लखनौ – अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरासाठी विश्व हिंदु परिषदेने घरोघरी जाऊन निधी संकलन केले होते. या संकलनात आत्तापर्यंत अडीच हजार कोटी रूपयांचा निधी जमला असून आता घरोघरी जाऊन निधी संकलन करण्याची मोहीम बंद करण्यात आली आहे अशी माहिती विश्व हिंदु परिषदेच्यावतीने देण्यात आली आहे.
निधी संकलन कार्यात अनेक ठिकाणी दादागिरी आणि गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्यामुळे ही निधी संकलन मोहीम वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तथापि आता पुरेसे संकलन झाल्याने घरोघरी जाऊन निधी संकलन आता बंद करण्यात आले आहे अशी माहिती राम जन्म भूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.
ज्यांना यापुढेही या कामासाठी देणगी द्यायची असेल त्यांनी मंदिर ट्रस्टच्या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने देणगी द्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. मंदिराच्या समोरची जागा आम्हीं संपादित करण्याचा प्रयत्न करीत असून त्यासाठी आमची बोलणी सुरू आहेत असेही राय यांनी सांगितले. येत्या तीन वर्षांत मंदिराचे काम पुर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे असे त्यांनी म्हटले आहे.