विराट कोहलीचा जेव्हा भारतीय क्रिकेटच्या क्षीतिजावर उदय झाला तेव्हा त्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वारसदार, असे संबोधले गेले. अगदी कालपरवापर्यंत हीच बिरुदावली कोहलीनेही थाटात मिरवली. मात्र, खुद्द कोहलीनेच आपल्या कारकिर्दीत अडथळे निर्माण केले. स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणे कशाला म्हणतात ते कोहलीने गेल्या काही दिवसांत घेतलेल्या निर्णयांवरून सहज लक्षात येते.
भारतीय क्रिकेटमध्ये प्रत्येक दशकांत अफलातून खेळाडू मिळाल्याचे दिसते. कोहलीही त्याच मुशीतला. चंदू बोर्डे, विजय हजारे, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर ते कोहली असा भारतीय क्रिकेटचा देदीप्यमान प्रवास आपण अनुभवला. काही खेळाडू चित्रपट अभिनेत्यांप्रमाणे आपल्याच प्रतिमेत अडकून पडतात हेच खरे.
कोहलीने कारकिर्दीचा आलेखही सातत्याने चढता ठेवला मात्र, या यशाने हुरळून जात तो स्वतःलाच सचिन समजायला लागला आणि तिथेच सगळा घोळ झाला. त्याला वर्कलोड कमी करण्यासाठी काही काळ विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, टी-20 संघाचे नेतृत्व सोडू नको असे सांगण्यात आले होते. त्याने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याचा हा सल्ला मानला नाही व नेतृत्व सोडले.
तेव्हापासूनच कोहली विरुद्ध बीसीसीआय हा सामना रंगू लागला. हिटमॅन रोहित शर्माकडे टी-20 संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले ते देखील रोहितच्याच एका अटीच्या जोरावर त्यामुळे मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी मग ते टी-20 असो किंवा एकदिवसीय त्यात रोहितकडेच नेतृत्व देण्याचे बीसीसीआय व निवड समितीने निश्चित केले.
हा एक निर्णय कोहलीसाठी आगामी काळात कारकीर्द वाचवण्यासाठी झगडायला लावणारा ठरणार यात शंका नाही. गेल्या जवळपास दोन वर्षांत कोहलीच्या बॅटमधून मोठी खेळी झालेली नाही. त्यातच माजी कर्णधार राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त झाला आहे. त्यामुळे कोहलीला आता आपणच रनमशीन असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. केवळ कर्णधार होता म्हणूनच त्याचे संघातील स्थान टिकले मात्र, आता त्याच्या कामगिरीवरच त्याचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
गांगुलीशी घेतलेला पंगा भोवतोय
मॅच फिक्सिंगमध्ये बदनाम झालेले जागतिक क्रिकेट 2000 सालानंतर रूळावर येऊ लागले तेव्हा भारतीय संघाचे नेतृत्व गांगुलीकडे सोपवले गेले होते. त्यानेही अत्यंत प्रामाणिकपणे अविश्वासाच्या वातावरणात विश्वासाचे नंदनवन फुलवले. जागतिक क्रिकेटवरील भारतीय संघाच्या वर्चस्वाची हीच खरी सुरुवात होती. त्याने जागतिक क्रिकेटमधील बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पाय जमिनीवर ठेवायलाही शिकवले व त्यांच्या उर्मट खेळाडूंना जशास तसे उत्तर देत आपली ताकदही दाखूवन दिली.
हेच गांगुली आता बीसीसीआयचे अध्यक्ष बनले आणि जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी ओळखही निर्माण झाली. आज कोणताही देश अन्य कोणत्याही देशाच्या संघाशी खेळण्यापेक्षा भारतीय संघाशी खेळण्यासाठी धडपडत असतो कारण जर भारतीय संघ खेळला तरच त्यांना पैसे मिळतात. याच गांगुली यांनी पुढील वर्षी होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत टी-20 संघाचे नेतृत्व सोडू नकोस, असा सल्ला कोहलीला दिला होता. मात्र, रवी शास्त्री यांच्या सल्ल्यांना जशी केराची टोपली दाखवत होता तसेच तो गांगुलीशी वागायला निघाला आणि मग रॉयल बेंगॉल टायगर गांगुलीने कोहलीला त्याची जागा दाखवायला सुरुवात केली.
मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व भिन्न खेळाडूंकडे नको, असा विचार मांडत त्यांनी रोहितकडेच टी-20 व एकदिवसीय संघाचे नेतृत्व सोपवले. त्यामुळे आता टी-20 सह एकदिवसीय संघाचेही नेतृत्व सोड अशी स्पष्ट सूचना कोहलीला देण्यात आली. त्याच्याकडे आता कसोटी संघाचेच नेतृत्व राहिले आहे. मात्र, आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर त्याच्याकडून कसोटीचे नेतृत्वही काढून घेतले जाईल, असेही संकेत मिळाले आहेत. त्यामुळेच कोहलीला गांगुलीशी पंगा घेणे भोवले, अशीच चर्चा सुरू झाली आहे.
सोनेरी कारकिर्दीला ब्रेक
कोहलीने 2008 साली श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय, 2010 साली झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 व 2011 साली वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्यानंतर 2013 साली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर निवृत्त झाला. अखेरचा सामना खेळताना सचिनने अर्धशतकी खेळी केली व बाद होऊन तो ड्रेसिंगरूमकडे परतत होता, त्यावेळी सचिन सीमारेषा ओलांडून पॅव्हेलियनकडे परतत असताना कोहलीने हीच सीमारेषा ओलांडून खेळपट्टीकडे कूच केली.
तेव्हा सचिनने कोहलीला शेकहॅंड करताना वारसाहक्काची जणू बॅटच त्याच्या हाती सुपूर्द केली. कोहलीच्या नावावर सध्या 70 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. सचिनचा विक्रम मागे टाकण्यासाठी त्याला अद्याप 31 शतकांची गरज आहे. कोहलीचे वय पाहता व गेल्या दशकापासून भारतीय संघ ज्या संख्येने सामने खेळतो आहे ते पाहता कोहली सचिनच्या कामगिरीला सहज मागे टाकेल असा विश्वासही वाटतो, पण त्यात आपल्याच अत्यंत चुकीच्या निर्णयामुळे अडथळा निर्माण करत त्यानेच आपली कारकीर्द धोक्यात आणली आहे, यात शंका नाही.
कसोटीत 27 तर एकदिवसीय सामन्यांत 43 शतके फटकावताना त्याने आपली कारकीर्द सोनेरी बनवली मात्र, सचिनच्या निवृत्तीने जे सिंहासन रिक्त झाले होते त्याच सिंहासनावर बसू पाहात असलेल्या कोहलीने आपल्या स्वभावाने एक पाय निकामी केला असेच राहून राहून वाटत आहे.
फिनिक्स ठरावा
रणजी स्पर्धेतील एका सामन्याच्या अत्यंत चुरशीच्या वेळी आदल्या दिवशी आपल्या वडिलांचे निधन झाल्यावरही त्यांचे अंतिम संस्कार उरकून दुसऱ्याच दिवशी सामना वाचवणारी खेळी करणारा कोहली या अपयशाच्या राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेईल, असा विश्वास आहे. मात्र, या प्रयत्नात त्याचा “विनोद कांबळी’ होऊ नये हीच अपेक्षा आहे.
रोहित-द्रविडवरच विश्वास
कोहलीच्या नेतृत्वाखाली तसेच रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली संघाने चमकदार कामगिरी केली असली तरीही त्यांना आयसीसीच्या विजेतेपदाने सातत्याने हुलकावणी दिली आहे. आता रोहितकडे कर्णधारपद तर राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपद सोपवण्यात आल्यावर हा दुष्काळ संपेल असा विश्वास बीसीसीआयने दाखवला आहे. अशीच मते गांगुली यानेही मांडली आहेत. त्यामुळे येत्या काळात भारतात व भारताबाहेर होत असलेल्या आयसीसीच्या मुख्य स्पर्धांमध्ये भारतीय संघ विजेतेपद मिळवता झाला तर कोहलीचा पुन्हा कर्णधार बनण्याचा मार्गच बंद होणार आहे.
1998 साली सचिनला जेव्हा संघाचे नेतृत्व सोपवले गेले होते तेव्हा संघाची व त्याची कामगिरी संमिश्र राहिली होती. एक महान खेळाडू महान कर्णधार होऊ शकत नाही हेच त्यावेळी दिसून आले होते. कोहलीच्या बाबतही हेच घडताना दिसत आहे. असो, आता कारकीर्द लांबवायची का संपुष्टात आणायची हे कोहलीलाच स्वतःला ठरवायचे आहे. जर कोहलीकडे हे सर्व विसरून नव्याने कामगिरी सिद्ध करत जागतिक क्रिकेटवर वर्चस्व पुनःप्रस्थापित करण्याची जिद्द असेल तर पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाचे हे रनमशीन रूळावर येईल व नेतृत्वापेक्षाही मोठी उंची गाठेल.
महानतेला वर्तनाचा बट्टा
कोहली देखील महान फलंदाज आहे यात वाद नाही मात्र, त्याच्या गैरवर्तनाचा डाग त्याच्या प्रतिमेला सातत्याने मारक ठरला आहे. तरीही त्याच्या मैदानावरील वर्तनात सुधारणा झालेली दिसत नाही. असे म्हणतात की दिल्लीचे खेळाडू मुळातच आक्रमक असतात त्यामुळे त्यांचा स्वभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही सातत्याने दिसून येतो. कोहलीबाबत बोलायचे झाले तर एक कर्णधार असताना तरी त्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला हवे होते. तो संघातील वरिष्ठ खेळाडूंशीही ड्रेसिंगरुममध्ये फटकून वागत होता.
जेव्हा नशीब साथ देत असते तेव्हा आपल्या साध्या बोलण्याचेही सुविचार बनतात आणि नशीब फिरले की सरळ बोलण्याचीही विसंगती होते हे कोहलीला का लक्षात आले नाही. कामगिरी व आकडेवारी पाहिली तर कोहली आज जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू आहे हे कोणीच नाकारणार नाही.
पण समकालीन ज्यो रूट किंवा केन विल्यमसन यांच्यासारखा आदर त्याला जागतिक क्रिकेटमध्ये मिळत नाही ही देखील वस्तुस्थिती आहे. कोहलीला त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत तब्बल 12 ते 15 वेळा पंचांनी ताकीदही दिली. तसेच सामनाधिकाऱ्यांनी दंडही केला आहे. मात्र, त्याच्या वर्तनात तसूभरही फरक पडलेला नाही.
अमित डोंगरे