मुंबईतली चाळ संस्कृती म्हणजे जगप्रसिद्धच आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. या चाळीच्या आठवणींची पुन्हा एकदा “चाळवाचाळव’ करताना नकळत आपणही या चाळीशी एकरूप होऊन जाऊ या.
चाळीच्या संस्कृतीने भल्याभल्यांना आपल्या नादाला लावले. पार पुलंपासून अनेक जणांना या चाळीत विविधतेतून दिसणाऱ्या एकतेने भुरळ घातली आहे आणि त्यातूनच निर्माण झाली पुलंची अजरामर “बटाट्याची चाळ. सई परांजपेंनीही चाळ नावाची वाचाळ वस्ती निर्माण करून चाळीची खट्याळ गोष्ट रसिकांच्या समोर आणली. त्यांच्या मागोमाग इतर कोणाला तरी चाळ नावाची खट्याळ वस्ती या विविधतेतूनच सुचली असावी ना? चांगल्या असो वा वाईट असो, पण चाळीच्या या आपल्या स्वतंत्र चालीवरून चाळीचे अनेक किस्से आजही लोकांना आठवतात.
खरतरं ही चाळ संस्कृती म्हणजे एकोणिसाव्या शतकातली मुंबईची ओळख. मुंबई बाहेरच्यांना चाळ म्हणजे समजायला अंमळ वेळच लागेल या बाबत मुंबईतल्या कोणाही चाळकऱ्याचे दुमत होणार नाही. अहो एवढेच काय, आज मुंबईत राहाणारे ठराविक लोक सोडले तर आजच्या मुंबईकराला चाळ म्हणजे काय हे दाखवण्यासाठी खास मुंबईदर्शन सहल आयोजित करावी लागेल.
चाळ हे काय प्रकरण आहे ते कसे समजणार त्यांना? खेड्यात अगदी छोट्यात छोट्या कफल्लक असलेल्या माणसालाही स्वतःचा एक निवारा असतो. अगदी कुडाच्या भिंतीची का होईना स्वतःची खोपटी असते. त्यांना चाळ म्हणजे काय कसे समजणार? मुंबई बाहेरून येणाऱ्यांचं सोडा हो, आत्ताच्या या नवीन पिढीलाही या संस्कृतीची ओळख करून द्यायची तर महादिव्य करावे लागेल, नाही का हो चाळकरी?
अठराव्या शतकापर्यंत सात बेटांची मुंबई भराव टाकून एकसंध झाली. 1853 मध्ये मुंबईत ट्रेन धावली आणि मुंबईची भरभराट होऊ लागली. कोकणातून चाकरमाने मुंबईत पोहोचले. देशावरून मुंबईला आपल्या सुदृढ हातांनी सावरायला घाटी पोहोचले. गुजराथींना व्यापारासाठी कोणाच्या आमंत्रणाची कधीच आवश्यकता नव्हती.
तेही न बोलावताच मुंबईत पोहोचले. बोहरी पोहोचले, पारसी पोहोचले. ज्यू, इराणीही पोहोचले. हे कमी म्हणून की काय लोकांचे दात काढायला चिनी पोहोचले. तो मुंबईचा सुवर्णकाळ होता जेव्हा मुंबई कधीच झोपत नव्हती. दाही दिशांनी पोहोचलेल्या लोकांना पोटाची सोय म्हणून उद्योगधंदे सुरू झाले. “कोंबडी आधी की अंडे’ या वादावर जेवढी चर्चासत्रे घडली नसतील त्यापेक्षा जास्त चर्चासत्रे मुंबईत “उद्योग धंदे आले म्हणून लोक आले की, लोक आले म्हणून उद्योगधंदे’ या विषयावर घडली.
अभ्यासकांनी हे एक अविरत फिरणारे चक्र आहे, असे मानून या प्रश्नाच्या मुळाशी न जाता, ज्याला जे उत्तर अपेक्षित आहे ते त्याने मान्य करावे असे सांगून विषयाला आपल्या शहराच्या सवयीने बगल दिली. दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत याची पूर्ण जाणीव असल्याने लाखोंची पोशिंदा असलेल्या मुंबईने या वादाकडे नेहमीच काणाडोळा केला आहे. आजही मुंबईने आपला इथे येणाऱ्याचा पोशिंदा हा लौकिक अबाधित ठेवला आहे.
मुंबईत आलेला कोणीही कधीच उपाशी राहात नाही हे इथे येणाऱ्या प्रत्येकाला माहीत आहे. म्हणून मुंबईत येणारे माणसांचे लोंढे आजही चालूच आहेत. पूर्व उपनगरात शीव तर पश्चिम उपनगरात माहीमपर्यंत विस्तार असलेली मुंबई आज दुसरे टोक सापडण्याच्या पलीकडे गेली आहे. हे कमी म्हणून की काय हार्बर लाइनचा आश्रय घेत पनवेलला भोज्जा करून दुसरी मुंबई तिसऱ्या मुंबईत रूपांतरित व्हायला लागली आहे. रोजच्या रोज येणाऱ्या या लोंढ्यांना सामावता सामावता मुंबईचे दुसरे टोकच हरवले आहे.
असो, अठरा-एकोणिसाव्या शतकात मुंबईत येणाऱ्या या लोंढ्यांसाठी राहण्याची जी व्यवस्था निर्माण केली ती म्हणजे चाळ. खरंतर इथले मूळ भूमिपुत्र असतानाही इथल्या जमिनींची मालकी इतर लोकांकडे आली होती. या लोकांनी इथे कामासाठी येणाऱ्या लोकांसाठी चाळींची निर्मिती केली. या चाळींची निर्मितीही मोठी मजेशीर होती बरं का. आडव्या जागेत बांधलेली आडवी चाळ, उभ्या जागेत बांधलेली उभी चाळ.
काही चाळी लाकडांचा आधार घेऊन उभ्या राहिल्या त्या लकडावाला चाळी तर दगडांनी बांधल्या त्या दगडी चाळी. या दगडी चाळींचे नाव आजही घेतले तर अंगावर दगड पडल्याचा भास झाल्याशिवाय राहात नाही. निरनिराळ्या आकाराच्या, निरनिराळ्या पद्धतीच्या काही लाकडाच्या तर काही सिमेंट कॉंक्रीटच्या, काही बैठ्या तर काही उभ्या. जिकडे पाहावे तिकडे चाळीच चाळी दिसायच्या. या चाळीत अठरापगड जातीचे लोक जातपात धर्माची बंधने विसरून एकमेकांच्या सुख-दुःखात एकमेकांना साथ देत गुण्यागोविंदाने नांदत होते. या चाळींची पण खासियत होती. जरी प्रत्येक कुटुंब स्वतंत्र होते, तरी प्रत्येक कुटुंबाची या चाळीत एकच खोली होती.
कुटुंबाचा अख्खा बारदाना एकाच खोलीत कोंबलेला होता. जेवणापुरता हा बारदाना एकत्र गोळा व्हायचा आणि नंतर जागा मिळेल तिथे पसरायचा. चाळीतल्या या खोलीला रूम असे फारच मजेशीर असे आणखी एक नाव होते. या रूममध्ये कोणालाही आपली रूम कधीच सापडली नाही, हे कटू असले तरी सत्य होते. पण मंडळी एकमेकांवरून जीव ओवाळून टाकणाऱ्या या लोकांना या रूमची कधी आवश्यकताच नव्हती.
वेगळी रूम नाही म्हणून नववधू कधी रुसली नव्हती की घरातल्या म्हाताऱ्या माणसांची अडचण लग्नानंतर मुलांना जाणवली नव्हती. थोरल्या जावेच्या खांद्याला खांदा लावून दिवसभर काम करणारी धाकटी जाऊ, सासूच्या नाहीतर थोरल्या जावेच्या कुशीत शिरून खुशाल त्यांच्या रूपात आपल्या मायला पाहात असे. या सगळ्यांचे एकमेकांवर एवढे प्रेम की एवढ्या अडचणीतूनही दरवर्षी कुटुंबाच्या रेशनकार्डावर नवीन नावाच्या नोंदी होत होत्या.
इथे प्रत्येकाला स्वातंत्र्य होते तरी ते केवळ नाममात्रच होते. त्यामुळे कोणाचीही कोणतीही गोष्ट कधीच खासगी नव्हती. तरी या खासगी गोष्टी कधीच चव्हाट्यावर येत नव्हत्या. बाकी प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट सगळ्यांना ठाऊकच होती. जरी प्रत्येकाला स्वत:चे नाव, गाव होते तरी त्या मूळ नावाने क्वचित कोणाला हाक मारली जात होती.
कित्येकदा हे मूळ नाव हे नावाच्या मालकाशिवाय कोणालाही माहीत नसे. पण त्यामुळे कोणाचे कधी काहीच अडले नाही. प्रत्येक शेजाऱ्याला हाक मारायची एक वेगळीच पद्धत होती. “भाऊची आई’ आणि “चिंगीचे बाबा’ हीच ओळख अख्ख्या चाळीला होती. पप्पा आणि मम्मी ही थेर दूर दूरपर्यंत दिसत नव्हती. चाळीच्या वऱ्हांड्यातून नावांची ओळख सगळीकडे वाहत होती. याच वऱ्हांड्यातून प्रेमाचा अखंड झरा वाहत होता.
अरे हो, या वऱ्हांड्यावरून आठवले. काही चाळींना कोणत्या तरी एकाच बाजूला वऱ्हांडा असायचा, तर काहींना पुढे मागे दोन्ही बाजूंना, काही चाळी तर वऱ्हांडामध्ये ठेवून समोरासमोर खोल्यांच्या होत्या. मला शंभर टक्के खात्री आहे वऱ्हांडा म्हणजे काय, हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. मंडळी या चाळींची रचना अशी होती की, सामाईक जिन्याच्या बाजूला एकाला चिकटून एक खोल्या असायच्या त्यामुळे या खोल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जो सार्वजनिक मार्ग होता त्याला त्या काळात वऱ्हांडा असे नाव होते.
या व्हरांड्याला “वटाण’ असेही कधी संबोधले जाई. या सामाईक जिन्याला जोडूनच कधीकधी बैठ्या चाळी सारख्याच उभ्या चाळी होत्या त्यांना होते माळे किंवा मजले. काही चाळी छोट्या होत्या तर काही एवढ्या मोठ्या होत्या की खरोखरच या मजल्यांवर मजल दरमजल करीत आपल्या खोलीपर्यंत वरवर जावे लागत असे.
मुंबईत फ्लॅट संस्कृती यायला पार विसावे शतक उजाडावे लागले होते. अशा या चाळीचे अनेक गमतीशीर किस्से कहाण्या आहेत. येत्या काही दिवसांत या चाळीची संपूर्ण ओळख आपण करून घेऊया. तोपर्यंत आपण करूया, या चाळींची ही चाळ-वा-व.
(क्रमशः)
– डॉ. नरेंद्र कदम