स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या हवेली तालुक्यातील तुळापूर येथील स्मृतिस्थळ, शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील स्मारका प्रमाणे तुळापूर येथे परिसराच्या विकासासाठी निधी मंजूर व्हावा यासाठी जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी केली होती.
दरम्यान या मागणीला यश मिळाले असून तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतिस्थळ आणि वढु बुद्रुक येथील स्मारकाच्या व परिसराच्या विकासासाठी तब्बल १५० कोटींचा निधी पर्यटन विभागामार्फत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच केली आहे.
तुळापूर व वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो लोक येतात. या अनुषंगाने तुळापूर व वढू बुद्रुक येथील स्थानिक ग्रामस्थांसह छत्रपती शंभुभक्तांच्या भावनांचा विचार करून प्रस्तावित स्मारकाच्या आराखड्यास परिसराच्या विकासास राज्य शासनातर्फे निधी मंजूर झाल्याने व महाराजांच्या समाधीचे पावित्र्य जपून स्मारकाचे तसेच परिसराच्या विकासाचे काम तातडीने होण्याची सर्वांची इच्छा पूर्ण झाल्याने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व सदर कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा करणारे माऊली आबा कटके यांचे नागरिकांनी आभार मानले आहेत.
विशेष म्हणजे स्मारकासह संपूर्ण परिसराचा विकास या माध्यमातून होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे असे असेल व या स्मारकाला इतिहासाशी साधर्म्य सांगणारा ‘हेरिटेज’ टच दिला जाईल आणि स्थानिक ग्रामस्थ, इतिहासतज्ञ आणि संबंधित सर्वांशी चर्चा करून स्मारकाचा आराखडा ठरवण्यात येणार आहे.
तसेच ‘मावळा’ वीर शिवले यांच्या समाधीस्थळाचा विकास करणे, समाधीस्थळांची दैनंदिन व्यवस्थापन पाहण्यासाठी कार्यालय व बहुउद्देशीय सभागृह निर्माण करणे, भक्तनिवास बांधणे, समाधीस्थळाच्या मागील बाजूस ऐतिहासिक चित्रे रंगविणे, निवडक झाडांखाली पारंपारिक पद्धतीचे पार बांधणे, गावातील अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण करणे, नाले आणि जलस्त्रोतांची सुधारणा करणे, पूल आणि बंधाऱ्यांचा विकास करणे, वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी परिघीय रस्ता (रिंगरोड) तयार करणे, नदीवर घाट बांधणे, समाधीस्थळाजवळ बारा बलुतेदार (गावगाडा) ग्रामीण संस्कृती प्रदर्शनातून मांडणे, भविष्याच्या दृष्टीने आवश्यक सेवा-सुविधा प्रदान करणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत.
यासोबतच विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून त्यांच्या संगोपणाला चालना देण्यासाठी वनस्पती रोपवाटिकेचा विकास करणे आणि या सर्व विकास कामांसाठी समाधीस्थळ व भौतिक सुविधा पुरविण्यासाठी एक विशेष कार्यक्रम-योजना देखील शासनामार्फत राबविण्यात येणार आहे.