कोपरगाव – शहरातील धारणगाव रोडवरील छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगरपर्यंत भूमिगत गटारीचे काम नगरपालिका प्रशासनाने हाती घेतले असून, भाजपच्या माजी नगरसेविका वैशाली आढाव यांनी केलेल्या मागणीवरून या भूमिगत गटाराचा आकार वाढविण्यात आला आहे. त्यानुसार कामही सुरू झाले आहे.
मागील वर्षी पावसाळ्यात या भागातील बॅंक कॉलनी, मंजुळा अपार्टमेंट, जैन मंदिर आदी ठिकाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी जाऊन घरातील मालमत्तेसह दुकानातील सामानाचे प्रचंड नुकसान झाले होते. यापूर्वीही अशा प्रकारे नुकसान झाले होते. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये.
यासाठी नगरपरिषदेतर्फे या भागात 36 इंची 3 फुटी भूमिगत गटारीचे काम प्रस्तावित करण्यात आले होते.
मात्र, अतिवृष्टी झाल्यास एवढ्या कमी आकाराच्या गटारीतून अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होऊन पुन्हा मागील वर्षाप्रमाणेच परिस्थिती उद्भवू नये, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी नगर परिषद प्रशासनाने छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगरपर्यंत 36 इंचाऐवजी आवश्यक त्या ठिकाणी 48 इंच 4 फूट या साईजची भूमिगत गटार करून या परिसरातील रहिवासी नागरिक व दुकानदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी नगरसेविका आढाव यांनी केली होती.
याबाबत संगीता काला, सुभाष पाटणकर, सुवर्णा कहार, विजय दवंगे, चंद्रकांत शिंदे, सायरा तांबोळी, माधुरी अत्तरकर, विजया बोधे, श्रीकांत भास्कर, मनीषा शहाणे, उषा शिंदे, सुरेखा शेंडगे, मंगला पतंग, मंजूषा काले, संजय सोनवणे, रूचिरा लाहोटी, अंजली सोनवणे, अर्चना राका, वैशाली बडजाते, सोनल कोठारी, श्वेता कोठारी आदींनी प्रशासनाला निवेदन दिले होते. हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व माजी नगरसेविका वैशाली आढाव यांचे आभार मानले आहेत.