महान खेळाडू बनण्याच्या मार्गावर वाटचाल करत असलेला भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आला आहे. त्याने स्वतःहून टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले तर एकदिवसीय नेतृत्व त्याच्याकडून काढून घेतले गेले. या सगळ्या चर्चा बंद खोलीत करण्याऐवजी त्याने पत्रकार परिषद घेत चव्हाट्यावर आणल्या. अहंकार हा माणसाला बुडवतो असे म्हणतात ते काही खोटे नाही. हाच मी पणा सध्या कोहलीला भोवत असून त्यामुळे त्याची कारकीर्द धोक्यात आली असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
पत्रकार परिषद घेत सौरव गांगुलीसह बीसीसीआयला शिंगावर घेण्याची त्याची वेळ चुकली हे तर खरे आहे मात्र, त्याने बीसीसीआय, सौरव गांगुली यांच्याशी पंगा घेतला हे तर सरळ सरळ दिसत आहे. आता त्याला कोंडीत पकडण्यासाठी सर्व काही केले जाईल व त्याचा नक्षा उतरवण्याची वेळ आली हेच बीसीसीआयच्या सध्याच्या भूमिकेतून दिसत आहे. अमिरातीत झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर आपण भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व सोडणार, असे त्याने स्पर्धा सुरू असतानाच सांगितले.
त्याची मनधरणी करण्याचे सगळे प्रयत्न संपले आणि त्याचबरोबर बीसीसीआयने हिटमॅन रोहित शर्मा हा पर्याय शोधला. आता त्यावेळी मर्यादित षटकांच्या टी-20 तसेच एकदिवसीय संघाचे नेतृत्व एकत्रित देणार असाल तरच स्वीकारतो, अशी अट रोहितने ठेवली व ती तत्काळ मान्यही केली गेली. यातून एक गोष्ट दिसून आली की, कोहलीने स्वतः टी-20 संघाचे नेतृत्व सोडले व नंतर त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे नेतृत्व काढून घेतले गेले. कसोटी संघाचे कर्णधारपद मात्र, त्याच्याचकडे कायम ठेवले गेले. ही घडली नाण्याची एक बाजू आता दुसरी बाजू पाहू.
ज्या वेळी एकदिवसीय संघाचे नेतृत्व त्याच्या हातून गेले तेव्हा तो कासावीस झाला व त्याने याबाबत बोलण्यासाठी जाहीर पत्रकार परिषद घेतली. निवड समितीने केवळ एक फोन करून मला त्यांचा निर्णय सांगितला असे कोहली बोलून गेला व तिथेच खरा स्फोट झाला. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे त्याने बीसीसीआय व अध्यक्ष सौरव गांगुली यांनाच लक्ष्य केले आणि इथेच त्याचे टायमिंग चुकले.
दक्षिण आफ्रिका दौरा तोंडावर आलेला असताना त्याने हे सर्व करण्याची गरज होती का, असे वाटते. त्याला मनात जे काही आहे ते सांगायचे होते तर त्याने थेट गांगुलीची भेट घ्यायला हवी होती. मात्र, त्याने आरोपांची खिरापत माध्यमांशी बोलताना वाटली आणि त्याचे च्युइंगम माध्यमांनी चौवीस तास दाखवले, चघळले किंवा हवे तर रवंथही केले म्हणा ना. कोहलीला पाठिंबा मिळेल, माध्यमे बीसीसीआयच्या विरोधात जातील, जनमतही आपल्याकडे येईल हे सगळे कोहलीचे अंदाज फोल ठरले व त्याच्यावरच बुमरॅंग उलटले.
पदार्पणापासून कोहलीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खरा वारसदार समजले जाऊ लागले. त्याच सचिनकडून कोहली एकही गोष्ट शिकला नाही. सचिनवर अन्याय झाला नाही, असे नाही. पाकिस्तानात त्याचे दुहेरी शतक याच गागुंलीने राहुल द्रविडला हाताशी घेत होऊ दिले नव्हते. तेव्हा सचिनही पॅव्हेलियनकडे परतत असताना अत्यंत संतप्त झाला होता, हे अवघ्या जगाने पाहिले. पण त्याला जेव्हा माध्यमांनी प्रश्न विचारले तेव्हा मात्र, त्याने अत्यंत संयम ठेवला व कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही. जे सचिनबाबत घडले ते अनेकांच्या बाबतीत घडले असेल; पण कोणी पाण्यात राहून माशाशी वैर घेतले नाही आणि हेच कोहली विसरला.
वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, व्हीव्हीएस लक्ष्मण, हरभजन सिंग, खुद्द राहुल द्रविड, अनिल कुंबळे व सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांना बीसीसीआयच्या अजब कारभाराचा फटका वेळोवेळी बसला. या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटची जागतिक क्रिकेटवर मक्तेदारी सिद्ध केली मात्र, त्यांना प्रत्यक्ष सामना खेळताना मैदानावरच निवृत्ती जाहीर करण्याचे भाग्य लाभले नाही. आता इतक्या वर्षांनी यातील अनेक खेळाडूंनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती; पण तेव्हा ते खेळत नव्हते त्यामुळे त्यांनी पाण्याबाहेर पडल्यावर बीसीसीआयशी वैर घेतले.
अर्थात त्यावेळी गांगुली बीसीसीआयवर नव्हता. याच खेळाडूंना आता बीसीसीआयमध्येच अनेक संधी निर्माण झाल्या व निवृत्तीनंतरही ते भारतीय क्रिकेटशी जोडले गेले, हा भाग वेगळा. हेच कोहलीलाही थोडा संयम ठेवून करता आले असते. असे म्हणतात ना की, सही बात, सही वक्त और सही मौके पे की जाय तो उसका मजा कुछ औरही होता है.
शतकांचा दुष्काळ
2019 साली कोहलीने शतक साकारले होते. मात्र, त्यानंतर गेल्या दोन मोसमात त्याच्याकडून शतकी खेळी झालेली नाही. हे शतकही बांगलादेशविरुद्ध होते व त्यावेळी बांगलादेशचा संघ आतासारखा भक्कम नव्हता. विक्रमादीत्य सुनील गावसकर म्हणतात की, शतक हे शतक असते ते कुठे व कोणाविरुद्ध केले ते महत्त्वाचे नसते. एक क्षण हे खरे धरले तरीही आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महान फलंदाज त्यांचे शतक कोणत्या संघाविरुद्ध, कोणत्या मैदानावर व कोणत्या परिस्थितीत साकार झाले ते पाहिले जाते व त्यावरच त्या फलंदाजाचे महानपण सिद्ध होते.
आता कोहलीचेच समकालीन केन विल्यमसन, ज्यो रूट व स्टिव्ह स्मिथ यांची कसोटीतील कामगिरी पाहिली तर गेल्या दोन वर्षांत या सगळ्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे; पण कोहली या शर्यतीत मागे पडला आहे. आता त्याने दक्षिण आफ्रिकेत एक शतक फटकावले तरच या सगळ्या चर्चांना आणि वादांना पूर्णविराम मिळेल.
पहिल्या कसोटीत तो आश्वासक खेळत होता मात्र, धावांच्या पस्तिशीतच बाद झाला व पुन्हा एकदा या चर्चांनी डोके वर काढले. त्यातच पाठदुखीच्या कारणाने त्याने दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली. आता तिसरी कसोटी काही दिवसांवर आलेली असून त्यात कोहली खेळला तर त्याला आपल्यावर बसत चाललेला अपयशाचा शिक्का पुसून काढता येईल.
दुखापत खरी की खोटी
पहिली कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघ यजमान दक्षिण आफ्रिका संघाला दुसऱ्या कसोटीतही वर्चस्वाखाली ठेवण्यासाठी सज्ज बनला होता. मात्र, कसोटीच्या आदल्या दिवसापर्यंत सराव सत्रात कसून सराव करणारा कोहली अचानक पाठीच्या दुखण्याने त्रस्त झाला व त्याला या कसोटीत खेळता आले नाही. संघव्यवस्थापनाने कितीही सांगू देत, पण ते खरे आहे का अशी शंका येऊ लागली आहे.
त्याची दुखापत जर खरी असेल तर त्याचे निदान तपासणीनंतर व्हायला हवे होते. सामन्याच्या दिवशी सकाळी कसे केले गेले. आदल्या दिवशी माध्यमांना सांगितले गेले की, कोहली लवकरच पत्रकार परिषदेला उपस्थित राहील मात्र, प्रत्यक्षात त्याला या कसोटीत खेळवलेच गेले नाही. आता तिसरी कसोटी तरी कोहली खेळणार का, याबाबतही शंका घेतल्या जाऊ लागल्या आहेत.
अमित डोंगरे