पाकिस्तानात सत्तांतर होताना “हाय व्होल्टेज ड्रामा’ घडत होता. सरकार गेले तरी इम्रान खान यांचा “रडीचा डाव’ काही संपत नाही. त्यांच्या पक्षाच्या सर्व खासदारांनी राजीनामे देऊन सरकार व देशापुढे नवे संकट उभे केले आहे. सत्तांतर होऊन देखील नव्या सरकारपुढे स्थिरतेचा मोठा प्रश्न आहे.
पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच एका पंतप्रधानावर अविश्वास ठराव मंजूर झाला. संसदेला सामोरे जाण्याऐवजी किंवा सत्ताधाऱ्यांच्या आयुधांना संसदेत उत्तर देण्याऐवजी इम्रान खान यांच्या पीटीआय या पक्षाने थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. सरकार, लष्कर आणि थेट सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात इम्रान खान यांचे कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत. सत्तेवर आलेल्या “पीडीएम’ आघाडीत सुप्त अंतर्विरोध आहे. घटक पक्षात कमालीचे मतभेद आहेत. अशा परिस्थितीत या सरकारपुढे मोठी आव्हाने आ वासून उभी आहेत. त्यांना सामोरे जाण्याऐवजी नवीन सरकारला जुन्या सरकारविरोधात कारवाई करण्यात रस निर्माण झाला, तर शाहबाज शरीफ यांना सरकार चालविणे कठीण जाईल.
आमचे सरकार सूडभावनेने वागणार नाही, मात्र हिशोब जरूर केला जाईल, हे शरीफ यांचे विधान खूप काही बोलून गेले. लष्करप्रमुख आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सोशल मीडियावर मोहीम चालवल्याबद्दल “पीटीआय’च्या “सोशल मीडिया सेल’च्या कार्यकर्त्यांना अटक केले. सोशल मीडियावर लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात मोहीम चालवली जात होती. इम्रान सरकार पडल्यानंतर त्यासाठी जनरल बाजवा आणि सर्वोच्च न्यायालयाला जबाबदार धरले जात आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा आणि सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांच्याविरोधात सोशल मीडियावर अनेक ट्विट शेअर केले जात आहेत. सरकार पाडण्यामागे परकीय षड्यंत्र असल्याचे इम्रान यांनी सुरुवातीपासूनच म्हटले होते.
पाकिस्तानमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर सरकार आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचे गैरवर्तन सुरू आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये, पीटीआयचे बंडखोर नेते नूर आलम खान, पीपीपीचे सिनेटर मुस्तफा नवाज खोखर, फैसल करीम कुंडी आणि नदीम अफझल राजधानी इस्लामाबादमधील एका हॉटेलमध्ये एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला करताना दिसत आहेत. फैसल करीम कुंडी काच फेकून वृद्धाला मारहाण करत आहे. त्यांनी पलटवार करण्याचा प्रयत्न केला असता खोखर याने त्याला पकडून डोक्यावर वार केले. इम्रान खानच्या पक्षाने या घटनेबद्दल पीपीपी नेते आणि नूर आलम यांची खिल्ली उडवली आणि त्यांच्यावर प्रथम हल्ल्याचा आरोप केला.
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पीटीआय नेते फहीम खान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना “आंतरराष्ट्रीय भिकारी’ म्हणून संबोधताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोक फहीम खानवर टीका करत आहेत. लोक म्हणतात की, शाहबाज शरीफ आता पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत, त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरल्याने देशाची बदनामी होते. विशेष म्हणजे इम्रान खान चीनच्या दौऱ्यावर असताना पाकिस्तानच्या सरकारी वाहिनीवरच इम्रान यांचा उल्लेख “भिकारी’ असा करण्यात आला होता. त्यानंतर संबंधिताची नोकरी गेली हा भाग वेगळा; पण पाकच्या आजी-माजी पंतप्रधानांचा उल्लेख “भिकारी’ असा केल्याने या देशाची स्थिती लक्षात येते.
पंतप्रधानपदी विराजमान झालेले शाहबाज शरीफ यांना पुढील मार्ग सोपा नाही. सध्या पाकिस्तानवर 130 अब्ज डॉलर (सुमारे 7.8 लाख कोटी रुपये) कर्ज आहे. पाकिस्तानी रुपयांमध्ये हे कर्ज 23.79 लाख कोटी रुपये आहे, जे तेथील जीडीपीच्या 43 टक्के आहे. महागाई देखील 12 टक्क्यांच्या वर आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया 190 पर्यंत घसरला आहे. इस्लामाबादमधील “पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स'(पीआयडीई) या संशोधन संस्थेचे कुलगुरू नदीम-उल-हक यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटले आहे की, पाकिस्तान सध्या दिशाहीन आहे.
अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी कठोर धोरणात्मक सुधारणा आवश्यक आहेत. दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश म्हणून पाकिस्तानची जगभरात ओळख आहे. खुद्द पाकिस्तानलाही या दहशतवादाचा फटका बसत आहे. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) चे पाकिस्तानमधील हल्ले अलीकडच्या काही महिन्यांत तीव्र झाले आहेत. टीटीपीला “पाकिस्तानी तालिबान’ म्हणूनही ओळखले जाते. या दहशतवादी संघटनेची मुळे अफगाणिस्तानात आहेत. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी इम्रान यांनी “टीटीपी’शी बोलणी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.
नव्या सरकारसमोर दहशतवाद हे मोठे आव्हान असेल. बलुचिस्तानमधील स्थानिक बंडखोरीला तोंड देणेही नव्या सरकारला सोपे जाणार नाही. राजकीय संघर्षादरम्यान इम्रान खान यांनी आपले सरकार पाडण्यामागे अमेरिकेचे षड्यंत्र असल्याचे म्हटले होते. या विधानाकडे अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात वाढते अंतर म्हणून पाहिले जात आहे. नव्या पंतप्रधानांनाही अमेरिकेशी संबंध सुधारण्यासाठी काम करावे लागेल.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यादरम्यान इम्रान खान यांच्या मॉस्को दौऱ्यामुळे पाकिस्तानचे पाश्चिमात्य देशांसोबतचे संबंधही बिघडले आहेत. इतकेच नाही, तर चीनची राजधानी बीजिंग येथे होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकला मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक देश विरोध करत असताना इम्रान खान यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर नवीन सरकारला कठोर परिश्रम घ्यावे लागतील.
शाहबाज शरीफ यांनी तेथील नॅशनल असेंब्लीमध्ये दिलेल्या आपल्या पहिल्याच भाषणात आपल्या कार्यकाळात भारताशी संबंध सुधारण्याच्या सर्व शक्यता फेटाळल्या आहेत. भारतासोबतच्या संबंधांचे भविष्य त्यांनी काश्मीरशी जोडले आहे. पाकिस्तानचे चीनसोबतचे संबंध “कयामत’पर्यंत सुरू ठेवण्याबाबत बोलताना त्यांनी सत्ताबदल होऊनही दोन्ही देशांच्या संबंधात बदल होणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे अभिनंदन करताना दहशतवादमुक्त प्रदेशात शांतता आणि स्थैर्याचा भारत प्रयत्न करतो, जेणेकरून आम्ही आमच्या विकासाच्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करू शकू आणि आमच्या लोकांचे कल्याण आणि समृद्धी सुनिश्चित करू शकू, असे म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आपसूक सुधारतील, अशी अपेक्षा करता येणार नाही. शिवाय भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध चांगले नसण्यात भारतापेक्षा पाकिस्तानचाच अधिक तोटा आहे. दीड-दोन वर्षावर आलेल्या तेथील निवडणुका पाहता तेथील सत्ताधाऱ्यांना भारताविरोधात गरळ ओकून त्याचाच फायदा घ्यावा लागणार, हे उघड आहे.
“नॅशनल असेंब्ली’मध्ये शरीफ यांनी चीन, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, युरोपीय संघ, ब्रिटन या देशांशी आपल्या देशाच्या संबंधांचा उल्लेख केल्यानंतर शेवटी भारताचा उल्लेख केला. यावरून परराष्ट्र संबंधात पाकिस्तान भारताकडे कसे पाहतो, हे लक्षात यायला हवे. भारत आणि पाकिस्तान हे शेजारी देश आहेत; पण दुर्दैवाने संबंध खराब झाले आहेत. नवाज शरीफ जेव्हा-जेव्हा सत्तेत असतात, तेव्हा भारतासोबतचे संबंध सुधारतात हे त्यांनी मान्य केले; पण भारताने पाच अणुस्फोट घडवले, तेव्हा पाकिस्तानने सहा अणुस्फोट करून भारताला प्रत्युत्तर दिले, या संदर्भात त्यांची भाषा चिथावणीखोर होती. ऑगस्ट 2019 मध्ये भारताने काश्मीरमधून “कलम 370′ रद्द केल्याचा उल्लेख केला आणि त्याविरोधात काम न केल्याबद्दल इम्रान यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. काश्मीरमध्ये भारताच्या वतीने दररोज काश्मिरी बंधू-भगिनींचे रक्त सांडले जात आहे. आम्हाला भारतासोबतचे संबंध सुधारायचे आहेत, पण काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित केल्याशिवाय ते शक्य नाही, ही शरीफ यांची भाषा भारतद्वेषाची कावीळ झाल्याचे अधोरेखित करते.
पाकच्या नव्या पंतप्रधानांनी जाहीर केले की, पाक काश्मीर आणि काश्मीरच्या लोकांचा मुद्दा प्रत्येक मंचावर मांडत राहील. काश्मिरींना राजनैतिक आणि नैतिक पाठबळ दिले जाईल. शाहबाज यांच्या भ्रमनिरासातून हे स्पष्ट झाले की, भारत व पाकमधील संबंध फेब्रुवारी 2021 पासून युद्धबंदीच्या पलीकडे प्रगती करणार नाहीत. आधीच्या नवाज शरीफ सरकारची शाहबाज सरकारशी तुलना होऊ शकत नाही. यावेळी राजकीय वातावरण खूपच अस्थिर आहे. अस्थिरतेच्या वातावरणात भारत कोणत्याही पाक सरकारशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही. शरीफ यांच्या सरकारच्या स्थिरतेवर भारताला शंका आहे. इम्रान यांच्या सरकारच्या काळातही भारताने जाणीवपूर्वक कोणताही सकारात्मक संदेश दिला नाही. कारण त्यांच्या सरकारच्या स्थिरतेबद्दल देखील शंका होती. या पार्श्वभूमीवर शाहबाज यांच्याशी चर्चा सुरू करून काही फायदा नाही. पाक सध्या आर्थिक व राजकीयदृष्ट्या वाईट स्थितीत आहे. अशा वातावरणात कोणताही मोठा बदल शक्य नाही. शाहबाज यांना आधी स्थिर होऊ द्यावे, मग त्यावर पुढचे धोरण ठरवावे, असे परराष्ट्र विषयातील बहुसंख्य तज्ज्ञ सांगत आहेत.
आरिफ शेख