हायचं, तो थोडे लाडू वगैरे घेऊन तिला पोचवायला तिच्यासोबत सासरी गेला. परंतु त्यांनी त्याला दारातच दोन थोबाडीत दिल्या. प्रमिलेच्या अंगावरचे सारे दागिने काढून घेतले आणि दारातून हाकलून लावले. बिचारी रडत नशिबाला दोष देत पुन्हा माहेरी आली. ती जवळपास 8 महिने राहिली. पण तिचे मन तिला स्वस्थ बसून देत नव्हते. तो काळ असा की स्त्रियांना वाटायचे कसेही असुदे पण माझं मरण नवऱ्याच्या दरात होऊ दे. तिच्या वडिलांना पण काळजी सतावत होती.
एके दिवशी प्रमिलेच्या आईचा चुलत भाऊ आणि तिच्या वडिलांचे मित्र प्रमिलेच्या वडिलांकडे आले आणि म्हणाले, बापू मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्ही आमच्यासोबत चला, आम्ही जे बोलेल ते फक्त ऐकून घ्यायचे. काही प्रतिक्रिया द्यायची नाही.
आम्ही वाईट बोललो तरी शांत बसायचं. बिचारे मुलीचे वडील शेवटी ते प्रमिलेसाठी तयार झाले आणि प्रमिलेला घेऊन ही सारी मंडळी सासरी आली.दरम्यान बराच काळ मध्यंतरी गेला. त्यांचाही थोडा राग कमी झाला होता. तिथे गेल्या गेल्या प्रमिलेसोबत आलेल्या मंडळींनी तिच्या वडिलांना बोलायला चालू केले. इतके वय झाले तुम्हाला काही कळते का नाही, पाहुण्यांना लग्नाला गाडी पाठवायची असते, कपडे द्यायचे असतात, असली काही पद्धत पाळाली का नाही, चूक झाली म्हणा आणि मुलीचं नांदने लावा. यावर सासरची मंडळी कबूल झाली. पण त्यांनी एक भयंकर अट घातली ती ही की, तिच्या माहेरचा माणूस पुन्हा ह्या चौकटीत येणार नाही आणि तीसुद्धा तिकडे येणार नाही.
बापरे! प्रमिलेच्या काळजावर जो वार झाला त्याची कुणी कल्पना करू नाही शकणार. बिचारी तयार झाली. वडिलांना शेवटचे भेटली आणि आतल्या घरात गेली. इकडे वडील बायकोला काय तोंड दाखवू तिला काय उत्तर देऊ, तुला पुन्हा मुलगी पाहायला मिळेल की नाही माहीत नाही, असा तह करून आलो हे कोणत्या तोंडाने सांगू, असा विचार करत खिन्न तोंडाने घराची वाट चालू लागले.
प्रमिलेच्या आईला जेव्हा हे समजले तेव्हा बिचारी हबकून गेली, नवऱ्यावर फार भडकली. मी आता कधी बघू शकणार मुलीला, असे विचारू लागली. वडील हतबल होऊन बसले होते. ते विचार करत होते की जे झाले ते चांगले की वाईट यावर काळ उत्तर देईल, अशी स्वतःची समजूत घालत होते.
हळूहळू दिवस जात होते. थोडे थोडके नाही तर बारा वर्षांचा काळ निघून गेला. दरम्यानच्या काळात प्रमिला गरोदर राहिली होती, परंतु बाळ पोटात दगावले. फार विनंत्या करून देखील सासरच्यांनी तिला माहेरी नाही पाठवले. शेवटी इकडे तिच्या एकुलत्या एका भावाच्या मुलाचे ऑपरेशन करायची वेळ आली तेव्हा तिच्या वडिलानी विनंती केली की, माझ्यासाठी नको पण तिच्या भावासाठी तरी तिला भेटायला पाठवा.दरम्यान खूप काळ लोटला असलेने त्या माणसांना पण थोडी दया आली आणि त्यांनी एके दिवशी तिला तिच्या दिराबरोबर पाठवले. ती रेल्वेने दवाखान्यात भेटायला आली. परंतु तो काळ असा होता की फोनची सुविधा नव्हती. त्यामुळे ती नेमकी कधी येणार आहे, हे तिच्या आईला माहीत नव्हते. नेमके त्याच दिवशी तिची आई रानात गेली होती. जेव्हा इकडे घरात कळले की प्रमिला दवाखान्यात आली आहे तेव्हा तिची लहान बहीण सायकलवरून जीवाच्या आकांताने आईला बोलवायला रानात गेली.
आईला जेव्हा कळाले तेव्हा ती धावत पळत आली. मिळेल ती गाडी पकडून जिल्ह्याला दवाखान्यात पोचली. प्रमिलेची आई दवाखान्यात पोचली परंतु रेल्वेने जायचे असल्याने प्रमिला रेल्वेस्टेशनला निघून गेली होती. त्या बिचारीला आई येणार आहे हे माहीत नव्हते. इकडे आई एका डोळ्यातून आसवे पुसत दुसऱ्या डोळ्यातून मुलीच्या भेटीच्या आशेनं पुन्हा रेल्वे स्टेशनकडे पळत सुटली. प्रमिलेची आई रेल्वे स्टेशनवर पोचली. अजून रेल्वे सुटायची होती.
वेड्यासारखी डबे शोधत होती आणि शेवटी एकदाशी प्रमिला नजरेस पडली. प्रमिलेचे दीर माय लेकीला भेटायला यावे, बोलता यावे म्हणून थोडे लांब जाऊन उभे राहिले. बारा वर्षे… जवळपास बारा वर्षांनी आई लेकीला पाहत होती. दोघींनाही काही बोलता येईना. दोघींच्या डोळ्यातून फक्त अश्रू ओघळत होते. फार हमसून हमसून दोघी रडल्या. बोलल्या काहीच नाहीत. पण न बोलताही बरेच बोलल्या. शब्दातून बोलायला सुरुवात करणार इतक्यात रेल्वेचा भोंगा वाजला आणि पुन्हा प्रमिला सासरी जायला निघाली…
– गिरीश मिठारी