भारतात फाइव्ह जी सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच प्रारंभ झाला. सुरुवातीच्या टप्प्यात देशातील निवडक शहरात फाइव्ह जी सेवा मिळणार असून ती टप्प्याटप्प्यात सर्व देशात उपलब्ध होईल. सध्याच्या काळात इंटरनेटने मानवी आयुष्य व्यापलेले असताना फाइव्ह जीच्या आगमनाने दैनंदिन व्यवहाराला वेग मिळणार आहे. भारतात 80 कोटींहून अधिक लोक इंटरनेट सेवा वापरत आहेत. देशाच्या 1.7 लाख ग्रामपंचायतींना गेल्या 8 वर्षांच्या काळात ऑप्टिकल फायबरच्या साहाय्याने जोडण्यात आले आहे. फाइव्ह-जी सेवेमुळे अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांना नवा आधार मिळणार आहे.
उद्योगिकीकरणानंतरच्या अडीचशे वर्षांपेक्षा अधिक काळात जग एवढे बदलले नसेल, एवढे इंटरनेटच्या आगमनानंतर अडीच दशकांत बदलले आहे. या काळात जगभरात केलेले संशोधन, शोध हे क्रांतिकारी आहेतच, त्याचबरोबर मानवी जीवनावर दूरगामी परिणाम करणारे आहेत. अर्थात, याचे अनेक दाखले देता येईल. पूर्वी बॅंकेत पैसे जमा करण्यासाठी लागणारा वेळ आणि आता मोबाइल बॅंक ऍप्सच्या मदतीने पेसे ट्रान्सफर करण्यासाठी लागणारा वेळ यात जमीन-अस्मानचा फरक आहे. अशी कितीतरी उदाहरणे देता येईल. करोना काळात तर इंटरनेटने मोलाची कामगिरी बजावली आहे. संपूर्ण जग लॉकडाऊनच्या कुलुपात अडकलेले असताना इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात संवादाची प्रक्रियाच नव्हे तर व्यवहारही सुरळीत सुरू होते. त्यामुळे इंटरनेट हे आज विकासाचे नवीन साधन म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे या प्रगतीमुळे थक्क होत असतानाच याचे आणखी अत्याधुनिक आविष्कार समोर येणे बाकी आहेत. फाइव्ह-जी तंत्रज्ञान हे या नव्या दालनाचे प्रवेशद्वार म्हणावे लागेल. देशात लवकरच इंटरनेट सेवेच्या या पाचव्या जनरेशनची सुरुवात होत आहे.
गरज ही शोधाची जननी मानली जाते. अर्थात, ही बाब केवळ विज्ञानाला लागू होते असे नाही. अलीकडच्या काळात तंत्रज्ञानावरचे वाढते अवलंबित्व पाहता कालपरत्वे सध्याचे तंत्रज्ञान हे कालांतराने कालबाह्य होत जाते. म्हणून त्यास “अपडेट’ करण्याची किंवा बदलण्यासाठी गरज भासू लागते. एक काळ असा होता की, मोबाइल फोन काय तर लॅंडलाइनसारखा साधा फोन मिळणेदेखील कठीण होते. लॅंडलाइनच्या कनेक्शनसाठी एक-एक वर्षे वाट पाहावी लागायची. काळ बदलला आणि लोकांच्या हातात मोबाइलसारखी जादूची छडी आली. या माध्यमातून केव्हाही, कोणाला, कोठेही, कोठूनही आणि कधीही फोन करता येणे शक्य झाले. यास भरीसर भर म्हणजे मोबाइल फोन स्मार्ट झाले तेव्हा मानवी जीवन अधिकच सुकर झाले. मोबाइलमध्ये इंटरनेटचा प्रवेश झाला आणि संवाद प्रक्रियेचा कायापालटच झाला. आता केवळ बोलणे पुरेसे नाही तर व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून देखील बोलणाऱ्यांचा चेहरा पाहता येणे शक्य झाले. इंटरनेटशी निगडीत सर्व काम फोननेच होऊ लागले. चालताना, प्रवास असताना मोबाइलवर गाणे ऐकले जाऊ लागले, चित्रपट पाहता येऊ लागले, चॅटिंगही करता आले.
इंटरनेटमुळे सर्व गोष्टी एका क्लिकवर आले असले तरी इंटरनेटचा वेग हा यात सर्वात मोठा अडथळा. आता फाइव्ह जी तंत्रज्ञान वेगाच्या समस्येवर उत्तर घेऊन आले आहे. फाइव्ह जी सेवा सुरू झाल्यानंतर एखादा चित्रपट केवळ 20 सेकंदातच डाउनलोड करणे शक्य आहे. फोर जी तंत्रज्ञानात यासाठी पाच मिनिटे लागायची. याचाच अर्थ ढोबळमानाने फाइव्ह-जीचा वेग हा फोर-जी पेक्षा दहापट अधिक आहे. ही गती फोर-जीवर 45 मेगाबाइट प्रति सेकंद (एमबीपीएस) असते आणि ती फाइव्ह जीमध्ये 1 हजार एमबीपीएसपर्यंत राहू शकते. साधारणपणे फाइव्ह-जी नेटवर्क हे 30 ते 300 गीगाहर्टस (मिली वेव्ह) स्पेक्ट्रममध्ये काम करण्याची क्षमता ठेवते. या नेटवर्कच्या माध्यमातून कोणताही डेटा अधिक प्रमाणात वेगाने पाठवता येणे शक्य राहते. या नेटवर्कवर परिसरातील सिग्नलचे अडथळे फार राहणार नाहीत. फोर-जी इंटरनेटचा कमाल वेग हा एक गीगा बिट्स प्रति सेकंद मानला जातो, तर फाइव्ह-जी मध्ये हायबॅंड स्पेक्ट्रम इंटरनेटचा किमान वेग 20 जीपीबीएस (गीगा बाइट्स प्रति सेकंद) असतो. डेटा ट्रान्सफरचा वेग वाढविण्यासाठी या क्रांतीने अनेक लाभ होणार आहेत.
फाइव्ह-जी इंटरनेट (बेसिक डेटा ट्रान्सफर) चा वेग सुमारे 20 गीगा बाइट्स प्रति सेकंदपर्यंत राहणार आहे. अर्थात, यात ग्राहकांना जवळपास 10 एमबीपीएस (मेगाबाइट्स प्रति सेकंद) चा वेग मिळू शकतो. तरीही हा वेग सध्याच्या फोरजी एलटीई नेटवर्कच्या 20 ते 40 पट अधिक आहे. “फाइव्ह जी’ मुळे अनेक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल उपकरणांना एकमेकांशी जोडणे (कनेक्ट करणे) सोपे जाणार आहे. या वेगामुळे दूरवर असलेल्या सर्व उपकरणांवर नियंत्रण मिळवता येणार आहे. ज्या चालकविरहित मोटारीवरून भविष्यातील चित्र रंगविले जात आहे ते फाइव्ह-जीच्या तंत्रज्ञानावरच अवलंबून असणार आहे. फाइव्ह-जीमुळे व्हर्च्युअल रिऍलिटी आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्स तंत्रज्ञानाची चांगल्या रितीने हाताळणी करणे शक्य होणार आहे. कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण म्हणजेच “ट्रु एचडी लाइव्ह स्ट्रिमिंग’ हे फाइव्ह-जी मुळे शक्य आहे. यामुळे संवादाची प्रक्रिया वेगाने होईल. फोर-जी नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या कोटींच्या घरात असल्याने या नेटवर्कवर सातत्याने दबाव राहतो. परिणामी कंजेशनची समस्या राहते. फाइव्ह जी नेटवर्कमध्ये ही समस्या राहणार नाही.
फाइव्ह-जी तंत्रज्ञान ही एकप्रकारची वायरलेस कनेक्टिव्हीटी असून त्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजेच रेडिओ वेव्हज (रेडिओ लहरी) चा वापर केला जातो. साहजिकच फाइव्ह जी तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी रेडिओ स्पेक्ट्रमबाबत जाणून घ्यावे लागेल. शास्त्रीय भाषेत एका निश्चित काळानंतर रेडिओ लहरी पुन्हा पुन्हा येत असतील तर त्यास वेब फ्रिक्वेन्सी असे म्हणतो. ही फ्रिक्वेन्सी हर्टझ्मध्ये मोजली जाते. कोणत्याही रेडिओ लहरी पुन्हा पुन्हा येण्यासाठी जो वेळ लागतो, त्याला वेव्हलेंथ असे म्हणतात. याचाच अर्थ असा की जेव्हा लहरींचे प्रमाण (फ्रिक्वेन्सी) वाढते, तेव्हा वेव्हलेंथ कमी होऊ लागते. यामुळे रेडिओलहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने जातात खऱ्या; पण त्या लांबचा पल्ला गाठू शकत नाहीत. वास्तविक या लहरींची वेव्हलेंथ कमी असल्याने त्या विविध अडथळ्यांना भेदू शकत नाहीत. याउलट फ्रिक्वेन्सी कमी अणि वेव्हलेंथ अधिक असेल तर लहरींची गती कमी असली तरी त्या अधिकचा पल्ला गाठू शकतात. या संकल्पनेतील नेटवर्क आपण हाताळले आहे. वन जी, टू जी, थ्री जी, फोर जीच्या तुलनेत लोअर फ्रिक्वेन्सी बॅंडवर देखील इंटरनेट उपलब्ध होते. यात स्पीड कमी असला तरी व्यापकता अधिक राहते. या कारणामुळे दुर्गम भागात देखील कमी वेगाचे टू जी किंवा थ्री जी इंटरनेटचे नेटवर्क सहजपणे मिळते. पण फोर-जी सेवा ही हायर फ्रिक्वेन्सी बॅंड इंटरनेटवर उपलब्ध होते. परिणामी कनेक्टिव्हीटी चांगली मिळते; परंतु दुर्गम भागात किंवा बंद खोलीत अनेकदा फोर-जीचे नेटवर्क मिळत नाही. या कारणामुळे जेव्हा एखाद्या बंद खोलीत किंवा तळघरात आपण असलो तर फोर-जी तंत्रज्ञानाच्या मोबाइलवर संवाद साधणेदेखील कठीण होऊ शकते. बोगद्यातून जाताना देखील नेटवर्क गायब होते. पण फाइव्ह-जी तंत्रज्ञानात या सर्व समस्येवर उपाय आहे. अर्थात ही सेवा दुर्गम भागापर्यंत देखील सहजपणे लवकर पोचावी आणि त्याचा दरदेखील सामान्यांच्या आवाक्यात असावा, एवढीच अपेक्षा आहे.
– महेश कोळी