हमासचा इस्रायलवरील हल्ला हा मोसाद या इस्रायलच्या जगद्विख्यात गुप्तचर संस्थेचे अपयश म्हणावे लागेल. कारण त्यांना याची भणकही लागली नाही. या हल्ल्यामुळे जागतिक शांततेच्या प्रक्रियेला नवा तडा गेला आहे. तसेच आखातातील ही अशांतता ऊर्जासुरक्षा व अन्नुसरक्षेचे प्रश्न गंभीर बनवणार आहे.
जागतिक पटलावर गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये पुन्हा एकदा युद्धखोरी वाढताना दिसू लागली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर भडकलेला युद्धाचा वणवा पावणेदोन वर्षे उलटूनही शांत झालेला नाहीये. अलीकडेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी केलेल्या अण्वस्रसज्ज क्रूझ मिसाइलच्या यशस्वी चाचणीमुळे या युद्धातून जगात अणुयुद्धाचा भडका उडतो की काय अशी चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्यात प्रत्यक्ष युद्ध सुरू असून तेही शमलेले नाहीये.
इकडे आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये उत्तर कोरियाचा उद्दाम हुकूमशहा किम जोंग उन याच्यामुळे दक्षिण कोरिया आणि जपान या देशांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक महासत्ता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या चीनने भारतासह जपान, तैवानबरोबरचा सीमावाद पुन्हा उकरून काढला आहे. विशेषतः तैवानच्या एकीकरणाबाबत चीन येत्या काळात मोठे पाऊल टाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिकेतील थिंक टॅंकच्या मते, चीनने भारतावरही आक्रमण करण्याची तयारी सुरू केली आहे. या सर्वांमुळे जागतिक पटलावर अशांतता, असुरक्षितता आणि भीतीचे ढग पुन्हा घोंगावू लागले आहेत. शांतताप्रेमी देश विविध बहुराष्ट्रीय संघटनांच्या व्यासपीठांवरून या युद्धजन्य वातावरणातील तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करत असताना इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्षाचा भडका उडाला आहे.
नुकताच हमासने अवघ्या 20 मिनिटांत इस्रायलवर 5 हजार रॉकेटचा मारा करून या युद्धाला फोडणी दिली आहे. पॅलेस्टाइनच्या हमास या दहशतवादी संघटनेने केवळ इस्रायलवर हल्लाच केला नाही; तर इस्रायलच्या सैनिकांच्या छावण्यांवर हल्ला करून इस्रायली सैनिकांना ओलीस ठेवले आहे. तसेच इस्रायलच्या नागरिकांचंही अपहरण केले. या भीषण हल्ल्यामध्ये इस्रायलचे अनेक नागरिक ठार झाले असून जखमींची संख्याही हजारो आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलने उघडपणाने युद्धाची घोषणा केली आहे. नेतान्याहू यांनी दूरचित्रवाहिनीवरील आपल्या संबोधनात देशवासीयांना देश युद्धात उतरल्याचे सांगितले.
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी या हल्ल्याला जशास तसे उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे इस्रायलच्या सैनिकांनी हमासच्या ठिकाण्यांवर हल्ला करून अतिरेक्यांना मारणं सुरू केलं आहे. हमासच्या अतिरेक्यांचे तळही उद्ध्वस्त केले जात आहेत. इस्रायलने गाजापट्टीत एअरस्ट्राइकही सुरू केला आहे. इस्राइलच्या या प्रत्युत्तरालाही पॅलेस्टाइन समर्थपणाने तोंड देणार असून लवकरच एक भयंकर हल्ला करण्याची योजना हमासकडून आखली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी हमासकडून झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना इस्रायलला
सर्वोतोपरी मदतीची घोषणा केली आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्षाला प्रदीर्घ इतिहास आहे. आजवर या दोघांमध्ये अनेकदा हल्ले-प्रतिहल्ले झालेले आहेत आणि त्यामुळे आखातातील शांतता धोक्यात आली आहे. ऑगस्ट 2014 मध्ये झालेल्या या दोन देशांमधील भीषण संघर्षामध्ये जवळपास दीड हजारांहून अधिक लोक मारले गेले. अशाच स्वरूपाचा संघर्ष 2008 आणि 2012 मध्येही झाला होता. या संघर्षामागचे मूळ कारण म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाइन ही दोन्हीही राष्ट्रे परस्परांचे अस्तित्व मान्य करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये छोट्या-मोठ्या चकमकी या सातत्याने सुरू असतात आणि त्यातून एकमेकांचे बदले घेतले जातात. या दोन राष्ट्रांच्या संघर्षाचा इतिहास जवळपास 100 वर्षांचा आहे. यावेळी हमासने इस्रायलमध्ये घुसून केलेला हल्ला हा भयावह होता. त्याला आक्रमणच म्हणावे लागेल. त्यामुळेच इस्रायलने याला युद्ध असे म्हणत आपल्या शत्रूला याची अशी किंमत मोजावी लागेल ज्याची कल्पनाही त्यांनी कधी केली नसेल, असा सज्जड इशारा दिला आहे. पॅलेस्टाइनकडून आजवर झालेल्या हल्ल्यांचा इतिहास पाहिल्यास असा व्यापक आणि युद्धसदृश हल्ला पहिल्यांदाच झाला आहे. याचे कारण यावेळी हमास या दहशतवादी संघटनेचे अतिरेकी समुद्रमार्गाने आणि जमीन मार्गाने पॅराग्लायडिंग करत इस्राइलच्या सीमेमध्ये घुसण्यात यशस्वी झाले. हजारो रॉकेटचा मारा करतानाच या अतिरेक्यांनी इस्रायली नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. इतकेच नव्हे तर इस्रायली सैनिकांच्या महिला आणि मुलांना बंदिस्त बनवून त्यांची हत्या केली.
वास्तविक पाहता, इस्रायल हा देश युद्धनीतीमध्ये निपुण मानला जातो. त्याचबरोबर इस्रायलची गुप्तचर यंत्रणाही जगात तरबेज मानली जाते. विशेषतः हल्ल्यांसाठी, गुप्तवार्तांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये इस्रायल हा जगात नावाजलेला देश आहे. सर्जिकल स्ट्राइक प्रकारच्या हल्ल्यामध्ये इस्रायलचे सैन्य अत्यंत वाक्बगार म्हणून ओळखले जात असे. मोसाद (इन्स्टिट्यूट फॉर इंटेलिजन्स अँड स्पेशल ऑपरेशन्स) या इस्रायलच्या राष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे एजंट जगभर पसरलेले आहेत.
शस्त्राशिवाय यशस्वीपणे लढण्यासाठी ते ओळखले जातात. एक काळ असा होता की, मोसाद म्हणजे मृत्यू! मोसादचे गुप्तहेर आपल्या शत्रूला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून शोधून काढत असत. त्यामुळे जगातील सर्वाधिक धोकादायक किंवा खतरनाक गुप्तचर संस्था म्हणून मोसादकडे पाहिले जात असे. इस्रायलमधील तेल अविव या शहरात मोसादचे मुख्यालय आहे. 74 वर्षांचा इतिहास असणाऱ्या या संस्थेची स्थापना 1949 मध्ये इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड बेन गुरेना यांच्या काळात झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यूंच्या नरसंहाराला जबाबदार असणाऱ्या जर्मन अधिकाऱ्यांनाही मोसादची सर्वाधिक भीती वाटत होती. असे असताना हमासकडून केल्या गेलेल्या या हल्ल्याची भणकही त्यांना लागली नाही, याबद्दल जगभरातून आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे हा हल्ला इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश असून त्यांच्यातील उणिवा स्पष्ट करणारा आहे.
गेल्या काही महिन्यांत मध्य पूर्वतील स्थिती शांततेकडे परतत होती. पण हमासच्या हल्ल्याने आखातात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर सर्व अरब देशांनी एकमताने इस्रायलचा निषेध केला आहे. सौदी अरेबिया, जॉर्डन, कतार, ओमान, यूएईसह जवळपास सर्व आखाती देश यामध्ये एकत्र दिसले. इराणसह अन्य काही इस्लामिक देशांनी जल्लोष साजरा करत पॅलेस्टाइनचे अभिनंदन केले आहे. हमासच्या हल्ल्यामुळे अलीकडेच जुळून आलेले इस्रायल आणि सौदी अरेबियाचे मैत्रीचे धागेही उसवण्याची शक्यता आहे. मुळात इराणला सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यात निर्माण झालेली जवळीक पसंत नव्हती. त्यामुळेच इराणने हमासला इस्रायलवर हल्ला करण्याबाबत प्रोत्साहनवजा चिथावणी दिल्याचा जाणकारांचा कयास आहे. कारण अलीकडच्या काळात अरब देश आणि इस्रायलमधील संबंध सामान्य होत चालल्यामुळे भविष्यात पॅलेस्टाइनसाठी आवाज उठवायला कोणीच उरणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. तसे झाल्यास इराणही आखातात एकटा पडला असता. त्यामुळेच या हल्ल्यामागे कुठे ना कुठे इराणची फूस असल्याचे मानले जात आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने हमासने केलेल्या या हल्ल्याची निंदा केली आहे. भारतानेही अशा कठीण आणि बिकट प्रसंगी भारत इस्रायलच्या पाठीशी उभा आहे, असे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वास्तविक, स्वतंत्र पॅलेस्टाइन निर्मितीला भारताचे समर्थन राहिलेले आहे. किंबहुना, 1990 पर्यंत भारताचे धोरण हे पूर्णतः इस्रायलविरोधी होते. भारताचा तेथे दूतावासही नव्हता. 1994 मध्ये भारताने पहिल्यांदा इस्रायलमध्ये दूतावास सुरू केला. तेव्हापासून भारत-इस्रायल यांच्यातील संबंधांची नवी सुरुवात झाली आणि कालोघात ते घनिष्ट होत गेले. इस्रायल हा सातत्याने भारताच्या पाठिशी उभा राहात आला आहे.
कारगिल युद्धाच्या वेळी असेल किंवा काश्मीरच्या प्रश्नावर असेल इस्रायलने नेहमीच मैत्रीचे नाते जोपासले आहे. त्यामुळे भारताने हमासच्या हल्ल्यांचा निषेध करत इस्रायलचेही समर्थन केले आहे. या दोन्ही देशातील संघर्ष निवळावा, हीच भारताची भूमिका आहे. याचे कारण या संघर्षाचे चटके संपूर्ण जगाला बसणार आहेत. आज संपूर्ण जग ज्या ऊर्जासुरक्षा आणि अन्नसुरक्षा या संकटांचा सामना करत आहे, हे दोन्हीही प्रश्न या युद्धसंघर्षामुळे बिकट बनणार आहेत. सौदी अरेबिया आणि रशियाने तेलपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जागतिक बाजारात कडाडलेले क्रूड ऑइलचे भाव गेल्या आठवड्यात एकाएकी घसरून 85 डॉलर्सपर्यंत खाली आले होते; पण आता इस्रायल-पॅलेस्टाइन युद्धामुळे क्रूड ऑइल महागणार आहे आणि याची झळ आपल्या गरजेच्या 80 टक्के तेलाची आयात करणाऱ्या राष्ट्रांना बसणार आहे.
ऑपरेशन अजय
इस्रयायलमधील नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन अजय’अंतर्गत भारतीय विद्यार्थ्यांना मायभूमीत सुखरूप परत आणले जात आहे. इस्रायलमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना परत आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. इस्रायलमधील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित केलेल्या हालचाली करीत आहेत. “आम्ही पहिल्यांदाच इस्रायलमधील परिस्थिती प्रत्यक्ष अनुभवली’, असे परत आलेल्या एका विद्यार्थ्याने मत व्यक्त केले. मध्यपूर्वेत लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी, अशी अपेक्षाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. इस्रायलमधील भारतीय दूतावासाकडून भारतीय विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवला जातो आहे. “ऑपरेशन अजय’ अंतर्गत भारतीयांना परत आणण्याचे नियोजन केले जात आहे. इस्रायलमधील भारतीयांना भारतीय दूतावासाकडे आवश्यक नोंदणी करण्याची सूचना देण्यात आली आहे.
ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम
2017 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेत अमेरिकेचा इस्रायलमधील दूतावास तेल अविवमधून जेरुसेलमला स्थलांतरित करण्याचे ठरवले. हा निर्णय अत्यंत स्फोटक स्वरूपाचा होता आणि या निर्णयामुळे 2017 नंतर इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाला पुन्हा सुरुवात झाली होती. ट्रम्प यांनी निवडणुकांचे राजकारण डोळ्यापुढे ठेवून ज्यू लॉबीला खूश करण्यासाठी हा निर्णय घेतला होता. तथापि, या निर्णयाला संपूर्ण जगभरातून कडाडून विरोध झाला. संयुक्त राष्ट्रसंघात भारतासह 128 देशांनी या निर्णयाचा निषेध करणाऱ्या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
– अभय कुलकर्णी