बारा वर्षे झाली आमच्या लग्नाला. तेव्हापासून मी पाहत आलीये की जवान किंवा अधिकारी हे देशासाठी काहीही करण्याची तयारी ठेवूनच जन्माला येतात. त्यांच्यातील तो जोश, ते कमालीचे कठोर हृदय हे खास काही व्यक्तींनाच लाभले असावे. कशाची भीती म्हणून नाहीच! त्यांना ना कडाक्याच्या थंडीचा त्रास झालेला मी ऐकलंय ना रखरखीत उन्हाचा. कुठल्या मातीचे बनलेले असतात हे सैनिक असा प्रश्न पडावा अशी त्यांची सहनशक्ती असते. थोड्याशा उन्हात जाऊन आलो की डोकं दुखतंय, पित्त झालंय असे आपल्या बाबतीत घडणे नित्याचे आहे; पण हे मी एवढ्या वर्षांत कुठल्या सैनिकाच्या तोंडून ऐकले नाही.
2012 ला श्रीनगरमध्ये राष्ट्रीय रायफल्स मध्ये माझ्या यजमानांचे (आत्ताचे लेफ्टनंट कर्नल ऋषिकेश वर्तक) यांचे पोस्टिंग अडीच वर्षे होते. तेव्हा नशिबाने आम्हाला त्यांच्याबरोबर 10 महिने राहायला मिळाले. त्या काळात दोन खूप मोठ्या घटना घडल्या आमच्यासमोर. एक म्हणजे जेव्हा अफजल गुरूची फाशी! या घटनेचे काश्मीर खोऱ्यात उमटलेले पडसाद आणि आणि दुसरे म्हणजे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या भेटीआधी सुट्टीवरून परत येणाऱ्या जवानांच्या बसवर आणि ट्रकवर झालेला बेछूट गोळीबार. त्याचा परिणाम म्हणजे सैन्यावरचा ताण अधिक वाढला आणि ऋषिकेशना पुढचा महिनाभर कडक ड्युटी लागली.
त्यादरम्यान ते फक्त अर्ध्या तासासाठी वगैरे घरी यायचे आणि ते येणेसुद्धा अनिश्चित असायचे. कधी येणार, हे सगळे कधी संपणार अशा प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी त्यांच्याकडे ना वेळ होता ना मला परवानगी! एकदा सकाळी अचानक ते युनिफॉर्म घालून गेले आणि जाताना सांगून गेले की मी परत कधी येईन माहीत नाही, मला फोन करू नकोस आणि कोणीही आलं तरीही दार उघडू नकोस. तेव्हा आमची मुलगी फक्त अडीच वर्षांची होती. निघताना तिला कडेवर घेऊन गालातल्या गालात किंचितसे हसून काळजी करू नकोस, येईन मी लवकरच. असे म्हणताना मनातून आमची प्रचंड काळजी असताना चेहऱ्यावर ते जराही न दाखवण्याचे कौशल्य अभिनेत्यानंतर तर यांच्याकडेच असते बहुधा!
बरोबर दोन दिवसांनी ते परत आल्यावर जो काही आनंद झाला होता मला तो शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही. पण दमलेला चेहरा पाहून आल्यावर कुठे गेले होते वगैरे विचारायचा नाही नियम माहीत असल्यामुळे एक प्रकारचे मूक संभाषण चालू होते आमच्यात. तो पूर्ण दिवस झोपून काढला त्यांनी. म्हणजे लागोपाठ दोन रात्री नक्कीच झोपले नसणार हे मी ओळखले. पण ते परत येईपर्यंतचे दोन दिवस कसे गेले माझं मलाच माहीत. ना जेवायची इच्छा झाली ना रात्रभर झोप लागली. डोळे आणि कान फक्त दाराकडे लागलेले. जणूकाही आम्ही दोघी आणि आमच्यासारख्याच अजून काही जणी ते दोन दिवस कुठेतरी बंदिस्त आहोत की काय अशी भावना मनात येत होती. इंटरकॉम वरून बोलून आम्ही एकमेकींना धीर देत होतो. आपलं माणूस आपल्यासाठी किती महत्त्वाचे असते ते अशा प्रसंगातून जाणवते. असे प्रसंग मनावर कायमचे कोरले जातात आणि कधीही आठवले तरी अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही. पण अशा वेळी आम्ही सगळ्या जणींनी खंबीरपणे ते दोन दिवस निभावून नेले. म्हणूनच कोणीतरी म्हणले आहे सगळ्याच स्त्रिया सारख्या नसतात, काही सैनिकाच्या पत्नी असतात.
पण असे अनुभव घेणाऱ्या स्त्रिया त्या किती? मुली सहजासहजी सैन्यातल्या मुळाशी लग्न करायला नकोच म्हणतात. माझ्या नवऱ्याने जिथे लग्नासाठी नाव नोंदवले होते तिथे एका मुलीची माहिती वाचताना तिने चक्क लिहिले होते- “आर्मीवाला मुलगा नकोरे बाबा!’ बहुतांशी मुली उच्चशिक्षित असल्याने त्यांना स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण करायचे असते समाजात. त्यात आपले राहाते ठिकाण सोडणे अवघड असते. त्यात शहरातली मुलगी असेल तर अजूनच कठीण. अर्थातच यात काही गैर काहीच कारण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण करिअर तर सैन्यात भरती होऊनही करता येईल. खरे तर सैन्यदल हे करिअर म्हणूनही नक्कीच उत्तम आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकालाच सीमेवर जावे लागत नाही. डॉक्टर, वकील, इंजिनिअर हे क्षेत्र तुम्हाला सैन्यात दाखल होऊनही निवडता येते.
मेजर क्रिती रॉय या जॅग शाखेत काम करणाऱ्या माझ्या मैत्रिणीने तिचा अनुभव सांगितला. दिल्लीमध्ये मी एका न्याय व विधी कार्यालयात नोकरी करत होते तेव्हा सहज म्हणून एसएसबीची मुलाखत भोपाळ मध्ये जाऊन दिली. ही मुलाखत देणे म्हणजे अक्षरशः कसोटी लागते आपल्या ज्ञानाची. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तिथे मला विचारण्यात आले की मला निवड होईल की नाही अशी भीती वाटत होती. त्यामुळे जेव्हा भारतभरातून जवळपास 1000 च्या आसपास मुलामुलींमधून अंतिम टप्प्यात 10 जणांमध्ये माझी निवड झाली तेव्हा अत्यानंद झाला होता. त्यानंतर प्रशिक्षणापासून ते आजपर्यंत मी या संस्थेत खूप खूश आहे.
घरामध्ये कोणाची सैन्याची कुठलीही पार्श्वभूमी नसतानासुद्धा मला एकदाही सैन्य सोडावे असा विचारदेखील मनात आला नाही. केंद्र शासनाने मुलींसाठीसुद्धा सेवा निवृत्तीपर्यंत (परमनंट कमिशन) सैन्यात नोकरी करण्याचा पर्याय नुकताच उपलब्ध करून दिलाय या महत्त्वाच्या निर्णयामुळे माझे आयुष्यभर सैन्यामधलीच नोकरी करण्याचे स्वप्न आता नक्कीच पूर्णत्वास येईल. इथे मला आवडणारी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या देशबांधवांमुळे इथे खऱ्या अर्थाने “राष्ट्रीय एकात्मता’ अनुभवायला मिळते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या केसेसमुळे बाहेरच्या नोकरीपेक्षा कैक पटींनी जास्त शिकायला मिळते.
याबाबतीत गेली सतरा वर्षे सैन्यात नोकरी करत असलेल्या माझ्या मैत्रिणीने तिचा अनुभव सांगितला. वडील सैन्यात असल्यामुळे लहानपणापासूनच मला सैन्याची ओळख होती आणि वेगळे कुठले क्षेत्र निवडावे असे मला वाटलेच नाही. दर 2-3 वर्षांनी होणाऱ्या बाबांच्या बदल्या या बाकीच्यांना त्रासदायक वाटायच्या पण माझ्या दृष्टीने या बदल्यांनीच आम्हाला जीवनाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन दिला, चांगली शिकवण दिली आणि मुख्य म्हणजे जगण्याची जिद्द आणि आत्मविश्वास दिला. आज स्वतः या संस्थेचा एक भाग असल्याने मी अभिमानाने सांगू शकते की स्त्रियांसाठी सैन्यदलाइतके चांगले, दुसरे काम करण्याचे ठिकाण नसावे जिथे स्त्रियांना पुरुष्यांइतकाच आदर आणि सन्मान मिळतो. नुकतीच तिची बदली झालीये आणि त्याबद्दल तिने सांगितले की, माझ्या कुटुंबाची आणि माझी काळजी घेणे, माझ्या राहाण्याच्या ठिकाणापासून ते मला कुठल्या गोष्टीची गरज आहे का, हे आदराने, आपुलकीने विचारणे असे कुठली संस्था करत असेल तुमच्यासाठी? कायमच या संस्थेने मला खूप काही दिले आहे आणि त्यासाठी मी नेहमीच ऋणी राहीन.
जेव्हा माझे लग्न ठरले तेव्हा बरेच जणांनी सैन्यातील नवरा निवडल्याबद्द आश्चर्य व्यक्त केले. पण मुळात मला सैन्याबद्दल आकर्षण होतेच आणि त्यात 17 वर्षांची असताना नाशिकच्या भोंसला मिलिटरी स्कूल मधून प्रशिक्षण घेतले तेव्हा ते अधिकच वाढले होते. ऋषिकेशशी लग्न करण्याचा निर्णय सोपा नव्हता परंतु लष्करी सेवेची कुठलीही पार्श्वभूमी नसताना माझ्या धाडसी निर्णयाला माझ्या आई वडिलांनी पूर्ण पाठिंबा दिला तेव्हाच मी तो खंबीरपणे घेऊ शकले. त्यामुळेच आज एका सैन्याधिकाऱ्याची पत्नी अशी माझी ओळख आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे.
सद्यःस्थितीत एका अधिकाऱ्याची पत्नी पण अकरा वर्षे सैन्यात नोकरी केलेली निवृत्त मेजर नेहा मौसम कुमार या माझ्या मैत्रिणीने देखील एक पत्नी आणि एक अधिकारी म्हणून तिला आलेले अनुभव खूप सुंदरपणे व्यक्त केले. माझे वडील पोलीस खात्यात आहेत त्यामुळे लहानपणापासूनच घरात खाकी वर्दीची शान आणि त्याबरोबर आलेली शिस्त याचे बाळकडू आम्हाला मिळालेले आहे. आमचे वडील माझ्यासाठी आणि माझ्या धाकट्या बहिणीसाठी मित्र, आदर्श आणि हिरो सगळेच आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेतूनच आम्ही दोघीही सैन्यात भरती झालो. ही संस्था अशी आहे की जिथे तुम्हाला तुमच्या बुद्धीचीच नाही तर साहसाचीही चुणूक दाखवायला मिळते हे या संस्थेचे खास वैशिष्ट्य आहे आणि त्याची सुरुवात प्रशिक्षणातूनच होते. मी निवृत्त झाले असले तरी एका सैनिकाची पत्नी असल्यामुळे माझे या संस्थेशी बांधले गेलेले नाते अजूनही तसेच आहे आणि संस्थेवर असलेले माझे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.
एक प्रसंग मला इथे सांगावासा वाटतो; मी जेव्हा माझ्या युनिटमध्ये रुजू झाले तेव्हा एकमेव महिला अधिकारी होते. माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते जवानांपर्यंत सगळ्यांमध्येच एक प्रकारचे अवघडलेपण होते सुरुवातीला. जवान मला “मॅडम’ म्हणायचे. तेव्हा मी त्यांना सांगितले, मी अधिकाऱ्याची पत्नी जरी झाले तरी तुमच्यासाठी मी अधिकारीच आहे त्यामुळे तुम्ही मला “साब’च म्हटले पाहिजे. त्यानंतर त्यांच्यातला संकोच तर दूर झालाच पण आमची चांगली गट्टीही जमली आणि त्यामुळे एकत्र काम करताना खूप मजा आली. मी गरोदर असताना माझ्या युनिटच्या लोकांनी घरच्यांप्रमाणे माझी जी काळजी घेतली ते मी कधीही विसरूच शकत नाही. त्यामुळेच पूर्वी असलेली आपुलकी, आताही तशीच आहे.
कोणी सैनिक महिनाभरासाठी सुट्टीवर आला असेल तर त्याची विचारपूस करणे, तू काही काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत तुझ्या कुटुंबासोबत. कधीही काहीही मदत लागली तरी निःसंकोचपणे सांग वगैरे, कधीकधी असे शब्द प्रत्यक्ष कृतीपेक्षा मोलाचे ठरू शकतात.
– सायली साठे-वर्तक