पुणे : हिंदु कायद्यानुसार मामा-भाचीच्या लग्नाला कायद्याने मान्यता नाही. मात्र, आजही काही ठिकाणी अशी लग्ने होतात. या प्रकरणात तिने नातेवाईकांच्या आग्रहास्तव मामाशी लग्न केले. सुखाने संसार सुरू केला. दोघांना एक गोंडस मुलगीही झाली. मात्र, त्यानंतर वैचारिक मतभेदामुळे दोघात वाद निर्माण होऊ लागले. हे वाद टोकाला गेल्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली आहे. तोपर्यंत लग्नाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत.
माधव (वय 35) आणि माधवी (वय 28) (नावे बदललेली आहेत) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही पुण्याचे राहणारे. नात्याने मामा-भाच्ची असलेल्या त्यांचा विवाह 3 मे 2014 रोजी झाला. त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली ती आज सहा वर्षांची आहे. मागील दोन वर्षांमध्ये त्या दोघांच्या विचारामध्ये खूप तफावत निर्माण झाली. त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या यावरून त्यांमध्ये मतभेद निर्माण होऊन वाद होऊ लागले. आपण आता व भविष्यातही एकत्र येण्याची शक्यता नसल्याने 3 जानेवारी 2020 पासून ते एकमेकांपासून विभक्त राहू लागले.
त्यानंतर, त्यांनी अॅड. अजिंक्य गायकवाड यांमार्फत कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे तिने पोटगीची मागणी केली नसून, केवळ मुलीचा ताबा मागितला आहे. घटस्फोटासाठी केलेल्या अर्जात विविध अटी-शर्ती नमूद करण्यात आल्या आहेत.