सकाळचे जेमतेम सात वाजलेले. लॅंडलाइन वाजला. हॅलो हॅलो करणारे आमच्या परिचयाचे एक निवृत्त सरकारी अधिकारी. माणूस तसा उत्साही. म्हणाले, “तुझ्याकडं सॅक आहे का?’ माझ्या मनात होतं की, म्हणावं, सॅक नाहीय. पण कसं कोण जाणे तोंडातून “हो’ गेलं. ते म्हणाले, “सॅक भरायची आणि चार दिवस बाहेर जाण्यासाठी ट्रॅव्हल्सच्या बसेस सुटतात तिथं रात्री नऊ वाजता ये.’
रात्रभर प्रवास करून जळगावला पोचलो. प्रवासात ते इतर गप्पा खूप मारत राहिले पण आपण कुठं चाललो आहोत हे काही गृहस्थ सांगेना. दहा मिनिट चालत राहिलो. आमच्याजवळ एक जीप येऊन उभी राहिली. आमचा प्रवास तासाभराचा झाला आणि एका जंगलात पोचलो. जंगलातील मातीच्या रस्त्यानी एका जुनाट बंगल्याशी आलो. दारात एक हसतमुख व्यक्तिमत्त्व.
“या या साहेब’ म्हणत त्यांनी मित्राला मिठी मारली. माझ्याकडं वळून मित्र म्हणाले, हे पुजारी… वनखात्यात अधिकारी आहेत. त्यांचा पाहुणचार घ्यायला आपण पाल या जंगलात आलोय. सुमारे चाळीस तास प्रश्न विचारून मी हैराण झालो होतो त्याचं उत्तर आता मिळालं. उन्हाळी संध्याकाळ झालेली. पुजारी साहेब माझ्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं देत होते आणि अचानक त्यांचं समोर लक्ष गेलं. दूरवर आगीच्या ज्वाळा आणि धूर दिसत होता. काही न बोलता त्यांनी आम्हाला जीपमध्ये बसायची खूण केली आणि जीप सुसाट निघाली. वणवा लागलेल्या ठिकाणी आम्ही पोचलो.
खैर आणि सागाची झाडं उभी पेटली होती आणि पुजारी साहेब चेहऱ्यावर अश्रू वागवत होते. क्षणात त्यांनी निर्णय घेतला आणि जीप एका वाडीवर घेतली. जीप परत वणव्याच्या ठिकाणी आली तेव्हा त्यातून सातआठ, बारापंधरा वर्षांची मुलं उतरली. बाजूची छोटी झुडपं उपटून मुलांनी हातात घेतली आणि वणव्याच्या बाहेरून पेटतं गवत झोडपायला सुरुवात करून व्याप्ती कमी केली. वीस एक झाडं जळताना पाण्याअभावी मूकपणं पाहावी लागली. पण वेळेत पोचल्यामुळे सत्तर ऐशी झाडं वाचवल्याचं समाधान त्यांच्या डबडबत्या चेहऱ्यावर दिसत होतं.
मला पुजारीच्या कर्तव्यनिष्ठेबद्दल अपार आदर वाटायला लागला. पुजारींच्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या तोंडून त्यांचं जंगली जगणं समजून घेत होतो. पुजारींची दिनचर्या पाहून हा माणूस इतका अथक काम कसा करू शकतो, असा मला प्रश्न पडला. न राहून मी त्यांना म्हटलं, “सर, इतकं काम करून तुम्ही थकून नाही का जात?’ त्यावर ते फक्त हसले.
दुपारी पुजारींच्या बरोबर व्याघ्र मोजणी अभियानासाठी दाट जंगलात शिरलो. जंगलात मुळात पालापाचोळा विरहित निव्वळ मातीची जमीन दिसणं मुश्किल. अशा परिस्थितीत मातीवर उमटलेले वाघाच्या पंजांचे ठसे शोधायचे. ठशांवरून हे ठसे वाघाचे आहेत का वाघिणीचे तसेच किती वयाच्या वाघाचे आहेत याचं अनुमान लावायचं. त्या ठशांवर प्लॅस्टर ऑफ पॅरिस ओतून त्याचा मोल्ड घ्यायचा. या मोल्डचा अभ्यास केला असता जेव्हा असं समजतं की पूर्वी गणना झालेल्या वाघाचाच हा ठसा आहे तेव्हा खट्टू न होता काम पुढं चालू ठेवायचं. आणखी एक गोष्ट म्हणजे वाघाच्या विष्ठेचे नमुने घ्यायचे. विष्ठेत सापडलेल्या प्राण्याच्या केसावरून कोणता प्राणी सावज होता याचा तर्क करायचा. आणि ही सगळी कामं करताना स्वसुरक्षेसाठी हत्तीवरून (जीप आतपर्यंत पोचत नसल्याने) ही शोधमोहीम राबवायची.
पुजारी नसताना माझे मित्र लाड मला म्हणाले, “तुला एक धक्कादायक माहिती सांगतो. या पुजारीची दोन इन्क्रिमेंट शिक्षा म्हणून शासनानं थांबवली होती. खात्यामार्फत काही कामं करून घेण्यासाठी पुजारींना मस्टर दिला होता. मस्टरवरच्या मजुरांना चौदा रुपये रोज होता. या गृहस्थांनी मजुरांचा पगार बारा रुपयांनी केला. या पद्धतीनं अनेक मस्टर झाले. याची कुणकुण वरिष्ठांना लागली. पेमेंट झालेले मस्टर घेऊन चौकशी अधिकारी जागेवर आले. मजुरांकडं चौकशी करून खातरजमा करून घेतली आणि यांची निलंबनाची शिफारस केली. हे जेव्हा मजुरांना कळालं तेव्हा ते एकत्रित वरिष्ठांकडं गेले आणि ही कारवाई मागं घ्या म्हणून गळ घालायला लागले. त्यावेळी आम्हाला चौदा ऐवजी बारा रुपये मिळत होते याला आमची पूर्ण संमती होती हे डोळ्यात पाणी आणून सांगत राहिले.
या भ्रष्टाचाराला तुम्ही कसं हो म्हणालात या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रश्नाला एकमुखी उत्तर मिळालं, पुजारीसाहेब देवमाणूस आहे. मजुरांना कमी पैसे देऊन वाचलेल्या पैशाचा एक निधी तयार केला. निधी थोडा बाळसेदार होताच. जळगावमधून पुजारींनी भाड्याने दोन शिवण मशीन आणली. स्वस्तात स्वस्त मांजरपाट कापडाचे दोन तागे आणले. शिवणकाम येणारा एक शिंपी आणला आणि ही सामग्री वस्तीवर पोचवली. शिंप्याने शिकवून आपले आदिवासी व्यावसायिक जातभाई तयार केले.
दोन महिन्यात कापड संपलं, शिंपी परत गेला, भाड्याची मशीन जाऊन सेकंड हॅन्ड मशीन आणली. मांजरपाटाच्या जागी वरच्या दर्जाचं कापड आणलं गेलं. वाडीवस्तीवरील बाया माणसं सणावाराला आपण शिवलेली चोळी, शर्ट घालून मिरवत राहिले. मस्टरमधील पैसे काढायची सवय पुजारीला लागून राहिली. आता ते जळगावला जाऊन एका सलूनमधून दोन कारागिरांना आठवडाभराची त्यांची कमाई ऍडव्हान्स देऊन घेऊन आले. या काळात चार चुणचुणीत तरुण पोरांना केस कापायचं, दाढी करायचं ट्रेनिंग देऊन कारागीर परत गेले. आता आदिवासी तरुण पोरी गुळगुळीत गाल आणि ऐटदार भांगाच्या लवकर प्रेमात पडायला लागल्या.
पालच्या जंगलाची दोन भागात विभागणी झाली आहे. एक भाग महाराष्ट्रातला आणि दुसरा मध्यप्रदेशातला. दुसऱ्या मध्यप्रदेशातील भागात लोक झिंज्या आणि दाढी वाढलेले ओंगळ दिसणारे तर पहिल्या महाराष्ट्राच्या भागात सुरेख केस कापलेले आणि नितळ दाढी केलेले. पुजारींना झालेल्या अपराधाची शिक्षा म्हणून निलंबित करणं आवश्यक होतं. पण लोकांचा रेटा आणि स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी यामुळे वरिष्ठांनी निलंबन न करता त्यांच्या दोन वेतनवाढी रोखून धरल्या. असे हे पुजारी.
जंगलातून मी बाहेर पडलो ते अनेक गैरसमज दूर करून. जंगलातील वनसंपत्ती आणि आदिवासी, जंगलातील प्राणी जगत आणि आदिवासी, वनखात्यातील कर्मचारी, अधिकारी आणि आदिवासी आणि सरतेशेवटी नागरी वस्तीत सुरक्षित जगणारे तुम्ही-आम्ही आणि आदिवासी.
– दीपक पारखी