मागे वळून पाहता असे आढळते की, पूर्वी काही छोटे-मोठे व्यवसाय होते ते आता अगदी लयास जाण्यास आले आहेत. लहानपणी नंदीबैलवाला गुबूगुबू करत यायचा. त्याच्याबरोबर त्याचा एक चेला असे. नंदीबैलाला असे प्रश्न विचारले जायचे की, त्याचे उत्तर होकारार्थी वा नकारार्थी असे. नंदीबैलवाला असा काही कासरा हलवायचा की त्या प्रश्नाचे उत्तर नंदीबैलच देत आहे, असे वाटावे. आता तर नंदीबैलवाले क्वचितच दिसतात. दुसरा म्हणजे वासुदेव. सकाळी रामप्रहरी वासुदेव आला… हो वासुदेव आला… अशी आरोळी देत येत असे. त्याला भिक्षा व काही पैसे दिले की तो आशीर्वाद देत असे. भविष्य सांगत असे.
गारुडी येऊन त्याच्या टोपल्यातला नाग दाखवत असे. मदारी माकडाचे खेळ दाखवत असे. पाटा वरवंटा विकणारे पाथरवट तसेच त्या ओघानेच जात्याला पाट्याला टाकी लावणारेही आढळत नाहीत. खेडोपाडीसुद्धा मिक्सर ग्राइंडर घरोघर पोहोचलेत. सुया घे, मणी घे, पोत घे म्हणत येणाऱ्या बाया किंवा बांगडी भरणारे कासार कमीच दिसत आहेत. पूर्वी असे घरी येऊन बांगड्या भरणे होत असे.
आजूबाजूच्या स्त्रियाही एके ठिकाणी जमून मग बांगड्या भरत असत. तो बाइस्कोप दाखवणारा आठवतो. पत्र्याच्या डब्यासारखी वस्तू व तिला झाकण असणारे तीन गोल असत. मग वरती एक चावीचे खेळणे असे जे झांज वाजवत असे. एका वेळी तीन जणांना बघता येत असे. आत मध्ये पिक्चरमधले सीन वगैरे आजच्या भाषेत स्लाइड्स असत. कापूस पिंजणारे खांद्यावरती त्यांचे ते कापूस पिंजारा यंत्र घेऊन कराकरा वाजत जायचे.
मुलांचे विटी-दांडू, भोवरा खेळणे इतिहासजमा झाले आहे. आता लाकडी खेळणी म्हणजे कपाटात व शोकेसमध्ये ठेवण्यासाठी फळे, भातुकली, प्राणी वगैरे असे काही बाजारात दिसतात. त्यानंतरचा एक व्यावसायिक म्हणजे घड्याळजी. मोठमोठी भिंतीवरील घड्याळे तसेच गजराची घड्याळे (टेबल क्लॉक), हातावरील चावीची घड्याळे दुरुस्त करणारे घड्याळजी असत. जुन्या मोठ्या घड्याळांना आठवड्यातून चावी द्यावी लागत असे. तसेच हिवाळा, उन्हाळा या ऋतूप्रमाणे त्यांच्या लंबकाची लांबी ऍडजेस्ट करावी लागत असे नाहीतर वेळ चुकीची होत असे. हळूहळू इलेक्ट्रॉनिक घड्याळे येऊ लागली आणि सर्वच बदलून गेले.
आता पूर्वीसारखी घड्याळेच राहिली नाही. आता इलेक्ट्रॉनिक घड्याळ दुरुस्त करणे म्हणजे सरळ आतले मशीन बदलून टाकतात. तीच गोष्ट रेडिओ दुरुस्त करणाऱ्यांची. पूर्वीचे मोठे वॉल्वचे रेडिओ गेले. नंतर ट्रान्झिस्टर आले. तेही आता इतिहासजमा होत आहेत. मोबाइल नावाची वस्तू आली व तिने घड्याळ, कॅमेरा, रेडिओ व अनेक लोकांचे व्यवसाय बंद करून टाकले आहे.
शेवटचा व महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे कल्हईवाला.
आताच्या मुलांना कल्हई म्हणजे काय हेच समजणार नाही. मला आठवते, आमच्या लहानपणी जर आमच्या चाळीत कल्हईवाला आला की आम्ही सर्व मुलं गोळा होत असू. त्यावेळी तांब्या-पितळ्याच्या भांड्याना आतून कल्हई लावली जात असे. दोन-चार जणांची भांडी असली की तो आपले बस्तान ठोकत असे.
काळ बदलत चालला आहे. वेगवेगळे शोध लागले आहेत. जुन्या वापराच्या वस्तू जाऊन त्यांच्या जागी नवीन येत आहेत. त्यामुळे बदल ही एकच गोष्ट कायम असते याचा प्रत्यय येतो.
– उत्तम पिंगळे