काही वर्षांपूर्वी जानूभाऊ गेला. बहुतेक हृदयविकाराच्या झटक्यानं. त्याच्याबरोबर जेवणाचा बेत राहूनच गेला. दुसऱ्याची वेदना जाणण्याचं, त्यासाठी लढण्याचं आणि तमाम माणसांचं जगणं आणखी सुखकर करण्याची ऊर्मी त्याच्या अंगी होती. या अनंतात त्याच्या अस्तित्वाचं कणभर का होईना नक्कीच योगदान आहे.
ढा फाट्याला प्यागो रिक्षा थांबली. आम्ही दोघं उतरलो. तो जसा चालू लागला तसा त्याच्या मागंमागं मी चालू लागलो.
मी विचारलं, “अजून किती लांब आहे तुमचं गाव.’ “त्या टेकडीच्या ते बाजूच्या अंगाला…’ तो लांब दिसणाऱ्या टेकडीकडे बोट दाखवत म्हणाला. अंगात गडद पिवळ्या रंगाचा शर्ट, कमरेला काळ्या रंगाची पॅंट, पायात बऱ्यापैकी डिझाईनची चप्पल, हातात घड्याळ असा त्याचा पोशाख.
तो पुढं चालला होता नि मी त्याच्या मागंमागं. साडेपाच फूट उंचीचा, कसलेल्या शरीराचा आदिवासी समाजातला कार्यकर्ता. वय पन्नाशीच्या पुढचं. डोक्यावर पांढुरके केस. बसके गाल, उंच नाक आणि तांबूस झाक असलेले डोळे. त्याला मी तसा बरीच वर्षं ओळखत होतो, पण खरी भेट झाली ती एका वसईतल्या एका मोर्च्यात.
वसईतल्या एका पोलीस स्टेशनवर मोर्चा होता आणि हा माणूस मोर्च्याचं नेतृत्व करत होता. हो… हाच माणूस नेतृत्व करत होता. काही बांधकाम व्यावसायिकांनी आदिवासी समाजातल्या लोकांच्या जमिनी बळकावल्या होत्या. त्याच्या विरोधात गेले अनेक महिने अर्ज-तक्रारी देऊन काहीच हालचाल झालेली नव्हती. त्या विरोधात या संघटनेनं हा मोर्चा काढला होता.
चार-पाचशे आदिवासी बायापुरूष होते. पोलीस स्टेशनच्या समोर एका बाजूला मेगाफोनवरून एक कार्यकर्ता घोषणा देत होता. बाकीची मंडळी त्याला साथ देत होती. आता भाऊ बोलतील… मेगाफोनवरून कार्यकर्त्याने घोषणा केली. तशी चिडीचूप शांतता पसरली. पोलीस स्टेशनच्या व्हरांड्यात येऊन गोळा झालेले होते. हातात लाठ्या होत्या. त्यांचेही कान टवकारले. माइक हातात घेऊन हा माणूस उभा राहिला. मला वाटलं हा माणूस बोलून बोलून काय बोलेल, तेच जुने घिसेपिटे किस्से, वंचित, हक्क… वगैरे.
पण त्याने जी मांडणी केली ती ऐकून मी थक्क झालो. त्याचं एक वाक्य आजही कानात घुमतंय… आमच्याकडं सन्मानाने मागितली असती तर आम्ही आमची जमीन तुम्हाला मोफत देऊन टाकली असती… त्याच्या या वाक्यावर पोलिसांचीही मती गुंग झाली. पुढच्याच वाक्याला त्याचा सूर बदलला. तो म्हणाला, पण तुम्ही अन्यायाने आमच्या जमिनी बळकावल्या आहेत. त्यामुळे आता आम्ही शांत बसणार नाही. कुणीही काहीही केलं तरी गुमान हाताचा अंगठा कापून देणाऱ्या एकलव्याचे आम्ही वंशज आहोत खरे. पण आम्ही गुमान बसणारे नाही, अंगठा कापून देणारे तर त्याहून नाही. आमच्या वाटेत कुणी आडवं गेलं आणि जास्तच शिरजोरी करू लागलं तर त्याचा अंगठा कापून घेण्याचीही आमची तयारी आहे.
प्रचंड टाळ्या वाजत होत्या. टाळ्या वाजता वाजता अचानक थांबल्या. काहीतरी खुणवाखुणवी झाली आणि सगळा जमाव एकदम जागेवरून उठला. काही क्षणात बायकांचा एक जथ्था पुढं झाला. आम्हाला न्याय मिळत नाही तोवर आम्ही साहेबांच्या केबिनमध्ये बसून राहणार… असं त्यातल्या एका बाईनं जोरात ओरडून सांगितलं नि मग घोषणा सुरू झाल्या.
पंचवीस-तीस बायका थेट पोलीस स्टेशनमध्ये शिरल्या. तिथं महिला पोलीस बहुतेक एक-दोघीच होत्या त्यामुळं त्यांचा विरोध लटका ठरला. या बायका थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये शिरून बसल्या. कारवाई करा तरच आम्ही इथून जाऊ, असं म्हणून ठिय्या मांडूनच बसल्या. पोलिसांची पुरती तारांबळ उडाली. फोन खणखणू लागले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रचंड तणावाखाली होते. अखेर अर्धा तास इकडे तिकडे फोन करून झाल्यावर स्वतः एसीपी साहेब येताहेत, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा कुठं तणाव थोडा निवळला.
अखेर तासाभरात एसीपी साहेब आले. भाऊ पुढं आले. त्यांच्यासोबत सात-आठ जणांनी अत्यंत शांतपणे सगळी परिस्थिती एसीपी साहेबांच्या कानावर घातली. कागदपत्रं दाखवली. एसीपी साहेबांनी लगेच गुन्हा नोंदवायचे आदेश दिले. गुन्हा नोंदवला गेला. एफआयरची प्रत घेऊनच हा मोर्चा परतला.
हे होते जानूभाऊ. जानूभाऊ. ही संघटना काही दिग्गजांनी 25 वर्षांपूर्वी स्थापन केली होती. आदिवासी बांधवांना संघटित करून त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, प्रशिक्षण देणे आणि स्वतःचा लढा स्वतः उभारता येण्याइतपत सक्षम बनवणे हा या संघटनेचा हेतू होता. संघटनेत सुरुवातीला दाखल झालेल्यांपैकी जानूभाऊ एक कार्यकर्ते. सुरुवातीची काही वर्षे गेल्यानंतर संघटनेच्या संस्थापकांनी ठरवलं की आता आदिवासी बांधवांवरच संघटनेची धुरा सोपवायची. तसे जानूभाऊ हे संघटनेचे अध्यक्ष झाले होते.
…रस्त्याने चालत आम्ही टेकडीच्या पायथ्यापर्यंत आलो. पुढे चढ होता पण डांबरी रस्ता होता. चढ अर्धा चढून गेल्यावर डांबरी रस्ता सोडून जानूभाऊ पायवाटेने जंगलात शिरला. चारी बाजूला झाडी आणि मधे पायवाट. असं पंधरा-वीस मिनिटं चालत गेल्यावर दोन-चार घरं दिसू लागली. त्यातलं एक घर जानूभाऊचं. जानूभाऊनं ओसरीवर चटई अंथरली. पाणी आणून दिलं. त्यांची बायकोही कार्यकर्ती. ती अद्याप घरी पोचली नव्हती.
गुळाचा चहा चालंल का, असं भाऊंनी विचारलं. मी होकार दिला. त्यांनी गुळाचा चहा बनवला. त्याची चव वेगळीच होती. मग आमच्या गप्पा रंगल्या त्यातनं हा माणूस अजून उलगडत गेला.
मी म्हणालो, “भाऊ मी तुमचं त्या दिवशीचं भाषण ऐकलं. हा सगळा अभ्यास कधी आणि कुठं केला तुम्ही. तुमचं शिक्षण किती झालंय.’
जानूभाऊ म्हणाले, “खरं सांगू का, मी शाळेत गेलोच नाही. जे काय शिकलो ते संघटनेत. संघटनेत प्रौढ साक्षर वर्ग होता तिथं लिहायला-वाचायला शिकलो. थोडंफार इंग्रजीही वाचता येतंय आता. आणि तिथल्या लोकांनी सांगितली ती पुस्तकं वाचत गेलो. त्यातून मिळत गेलं ते डोक्यात साचवत गेलो.’
थोड्या वेळानं जानूभाऊंची बायको आली. दोघांनी जेवूनच जाण्याचा आग्रह केला. पण मला पुढं एका ठिकाणी जायचं होतं म्हणून मी नम्रपणे नकार दिला. नंतर एखादा दिवस नक्कीच जेवणाचा बेत करू, असंही सांगितलं. चारच्या सुमाराला सुरू झालेल्या आमच्या गप्पा चांगल्या सूर्य मावळतीला लागला तरी सुरूच होत्या. अखेर मीच आवरत घेत निरोप घेतला.
काही वर्षांपूर्वी जानूभाऊ गेला. अशी माणसं आपल्या आयुष्यात येत असतात ती आपलं जगणं समृद्ध करण्यासाठी. आदिवासी असो, शहरात राहणारा असो नाहीतर डोंगरात वसणारा… ही सगळी माणसंच. प्रत्येकाच्या अंगी काही विशेष असतंच. तसं जानूभाऊकडं माणूसपण होतं. दुसऱ्याची वेदना जाणण्याचं, त्यासाठी लढण्याचं आणि तमाम माणसांचं जगणं आणखी सुखकर करण्याची ऊर्मी त्याच्या अंगी होती. या अनंतात त्याच्या अस्तित्वानं कणभर का होईना नक्कीच योगदान दिलंय.
– डॉ. भालचंद्र सुपेकर