भारतीय संघ कोणत्याही परदेशी दौऱ्यावर जाणार असला तरीही प्रत्येकवेळी त्याला आव्हानात्मक असेच स्वरूप येते. आता भारतीय संघ वेस्ट इंडीजमध्ये दाखल झाला आहे. संघाचा सरावही कसून सुरू आहे मात्र, तरीही यंदाचा हा कॅरेबियन दौरा भारतीय संघासाठी आव्हानात्मकच असेल.
भारतीय संघ निवडीवरून सुरू असलेले कवित्व अद्याप संपलेले नाही. त्यातच संघातील वरिष्ठ खेळाडूंनी गेल्या वर्षभरात फार काही दिवे लावलेले नाहीत. त्यामुळे या संघात नव्या व जुन्यांचा समतोल साधला गेल्याचे जरी सागितले जात असले तरीही भारतीय संघाला कॅलिप्सो संगीत ऐकू येणार का टीकेचा सुर ते लवकरच कळेल. भारतीय संघ पूर्वीसारखा पडेल भूमिका करणारा निश्चितच राहिलेला नाही. पण परदेशात कसोटी सामना खेळणे व भारतात कसोटी सामना खेळणे याचं खरेखुरे रामायण ते आदीपुरुषमध्ये दाखवलेले रामायण इतका फरक आहे.
वातावरणाचे आव्हान
वेस्ट इंडीज हा देश लहान बेटांनी तयार झालेला आहे. त्यामुळे इंग्लंडप्रमाणे येथील हवामानही लहरी आहे. क्षणात पाऊस तर क्षणात ऊन असा खेळ इथे सातत्याने पाहिला जातो. आजवर भारतीय संघाने 1970 सालचे दशक वगळले तर वेस्ट इंडीजमध्ये भरीव कामगिरी केलेली नाही. आधी वेस्ट इंडीजचा दौरा केलेला एकही खेळाडू सध्याच्या संघात नाही. टिपिकल वेस्ट इंडियन वातावरण चेंडूला स्विंग व बाउन्स देणारे असते.
खेळपट्टीही रामभरोसे असते असेच म्हणावे लागेल. सध्या त्यांच्या संघात तो पूर्वीचा गोलंदाजीचा तोफखाना नसल्याने थोडा दिसाला मिळेल; परंतु त्यांचे नवोदित गोलंदाज भारतीय फलंदजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळू शकतात. त्यांच्याकडे जेसन होल्डर, शाइ होप, निकोलस पूरन, रॉमन पॉवेस, केल मायर्स व शेमरन हेटमायर असा भक्कम फलंदाजीचा ताफा आहे. गोलंदाजीत केमो पॉस, अल्झारी जोसेफ, अकिल हुसेन व रॉस्टन चेस असे नावाजलेले गोलंदाज त्यांच्या संघात आहेत. येथील वातावरणाचा त्यांना चांगलाच अभ्यास आहे व खेळपट्टीचा पुरेपूर वापर करत चेंडू कसा टाकायचा याचे ज्ञानही आहे. रिव्हर्स स्विंगच्या बाबतीत रॉस्टन चेस आपल्याला भारी पडू शकतो. या गोलंदाजीला पुरक असे हवामान व वातावरणही असते त्यामुळे प्रत्येक सामन्यात भारतीय फलंदाजांना डोळ्यात तेल घालूनच खेळावे लागेल.
कागदावर भारताचे पारडे जड
भाकत व वेस्ट इंडीज यांची तुलना केली तर कागदावर तरी भारतीय संघ बलाढ्य वगैरे वाटत आहे. मात्र, डॉमिनिका, बार्बाडोस, त्रिनिदाद व गयाना येथे सामने खेळायचे असल्याने यापूर्वी तेथे आपली काय अवस्था झाली होती, हा इतिहास एकदा आपल्या संघाने पाहिला पाहिजे म्हणजे काय करायचे यापेक्षा काय करायचे नाही, ते लक्षात येईल.
शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, यशस्वी जयस्वाल, ऋतूराज गायकवाड असे नावाजलेले फलंदाज आपल्या संघात आहेत. मात्र, ऋतूराज व जयस्वालकडून मोठ्या अपेक्षा करणे चूक ठरेल. कारण त्यांचा हा पहिलाच वेस्ट इंडीज दौरा असून यापूर्वीही त्यांना भारतात कसोटी सामना खेळण्याचा अनुभव नाही. पदार्पण ते देखिल थेट कॅरेबियन संघाविरुद्ध म्हणजे त्यांच्या जिद्दीची, गुणवत्तेची, संयमाची व शॉट सिलेक्शनची परीक्षाच असेल. मुळातच गेल्या दोन मोसमांपासून संघातील ज्यांना वरिष्ठ म्हटले जाते त्या कोहली, रोहित वगैरेंचं शॉट सिलेक्शन पाहता तिथे काय होईल याचा दौऱ्यापूर्वीच अंदाज येऊ शकतो.
भारताची गोलंदाजी काहीशी कमकुवत वाटते. संघात नवदीप सैनी व मुकेश कुमार हे नवोदित गोलंदाज आहेत. केवळ महंमद सिराज हाच त्यातल्या त्यात अनुभवी म्हणता येईल. त्याच्यावरच आपल्या वेगवान गोलंदाजीची भिस्त राहणार आहे. बाकी चटणी कोशिंबिर म्हणून रवीचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा आहेतच. भारतात कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळपट्टीवर भेगा पडायला लागतात व फिरकी गोलंदाजांची चांदी होते मात्र, हा प्रकार कॅरेबियन खेळपट्टीवर होत नाही. रीस्ट स्पीनरपेक्षा फिंगर स्पीनरच तिथे यशस्वी ठरतात म्हणूनच महान लेग स्पीन गोलंदाज शेन वॉर्नही वेस्ट इंडीजमध्ये तितका यशस्वी ठरला नाही तितके अनिल कुंबळे व श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन यशस्वी ठरले.
नवोदितांना सुवर्णसंधी
भारतीय संघात या मालिकेसाठी अनेक नवोदित खेळाडू निवडले गेले आहेत. त्यांची निवड कशाच्या निकषावर झाली या वादात आता पडण्याचे कारण नाही. त्यापेक्षा ते या दौऱ्यात कशी कामगिरी करतात व टीकाकारांना कसे उत्तर देतात हे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. जयस्वाल, गिल, गायकवाड, सैनी, श्रीकर भरत, ईशान किशन यांच्याकडे भारताचे भविष्य म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यातही कसोटीसह एकदिवसीय व टी-20 मालिका आपला संघ खेळणार आहे. यंदाच्या मोसमात भारतात एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. या दौऱ्यातून त्या स्पर्धेसाठी आपल्याला भक्कम सेकंड बेंच मिळावा हीच अपेक्षा आहे. सूर्यकुमार यादव याला तर ही मालिका सर्वात जास्त महत्त्वाची आहे. कारण त्याच्या खेळात नैसर्गिक आक्रमकता आहे; परंतु शिस्त व सातत्य नाही. आता या मालिकेत त्याला हेच शिकायचे आहे.
सातत्य असेल तरच त्या फलंदाजाला गांभीर्याने घेतले जाते. त्याला “मिस्टर 360′ म्हणून नावाजले जात असले तरीही ते आशियाई खेळपट्टीवर. त्याला आता स्वतःला परदेशातही आपण असेच खेळू शकतो हे दाखवून देण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. रोहित, कोहली यांच्यासह रहाणेकडूनही कसोटीत मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. त्यांच्याकडून जर ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली गेली तर यंदा भारतीय संघ कॅरेबियन बेटावर नवा इतिहास लिहू शकेल. यंदाच्या मोसमात भारतीय संघ कसोटी सामने जास्त खेळणार नसल्याने सध्यातरी आगामी काळात होत असलेल्या आशिया करंडक व विश्वकरंडक स्पर्धेसाठी वेस्ट इंडीज दौऱ्यातील एकदिवसीय तसेच टी-20 मालिकांवर जास्त लक्ष राहणार आहे.
गिल, किशन, सैनी, गायकवाड व जयस्वाल यांच्यासाठी हा दौरा खूप महत्त्वाचा व मोठे व्यासपीठ ठरणार आहे. ज्या तडफेने या खेळाडूंनी यंदाची आयपीएल स्पर्धा गाजवली त्याच गुणवत्तेने हा दौराही त्यांनी यशस्वी केला तर पुढील पाच वर्षे भारताला नव्या खेळाडूंचा शोध घेण्याची गरज पडणार नाही. गिलकडे कोहलीचा वारसदार म्हणून पाहिले जात आहे. येत्या पाच वर्षांत गिलला स्वतःला भारतीय संघातील स्थान कायम ठेवायचे असल तर त्याला केवळ आशिया खंडात धावा करून चालणार नाही तर परदेशी मैदानेही गाजवावी लागतील. त्याच्याकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे, आता या दौऱ्यात त्याला सातत्य व शिस्त आत्मसात करायचे आहे.
जे गिलच्या बाबतीत आहे तेच जयस्वाललाही करावे लागेल. एकूण काय तर हा दौरा भारतीय संघाच्या बांधणीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यातून आपल्या निवड समितीला कसोटी, एकदिवसीय तसेच टी-20 या क्रिकेटच्या तीनही प्रकारातील प्रमुख खेळाडू व त्यांचे सक्षम पर्याय मिळणार आहेत. या मालिकेसाठी जेव्हा संघ निवड केली गेली तेव्हापासूनच अनेकांनी त्यावर टीका केली आहे. आता हे सगळे मागे टाकून आपल्या संघाला तेथे सरस कामगिरी करायची आहे व विजयी होऊनच मायदेशी परतायचे आहे. यावेळी मात्र, कोहली, रोहित यांच्या बरोबरीने गिल, ऋतूराज व जयस्वाल यांच्याकडेही लक्ष राहणार आहे. हाच दौरा त्यांच्या कारकिर्दीची लांबी ठरवणारा ठरेल, यात शंका नाही.
पुजाराला वगळल्याचा फटका बसू शकतो
भारतीय संघातील सर्वात तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजारा याला या दौऱ्यातून वगळले गेले आहे. परदेशात पूर्वी जे काम राहुल द्रविड करायचा तेच पुजारा करतो. फरक इतकाच की यंदा पुजाराला आलेल्या अपयशामुळे त्याला संघातील जागा गमवावी लागली. मात्र, तरीही या दौऱ्यात त्याची उणीव निश्चितच भासणार आहे. मधल्या फळीत केवळ अजिंक्य रहाणे हा एकमेव तंत्रशुद्ध फलंदाज असल्याने पहिले चार फलंदाज कसे खेळतात यावरच भारताचे आव्हान अवलंबून राहणार आहे. थोडक्यात, पुजाराची भूमिका यावेळी रहाणेला वठवावी लागणार आहे. तो यशस्वी ठरला तर कॅरेबियन कोलॅप्सो संगीत आपल्यासाठीच वाजत आहे, असे वाटेल.
– अमित डोंगरे