देशाचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने याच महिन्यात दोहा डायमंड लीग स्पर्धेत विजेतेपद पटकावले. त्याने 88.67 मीटरचे अंतर पार केले व ही आपली पॅरिस ऑलिम्पिकची तयारी असल्याचे सांगितले; परंतु त्याला जर खरेच पॅरिसला सोनेरी यश मिळवायचे असेल तर त्याने केवळ माझे लक्ष्य 90 मीटरचे आहे हे केवळ बोलू नये, तर त्यादृष्टीने कसून प्रयत्न करावे.
बोलेल जो गरजेल काय, असे म्हणतात. त्यामुळे नीरजने ही म्हण खोटी ठरवण्यासाठी तरी आतापासूनच 90 मीटर अंतराचा टप्पा गाठण्यासाठी त्याच्या क्षमतेपेक्षाही जास्त प्रयत्न करावेत. त्याने जर हे केले तरच त्याची लक्ष्यपूर्ती होईलच; परंतु देशाला असा एक खेळाडू मिळेल की त्याचे या खेळात जागतिक वर्चस्व प्रस्थापित झालेले दिसेल. दोहाच्या कतार स्पोर्टस क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेत नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर भालाफेक करत डायमंड लीग जिंकली.
यूजीनमध्येही वर्चस्व कायम राहावे
दोहामध्ये झालेली ही लीग डायमंड लीग मालिकेतील पहिली पायरी होती. आता दुसरा व अंतिम टप्पा येत्या 16 आणि 17 सप्टेंबरला यूजीनमध्ये होणार आहे. डायमंड लीगच्या एका लेगमध्ये प्रत्येक खेळाडूला प्रथम क्रमांकासाठी 8, द्वितीय क्रमांकासाठी 7, तृतीय क्रमांकासाठी 6 आणि चौथ्या क्रमांकासाठी 5 गुण दिले जातात. भारतासाठी ऍथलेटिक्समध्ये पहिले ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणाऱ्या नीरजने 90 मीटरचे अंतर पार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. डायमंड लीग या मोठ्या मालिकेचा नीरज हा विजेता आहे. त्याचे लक्ष्य जरी 90 मीटर अंतराचे असले तरीही त्याची आजवरची सर्वोत्तम कामगिरी 89.94 मीटर आहे. हाच एक मोठा राष्ट्रीय विक्रमही ठरला आहे. 2018 साली दोहा डायमंड लीगमधील त्याने पहिल्यांदा सहभाग घेतला होता व त्यात 2018 साली 87.43 मीटर अंतर नोंदवताना चौथे स्थान पटकावले होते. गेल्या सप्टेंबरमध्ये झुरिचला झालेल्या स्पर्धेद्वारे डायमंड लीग विजेता बनणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला होता. तसेच त्यानंतर गेल्याच महिन्यात त्याने लुझानमध्येही अशी कामगिरी केली होती.
गोल्डन बॉयचा असाही विक्रम
टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने भालाफेकीत सुवर्णपदकचा वेध घेतल्यावर रॉजर फेडरर, उसेन बोल्ट, लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनाही मागे टाकत त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर जमा केला. या स्पर्धेदरम्यान जगभरातील वृत्तपत्रांच्या क्रीडा पानांवर तसेच क्रीडा साप्ताहिके व मालिकांमध्ये मिळून सर्वात जास्त मुलाखती व लेख नीरजचेच प्रकाशित झाले. इतकी मोठी मजल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर केवळ नीरज या एकाच भारतीय खेळाडूने मारली आहे. सचिन एक क्रिकेटपटू होता तर नीरज एक ऍथलीट. भारतात क्रिकेटपटूंसाठी रकानेच्या रकाने भरून लिहिले जातात. मात्र, आजवर आपले ऍथलीट अशी कामगिरी करण्यात कुठेतरी कमी पडत होते त्यामुळे हा गौरव त्यांना फारसा लाभत नव्हता आणि तीच नकोशी परंपरा नीरजने खंडित केली याचे जास्त कौतुक आहे.
तंदुरुस्तीवर लक्ष हवे
पॅरिस ऑलिम्पिकला बरोबर एक वर्ष आहे. त्यापूर्वी येत्या सप्टेंबरमध्ये डायमंड लीगची अखेरची फेरी आहे. त्यात नीरजने 90 मीटरचा जादुई अंतराचा पल्ला गाठला तर तोच आत्मविश्वास त्याला पॅरिसला उपयोगी पडणार आहे. मात्र, त्यासाठी त्याला या काळात आपल्या तंदुरुस्तीवर प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. गेल्या मोसमात त्याला काही स्पर्धांमधून याच कारणाने माघार घ्यावी लागली होती. आज तो डायमंड लीगचा विजेता आहे, त्याने अनेक जागतिक दर्जाच्या खेळाडूंना पराभूत करत हे सिंहासन प्राप्त केले आहे. केवळ तंदुरुस्त नाही म्हणून अन्य कोणत्या खेळाडूला ते सहज मिळू नये याची काळजीही आता नीरजलाच घ्यावी लागणार आहे.
प्रायोजकांनी पुढे यावे
आजवर आपले खेळाडू ऑलिम्पिक किंवा त्याच दर्जाच्या अन्य स्पर्धांमध्ये गुणवत्ता नाही म्हणून सहभाग घेत नव्हते असे नव्हे, तर त्यांना त्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक ती प्रायोजकता मिळत नव्हती. 2004 सालानंतर आपली ऑलिम्पिकमधील कामगिरी नेहमीच सरस राहिली आहे. ती पॅरिसमध्येही सिद्ध होईल परंतु त्यासाठी देशातील क्रिकेटचा उदो उदो करणाऱ्या प्रायोजकांनी नीरजसारख्या असंख्य खेळाडूंसाठी सढळहस्ते मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. पॅरिसला होत असलेले ऑलिम्पिक साधारण स्पर्धांप्रमाणे लो बजेट नसते. जितकी मोठी स्पर्धा तितका मोठा खर्च असतो. सध्याच्या काळात पंचतारांकित हॉटेलमधील वास्तव्य, येण्या-जाण्याचा खर्च, तेथे राहण्याचा, पर्यटनाचा तसेच खाण्या-पिण्याचा खर्च अफाट असतो व तो झेपत नाही.
भारतातील केंद्र सरकार, केंद्रीय क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई), खेलो इंडिया व टॉप्स यासारख्या योजनांच्या व संस्थांच्या माध्यमांतून उभा केला जाणारा निधी पुरेसा नसतो. त्यासाठीच प्रायोजक महत्त्वाचे असतात. पदक जिंकून आल्यावर त्यांच्यावर करोडो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव करण्यासाठी पुढे येण्यापेक्षा पदके मिळवण्यासाठी खेळाडूंना कशाची निकड आहे ते पाहून ते पूर्ण करण्यासाठी पुढे येणाऱ्यांची आज खरी गरज आहे. देशपातळीवर यश मिळवणारे खेळाडू जेव्हा ऑलिम्पिकला रवाना होतात तेव्हा केवळ त्यांच्या कुटुंबीयांकडून किंवा मित्रांकडूनच नव्हे तर संपूर्ण देशवासीयांकडून त्यांच्यावर पदकाची अपेक्षा असते. नीरजसारख्यांनी टोकियोत ती पूर्ण केली आहे. आता त्यांना पॅरिस खुणावत आहे व तिथेही त्याचे 90 मीटर अंतराचे लक्ष्य पूर्ण व्हावे व त्याने जागतिक कीर्ती संपादन करावी, हीच अपेक्षा आहे.
अमित डोंगरे