कोल्हार, (वार्ताहर)- लोकसभा निवडणूक प्रक्रियेत आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असताना राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्दमध्ये अनेक ठिकाणी पथदिवे लावण्यात आले आहेत. त्यावर आमदार, खासदार यांच्या बॅनरकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसत असल्यामुळे आचारसंहितेचे नियम धाब्यावर बसवल्याचे चित्र दिसत आहे.
लोकसभा निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने या कालावधीत आचारसंहिता लागू केली असून या काळात कुठल्याही राजकीय मंडळींना राजकीय कार्यक्रम घेता येत नाही किंवा कुठेही कोणत्याही कार्यक्रमाला उपास्थित राहता येत नाही.
राजकीय बॅनरबाजी करणे देखील या काळात बंधनकारक असते. ही प्रमुख जबाबदारी शासकीय कर्मचारी किंवा पदाधिकारी यांची असते. त्यानुसार राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आणि महसूल विभागाचे तलाठी यांनी संयुक्त कारवाई करत गावातील ग्रामपंचायत, नगर-मनमाड राज्यमार्ग परिसर किंवा अन्य ठिकाणी असलेले सर्व राजकीय मंडळींचे बॅनर हटवले आहेत,
मात्र गावठाण हद्दीसह अनेक भागात आमदार, खासदार यांच्या निधीतून आलेल्या पथदिव्यांवर राजकीय बॅनर दिसून येत आहेत. यामुळे गावात काम करत असलेले अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करतात की जाणीवपूर्वक हे बॅनर ठेवण्यात आले आहेत,याची चौकशी होणे गरजेचे आहे, मात्र आचारसंहिता काळात या अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवल्याची चर्चा गावात रंगत आहे.