अहमदाबाद – अक्सर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांची फिरकी आणि ऋषभ पंत (101) शतक तर वॉशिंग्टन सुंदरच्या (96) अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा एक डाव आणि 25 धावांनी पराभव केला. भारताने 3-1 अशा फरकाने मालिका जिंकत वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. ऋषभ पंत सामनावीर तर अश्विन मालिकावीर ठरला.
या कसोटी मालिकेतून पदार्पण करणाऱ्या अक्सर पटेलने तीन कसोटीत 27 विकेट्स घेण्याचा कारनामा केला. पहिल्या तीन कसोटी सामन्यात 4 वेळा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरीही केली आहे. त्यामुळे पहिल्या तीन कसोटीत सर्वाधिक वेळा 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल क्रमांकावर आला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर नरेंद्र हिरवाणी आणि शिवराकृष्णन हे आहेत.
त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील पहिल्या 3 सामन्यात प्रत्येकी 3 वेळा 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय अक्सर पटेल हा पहिला असा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे ज्याने त्याच्या पहिल्या तीनही कसोटी सामन्यात एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
याबरोबरच तो पदार्पणाच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आला आहे. तसेच त्याने दिलीप दोशी यांच्याशी बरोबरी केली आहे. दोशी यांनीदेखील त्यांच्या कसोटी पदार्पणाच्या मालिकेत 27 विकेट्स घेतल्या होत्या.