सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या की राजकारणातील बेरीज-वजाबाक्यांची समीकरणे वेग धरू लागतात. नव्या आघाड्या-युत्या आकाराला येतात. यामध्ये बहुतेकदा सौदेबाजी होते; तर काही वेळा अस्तित्वाचा प्रश्न म्हणूनही छोटे पक्ष आपल्याहून मोठ्या पक्षांशी आघाडी करतात. पण समाजवादी पक्षासारख्या राजकीय पक्षाने गेल्या तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये तीन वेगवेगळ्या भूमिका घेत धक्कातंत्राच्या अवलंबाची हॅट्ट्रिक केली. आता 2024 मध्ये अखिलेश यादव नवा प्रयोग करण्याची शक्यता आहे. त्यांचा हा चौथा प्रयोग कसा असेल आणि तो यशस्वी होईल का, हे पाहणे रंजक ठरणारे आहे.
समाजवादी पक्षाची धुरा सांभाळल्यानंतर या पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रत्येक निवडणुकीत वेगळा प्रयोग केला. परंतु त्यांना अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही. उत्तर प्रदेशात पराभवाची “हॅट्ट्रिक’ करणारे अखिलेश यादव यांचा चौथा पेपर आता 2024 मध्ये होणार आहे. आतापासूनच त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. कोलकाता येथे लवकरच समाजवादी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होत असून त्यात पक्षाचा निवडणूक आराखडा तयार करण्याबरोबरच विचारमंथन होण्याची शक्यता आहे.
समाजवादी पक्षावर ताबा मिळवल्यानंतर अखिलेश यादव यांनी पहिल्यांदा 2017 मध्ये आपल्यातील नेतृत्वगुणांची परीक्षा दिली. तेव्हा ते मुख्यमंत्री होते. अखिलेश यादव यांनी निवडणूक प्रचार सुरू करत असताना अचानक कॉंग्रेसशी आघाडी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अखिलेश यादव आणि राहुल गांधी या दोन तरुण नेतृत्वाने निवडणूक काळात भरपूर प्रचार केला. परंतु जनतेने या तरुण नेत्यांना नाकारले. ही नाराजी एवढी होती की, समाजवादी पक्षाला 50 पेक्षा कमी आणि कॉंग्रेसला केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले. अखिलेश यादव यांचा प्रयोग विचित्र होता. कारण समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि वडील मुलायमसिंह यांनी कॉंग्रेसपासून नेहमीच दोन हात दूर राहणे पसंत केले. अर्थात अखिलेश यादव यांनी वडिलांचा विचार पाळला नाही आणि पराभवाचे तोंड पाहावे लागले.
2019 मध्ये दुसरा प्रयोग केला. लोकसभा निवडणूक काळात त्यांनी बसपशी आघाडी केली. यासाठी त्यांनी बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांना कसे तयार केले असेल, हे कळत नाही.
म्हणूनच लखनौच्या गेस्ट हाउस प्रकरणानंतर कट्टर विरोधक बनलेल्या बसपसमवेत आघाडी करत अखिलेश यांनी पुन्हा आश्चर्याचा धक्का दिला. सत्ताधारी भाजपसाठी ही आघाडी धोक्याची घंटा ठरू शकते, असे राजकीय तज्ज्ञांनी मत मांडले. दोघांची एकत्रित आकडेवारी ही भाजपपेक्षा अधिक होती. परंतु वास्तविक रुपात हे आकडे खरे ठरतातच असे नाही. कधी कधी जातीय समीकरणेदेखील पहावयास मिळतात. सप-बसपला हाच अनुभव आला. या आघाडीला जागा मिळवता आल्या नाहीत. बसपला 11 व सपला केवळ पाच जागा मिळाल्या. मोदी सरकारला सत्तास्थानी ठेवण्यासाठी उत्तर प्रदेशने महत्त्वाची भूमिका बजावली. तिसरा प्रयोग अखिलेश यादव यांनी 2022 च्या विधानसभा निवडणुकीत केला. अखिलेश यादव यांनी पश्चिमेत राष्ट्रीय लोकदल यांच्याशी आघाडी केली. पण हा डावदेखील फसला.
तीन निवडणुका, तीन प्रयोग आणि तीन पराजय. या निवडणुकीत स्वामी प्रसाद मौर्य हे अखिलेश यादव यांच्या गळाला लागले खरे, पण निकालात त्याचे प्रतिबिंब दिसले नाही. आता चौथी निवडणूक 2024 मध्ये होत आहे. त्यात अखिलेश यादव यांची रणनीती काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ते पुन्हा नवीन प्रयोग करतील की यापूर्वी केलेल्या प्रयोगात सुधारणा करून तेच डावपेच आखतील हे पाहावे लागेल. अर्थात कोणत्याही संमेलनात किंवा परिषदेत एखाद्या निवडणुकीची रणनीती ठरविता येत नाही. परंतु भावी वाटचालीबाबत अंदाज आणि आकलन करता येते. विधानसभेला मौर्य यांच्या नेतृत्वाखाली अतिमागास जातीतील मंत्र्यांना आणि आमदारांना योगी सरकार आणि भाजपपासून तोडून अखिलेश यादव यांनी महत्त्वाकांक्षी योजना आखली. पण जसजसे विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत गेले तेव्हा ही याजना कमकुवत ठरत गेली. स्वामी प्रसाद मौर्य हे स्वत: पराभूत झाले आणि योजना देखील बासनात गुंडाळली गेली.
अखिलेश यादव हे गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसप्रती कठोर भूमिका घेत आहेत. कदाचित ठरावीक भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेऊ शकतात. लोकसभा निवडणुकीत नेहमीप्रमाणे समाजवादी पक्षाकडून पारंपरिक मतदारसंघ रायबरेली आणि अमेठी येथे उमेदवार उभा न करता कॉंग्रेसला पाठिंबा दिला जातो. परंतु यंदा ते उमेदवार उभे करण्याची रणनीती आखू शकतात. अशा प्रकारचे पाऊल टाकतील का, असे आताच म्हणणे घाईचे ठरू शकते. परंतु सध्या समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेस यांच्यातील ताणाताणीत वाढ करून अखिलेश हे बिगर भाजप आणि बिगर कॉंग्रेस पक्षाला आपल्याकडे ओढण्यास यशस्वी ठरू शकतात. प्रत्यक्षात गेल्या काही दिवसांत तिसऱ्या आघाडीची मोर्चेबांधणी करणारे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी अखिलेश यांची जवळीक वाढत आहे. ममता बॅनर्जी यांची जवळीक सर्वश्रूत आहे. विधानसभेच्या वेळी त्या प्रचारालादेखील आल्या होत्या. त्यामुळे सपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक कोलकाता येथे होणे आश्चर्य वाटण्यासारखे नाही. कोलकाता येथे दोघे ऐक्य दाखवत तिसऱ्या आघाडीबाबत प्रामाणिक राहताना दिसले तर आश्चर्य वाटू नये.
– अमित शुक्ल